महापालिकेतील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरुपी करण्याची मागणी

नवी मुंबई ः नवी मुंबई शहर वसवितासाठी नवी मुंबईतील स्थानिक ग्रामस्थांनी त्यांच्या १०० टवके जमिनी दिल्या आहेत. असे असताना नवी मुंबई महापालिका आस्थापनेत गेली अनेक वर्षे काम करीत असलेल्या प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी न करता नव्याने भरती करण्यात आलेल्या बारवी धरण प्रकल्पबाधितांना कायमस्वरुपी करण्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका मधील सदर प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करण्यात यावे, अशी मागणी ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केली आहे.

दरम्यान, सदर मागणीच्या अनुषंगाने येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आवाज उठविणार असून नवी मुंबई महापालिका मधील सर्वच प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करणार असल्याचा निर्धार आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केली आहे. नवी मुंबई महापालिका आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या शेकडो प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनी त्यांना महापालिका सेवेत कायम करण्याची मागणी घेऊन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांना साकडे घातले होते. याप्रसंगी ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री विजय घाटे, महापालिका अधिकारी रमाकांत पाटील उपस्थित होते.

नवी मुंबईतील बहुसंख्य प्रकल्पग्रस्त कर्मचारी करार पध्दतीवर सहा महिन्याच्या नियुक्ती आदेशाने किमान वेतनावर गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबई महापालिकेमध्ये अविरत सेवा बजावित आहेत. बहुतांश कर्मचाऱ्यांचे इतर ठिकाणी नोकरी करण्याचे वय देखील निघून गेले असून सदर कर्मचारी नवी मुंबई महापालिकामध्ये प्रामाणिक आपली सेवा बजावत आहेत. त्यामुळे सदर सर्व प्रकल्पग्रस्त, ग्रामस्थ कर्मचारी कायमस्वरुपी होणे, हा त्यांचा हक्क आहे. तसेच ज्या स्थानिक प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या जमिनीवर नवी मुंबई शहर वसले आहे त्याच प्रकल्पग्रस्तांना नोकरीत कायमस्वरुपी करणे, शासनाचे प्रथम कर्तव्य आहे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. नुकतीच बारवी धरणग्रस्त कर्मचाऱ्यांची नवी मुंबई महापालिकेमध्ये थेट नियुक्ती केली गेली आहे. त्याच धर्तीवर नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनाही कायमस्वरुपी करण्यात यावे, याकरिता लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. तसेच येत्या नागपूर हिवाळी अधिवेशनात देखील त्याबाबत आवाज उठविणार आहे. एकंदरीतच महापालिका आस्थापनेत काम करणाऱ्या सर्व प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करुन देणारच, असा विश्वासही आ. सौ.मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

ऐन लढाईच्या वेळी फडकावले पांढरे निशाण