कर्तृत्ववान महिलेला सलाम
कालबाह्य रुढी-परंपरांच्या वातावरणात वाढलेली एक स्त्री जेव्हा धर्म, कर्मकांड हे सर्व सोडून देत, सर्वांचा विरोध पत्करून अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सदस्यत्व स्वीकारते, ही चळवळ वाढवण्यासाठी वेळ देते, ही फार मोठी बाब आहे. आजच्या या धर्माधर्मात तेढ निर्माण करणाऱ्या परिस्थितीत आपण पाहिले तर कोणीही नास्तिक होऊ शकत नाही, पण सुशिक्षित महिलांनी ठरवले तर हेही होऊ शकते हे दाखवून दिलेले आहे. त्यांनी दाभोलकर वाचले व आचरणात आणले. कर्मकांडे, भूतबाधा, करणी ह्या सर्व बुवा बाबांनी भोळ्याभाबड्या व अज्ञानी लोकांना लुबाडण्यासाठी व आपली खळगी भरण्यासाठी केलेली सोय आहे हे ओळखले.
काही दिवसांनी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने अतिसामान्य ते उच्चस्थानी असलेल्या सर्व महिला परीवारास माझ्या खूप खूप शुभेच्छा..महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय कामाने, वेगळेपणाने नावलौकिक मिळवलेल्या उत्कृष्ट महिलांचा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर सन्मान होणारच आहे. त्या सर्व सन्मानित महिलांचेही अभिनंदन. स्वातंत्र्यानंतर मुलींच्या शिक्षणासाठी सरकारने विविध योजनाराबवूनही त्याला शंभर टक्के यश आलेले नाही. मार्च २०१८ च्याआकडेवाडीनुसार, देशात ११ ते १४ वयोगटातील १६.२ लाख मुली शिक्षणापासून वंचित होत्या. यात महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर होता. महाराष्ट्रातील साधारण ५९,९३६ मुली शिक्षणापासून वंचित होत्या.
बरं.. मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढले असले तरी बहुतेक महिला अज्ञान, अंधश्रद्धा व अघोरी प्रथा याचे बळी पडलेल्या आहेत. नोकरी करणाऱ्या महिलाही सनातनी विचार सोडायला तयार नाहीत. पण अशा काही महिला आहेत ज्या या प्रसंगी गौरवासाठी पात्र आहेत. माझ्या ओळखीतील एक महिला आहेत ज्या कमी शिकलेल्या असून त्या मला आधुनिक व विज्ञानवादी वाटतात. त्या महिलेच्या घरी लहानपणापासून आस्तिक विचारश्रेणी म्हणजे सनातनी हिंदू धर्म, ब्राह्मणी अहंकार व धर्माच्या नावाखाली पुरोगामीत्व नाकारणारे वातावरण. त्यांचे जवळचे नातेवाईक सनातन धर्मसंस्थेचे प्रचारक आहेत. सनातन धर्माच्या लोकांना नेहमी हिंदू धर्म संकटात आहे असेवाटते. सनातनी विचारधारेला झुगारून पुरोगामी विचारांची पेरणी करणारे समाजसेवक सर्वश्रुत डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंदभाई पानसरे, गौरी लंकेश व साहित्यिक डॉ. कुलबर्गी ई. च्या अमानुषपणे याच गैरसमजुतीतून हत्या केल्यांचा या संघटनांवर आरोप आहेत. त्यांना असे वाटते की, महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू झाला व हा कायदा म्हणजे सर्व हिंदू धर्म, हिंदूधर्मांचे संत नायनाट करणारा कायदा आहे.
अशा वातावरणात वाढलेली एक स्त्री जेव्हा धर्म, कर्मकांड हे सर्व सोडून देत, सर्वांचा विरोध पत्करून अंधश्रध्दा निर्मूलनसमितीचे सदस्यत्व स्वीकारते. ही चळवळ वाढवण्यासाठी वेळ देते, ही फार मोठी बाब आहे. आजच्या या धर्माधर्मात तेढ निर्माण करणाऱ्या परिस्थितीत आपण पाहिले तर कोणीही नास्तिक होऊ शकत नाही, पण सुशिक्षित महिलांनी ठरवले तर हेही होऊ शकते हे दाखवून दिलेले आहे. त्यांनी दाभोलकर वाचले व आचरणात आणले. कर्मकांडे, भूतबाधा, करणी ह्या सर्व बुवा बाबांनी भोळ्याभाबड्या व अज्ञानी लोकांना लुबाडण्यासाठी व आपली खळगी भरण्यासाठी केलेली सोय आहे हे ओळखले. या प्रथांचे निर्मूलनासाठी महिला आणि मुलींचे शिक्षण हे महत्त्वाचे कनेक्शन आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी धर्माचे आचरण करू नका असे कुठेही म्हटले नाही. प्रत्येकांचा धर्म अगोदर येतो व नंतर सामाजिक कार्य येते ही विचार श्रेणी त्यांनी या पुरोगामी महाराष्ट्राला दिली तरीही त्यांना महाराष्ट्रात विरोध केला जात आहे.
अशा या पुरोगामी विचारांची बैठक असलेल्या महिलेने फेब्रुवारी २०२४ ला आपल्या मुलीचे लग्न रजिस्ट्रेशन पद्धतीने केले. कोणत्याही प्रकारची पैशाची उधळपट्टी न करता हा विवाह नोंदणी पद्धतीने आई वडील व मुलगा-मुलगीच्या सहमतीने पार पाडला हे विशेष. त्यांच्याकडे लग्न करायला पैसे नव्हते असे नाही. पण त्यांना हा अवास्तव खर्च करणे मान्यच नव्हते. हे सर्व वरवर सोपे वाटत असले तरीत्यांच्यासाठी ते किती कष्टमय असू शकते याचा केवळ विचारच केलेला बरा. हा त्यांच्यामध्ये व यजमानामध्ये झालेला सकारात्मक बदल खूप मोठा आहे. हा त्यांनी स्वीकारलेला बदल पुढच्या पिढीने स्विकारला हे विशेष. आज आपण पाहातो, ऐकतो की, लग्नासाठी अवास्तव खर्च केला जातो. अक्षरशः कर्ज काढून आईवडील लग्न सोहळे पार पाडतात. अशा या वातावरणात ही दोन्ही मुले मला कितीतरी आधुनिक वाटतात. असं प्रत्येक महिलेनं ठरवलं तर कितीतरी कुटुंबे कर्ज न काढता मुलांची लग्न करू शकतात. अशा या कणखर पुरोगामी विचार श्रेणीचा अंगिकार केलेल्या या धाडसी व कर्तृत्ववान महिलेला माझा मानाचा सलाम.
- प्रा. श्रीकृष्ण तुपारे, नागोठणे.