ज्ञानाच्या प्रकाशाने करु दे अज्ञानाच्या अंधाराचं दहन...!

दीपावली हा पारंपरिक भारतीय सण मतभेद-मनभेद विसरून तुम्ही आम्ही सर्वजण आपली हजारो वर्षांपूर्वीची हिंदू संस्कृती व परंपरा अधिकाधिक समृद्ध करण्याचा एकदिलाने प्रयत्न करूया. खरं तर, दीपावली हा सण आता धर्ममर्यादा ओलांडून त्यानं राष्ट्रीय उत्सवाचे स्वरूप प्राप्त केलं, ही अभिमानाची गोष्ट आहे.

दीपावली म्हणजे स्नेहाच्या-प्रेमाच्या प्रकाशाची उधळण होय. दिवाळी-दीपोत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने आनंदाचा-प्रकाशाचा सण आहे. वास्तवात हा उत्सव समृद्धी देऊन मानवी जीवन प्रकाशमान करणारा आहे. वर्षभरातल्या चिंता, भय, ताणतणाव, दुरावा, महामारी यांची मरगळ झटकून टाकत, नव्या उमेदीने जीवनाला सुखमय-आनंदमय करणारा हा सण आहे. अज्ञानाचा अंधार नाहिसा करून मानवी जीवनात ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करण्याच्या उद्देशाने हा सण खऱ्या अर्थानं साजरा केला जातो. तात्पर्य, दीपावली म्हणजे मानवी जीवनातला दुःखरुपी अंधार नष्ट करणारा दीप मांगल्याचे प्रतिक आहे. सारांश, दीपोत्सव साजरा करणे म्हणजेच दीपावली साजरी करणे होय.

सोनपावलांनी येणाऱ्या दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला आध्यात्मिक-सांस्कृतिक महत्व आहे. धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजपर्यंत प्रत्येक क्षण न क्षण हर्षोल्हासात साजरा केला जातो.तथापि, दीपावलीचा शुभारंभ हा खऱ्या अर्थाने वसुबारसने होत असून, सायंकाळी गाय-वासरूची पूजा करून त्यांना नैवद्य खाऊ घातले जाते. त्यानंतर धनत्रयोदशीला देवापुढे धन,धान्य व धने ठेऊन त्याची पूजा करतात. अन्‌ सायंकाळी दक्षिण दिशेला कणकेचे दिवे लावून त्यांची पूजा केली जाते.

नरक चतुर्दशीच्या दिवशी घरातील सर्व लहान-मोठे सदस्य पहाटे अभ्यंगस्नान करतात. अन्‌ त्यानंतर अंगणात फटाके फोडतात. पौराणिक आख्यायिकेनुसार ह्याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला होता. महत्वाचे म्हणजे ह्याच दिवशी लक्ष्मीपूजन देखील असून, वद्य अमावस्येला सायंकाळी लक्ष्मी-कुबेरचे पूजन केलं जातं. धन-धान्य समृद्धी व सौख्य नांदावं, हे त्याचं प्रतिक असतं.

त्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला असलेल्या बलिप्रतिपदा म्हणजेच ज्यास आपण दीपावली पाडवा असे म्हणतो. हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असून, ह्या दिवशी कोणत्याही शुभकार्याची सुरुवात केली जाते. या शुभदिनी पत्नी ही पतीला ओवाळून त्यांच्यासाठी दीर्घायुष्य चिंतिते. तर तिला याप्रसंगी तिच्या आवडीची साडीचोळी वा दागदागिने भेट म्हणून दिली जातात. त्यानंतर भाऊबीजेच्या दिवशी बहीण आपल्या भाऊरायाला ओवाळून पेढा भरवते अन्‌ त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देवाला प्रार्थना करते. भाऊपण  बहिणीला ओवाळणीप्रित्यर्थ तिच्या आवडीची भेटवस्तू देतो. या मंगलमय दिनी दागदागिन्यांची खरेदीही मोठ्या प्रमाणात केली जाते. वास्तवात हा सण म्हणजे आनंदाची पर्वणीच! दीपावलीच्या चार-पाच दिवसांच्या काळात घरोघरी रोषणाई केली जाते. तसेच घरांच्या ओट्यावर-गॅलरीत मातीच्या पणत्या लावून सभोवतालचा परिसर प्रकाशमय केला जातो. वास्तवात हा दिव्यांचा- रोषणाईचा सण आहे. दीपावलीच्या काळात आपल्या आया-भगिनी अंगणात आकर्षक रांगोळ्या काढून सर्वांचे लक्ष वेधित असतात. रंगबिरंगी आकाश कंदिलांची उभारणी,नातेवाईक-मित्रमंडळींना फराळाची मेजवानी अन्‌ फटाक्यांची आतषबाजीमुळे तर सारा परिसर दुमदुमुन जातो. प्रत्येकजण पारंपरिक वेशभूषा करून इतरांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतो. चमचमीत फराळावर ताव मारून दिवाळीचा आनंद लुटण्याची मजा काही औरच असते. याशिवाय नातेवाईकांना-आप्तमित्रांना दिवाळीनिमित्त दिल्या जाणाऱ्या शुभेच्छांना तर पारावारच उरत नाही. ग्रीटिंग कार्ड देऊन वा मोबाईलद्वारे मेसेज पाठवूनही दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या जातात. येनकेनप्रकारे आपल्या मित्रांना, सगेसाईंना आपल्या दिपावली शुभेच्छा पोहोचविण्याचा हा सर्वंकष प्रयत्न असतो.

काळ कितीही बदलो, पण आगरी-कोळी समाजाची दिवाळी दरवर्षी पारंपरिक पद्धतीने मोठ्या धूमधडाक्यात साजरी होत असते. त्यांचं आपल्या पारंपरिक संस्कृतीशी घट्ट नातं आहे. मुंबई, ठाणे, कोकणातील भूमिपुत्रांची दिवाळी साजरी करण्याची पद्धत काही  आगळीवेगळीच असते. बलिप्रतिपदेला हे लोक पारंपरिक पद्धतीने बैलांची मनोभावे पूजा करत असतात.आपल्या शेतीत भरपूर उत्पन्न निघो, धनधान्याची भरभराट होवो,या पार्श्वभूमीवर आगरी-कोळी लोक इडा पिडा टळो,बळीचे राज्य येवो असे देवाला साकडे घालत भाताच्या पेंढ्या आपापल्या घरासमोर जाळत असतात.तसेच लक्ष्मी पुजनच्या दिवशी हे लोक रात्रीच्या वेळी तांदळाच्या पीठाची बैलाची प्रतिकृती तयार करून गावभर मिरवतात. अशा भव्यदिव्य पद्धतीने आगरी-कोळी लोक आपली दिवाळी साजरी करतात.

बंधू-भगिनींनो, फटाक्यांची आतिषबाजी करताना ध्वनीप्रदूषण अन्‌ वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढू नये, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. खबरदारीचे उपाय म्हणून सुतळी बॉम्बसारखे धोकादायक फटाके लहान मुलांपासून दूर ठेवावेत.

रुग्णांना त्रास होऊ नये, या दृष्टीने आपापल्या भागातील हॉस्पिटलच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी करू नये. आतंकवादी शक्तींचे दुष्ट मनसुबे समूळ नष्ट करण्यासाठी आपण सर्वधर्मीय नागरिक एकसंघ होऊया अन्‌ आपला देश सर्वदृष्टीने बळकट करूया. दीपावली हा पारंपरिक भारतीय सण मतभेद-मनभेद विसरून तुम्ही आम्ही सर्वजण आपली हजारो वर्षांपूर्वीची हिंदू संस्कृती व परंपरा अधिकाधिक समृद्ध करण्याचा एकदिलाने प्रयत्न करूया. खरं तर, दीपावली हा सण आता धर्ममर्यादा ओलांडून त्यानं राष्ट्रीय उत्सवाचे स्वरूप प्राप्त केलं, ही अभिमानाची गोष्ट आहे. यातूनच खऱ्या अर्थाने धार्मिक सहिष्णुता प्रस्थापित होऊन सर्वधर्मसमभावच्या संकल्पनेस चालना मिळेल. - रणवीरसिंह राजपूत 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी