दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
आपण कार्यकर्ते नाही तर सैनिक, आता जिंकेपर्यंत लढायचे आहे
नवी मुंबईतील मेळाव्यात शिवसैनिकांची शिवगर्जना
नवी मुंबई : इतर पक्षात कार्यकर्ते असतात, आपल्या पक्षात मात्र कार्यकर्ते नाहीत तर सैनिक आहेत. यापुर्वीही शिवसेनेने अनेक संकटे झेलली असल्याने लढाई आपल्याला नवीन नाही. आता परिस्थिती आणीबाणीची असल्याने लढण्यासाठी वेगळीच मजा आहे. त्यामुळे आता कोंढाणा सर केलेले नरवीर तानाजी मालुसरे आणि घोडखिंडीत शत्रुला रोखून धरणारे बाजीप्रभु देशपांडे, यांच्यासारखे जिंकेपर्यंत लढायचे. गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसायचे नाही, असा निर्धार नेरुळ येथे पार पडलेल्या शिवगर्जना मेळाव्यात शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी केला. या मेळाव्याला शिवसेना नेते भास्कर जाधव, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे आणि खासदार राजन विचारे आदी उपस्थित होते.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शिवगर्जना अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत नेरुळ येथील सेक्टर ९ मधील आहिल्याबाई होळकर सभागृहात शिवसेनाचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी मिंधे गट आणि भाजपचा जोरदार समाचार घेतला. गद्दार शिवसेनेतून गेल्यापासून शिवसेना एकरुप झाली आहे. ठाणे शहर आणि जिल्ह्यात लोक गद्दार जाण्याचीच वाट पहात होते. शिवसेना एकरुप झाल्यामुळे संपूर्ण राज्यात शिवसेनेच्या मेळाव्यांना रेकॉर्डब्रेक गर्दी होत आहे. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा आणि मातोश्री कुणाची हे देशातील लहान मुलांना विचारले तरी त्याचे एकच असेल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. हे वास्तव असताना निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण गद्दारांना देऊन टाकला. पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्याचा पहिला निकाल लागला त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र रडला, मात्र दुसर्या निकालानंतर महाराष्ट्र सावरला आहे. त्यामुळे आता गद्दार आणि त्यांच्या पाठीराख्यांची पळताभुई थोडी होणार आहे, असा विश्वास यावेळी भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, निलेश पराडकर, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, रंजना नेवाळकर, राजुल पटेल, शितल देवरुखकर, ज्येष्ठ माजी नगरसेवक एम. के. मढवी, संपर्क प्रमुख दत्तात्रय तांडेल, उपजिल्हाप्रमुख अतुल कुळकर्णी, संतोष घोसाळकर, दिलीप घोडेकर, प्रकाश पाटील, मिलिंद सुर्यराव, शहरप्रमुख विजय माने, कोमल वास्कर, सोमनाथ वास्कर, काशिनाथ पवार, रंगनाथ औटी, विशाल ससाणे, निखील मांडवे आदी उपस्थित होते.
सैनिकांच्या डिक्शनरीत नॉ प्रोब्लेम शब्द नसतो
जनता आपल्याला कार्यकर्ते नाही तर सैनिक म्हणून ओळखते. सैनिक जेंव्हा लढाईला निघतात, तेंव्हा त्यांना विचारले जाते एनी प्रॉब्लेम, सैनिकाचे उत्तर असते नो प्रॉब्लेम. शिवसैनिकांनाही त्यांच्या डिक्शनरीतून नो प्रॉब्लेम हा शब्द आता काढून टाकायचा आहे. आपल्याला जिंकण्यासाठी लढायचे आहे. आपल्यातून आता ४० गद्दार जरी गेले असले तरी त्यांच्या जागेवर आपल्याला १४० निष्ठावंत निवडून आणायचे आहेत. सामान्य जनेतेच्या मनात ईडी सरकारच्या विरोधात चिड असल्याने आपली लढाई सोपी झाली आहे. त्यामुळे आजपासूनच गद्दारांना हटवून महाराष्ट्र आणि देशाला वाचवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना केले.
कॉन्ट्रक्टर गेले, निष्ठावंत जाग्यावरच
सत्तेसाठी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणार्या मिंधे गटाबरोबर फक्त कॉन्ट्रक्टर गेले आहेत. शिवसेनेवर प्रेम करणारे निष्ठावंत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मागे गंभीरपणे उभा आहेत. त्यामुळेच शिवसेनेच्या मेळाव्यांना मोठी गर्दी होत आहे. गद्दारांना मात्र भाडोत्री गर्दी जमा करावी लागत आहे, असा घणाघात यावेळी शिवसेना खासदार राजन विचारे यांनी मिंधे गटावर केला.