दीपोत्सव आनंदाचा...
नवरात्रीची धामधूम संपताच सगळ्यांना वेध लागतात ते दीपोत्सवाचे म्हणजेच दिवाळीचे. घर, दार, अंगण सगळं सगळं दिव्यांच्या प्रकाशाने लख्ख उजळून काढणारा हा सण आनंदाची शिदोरीचं आपल्या जीवनात घेऊन येतो. वसुबारसपासून सुरू झालेली दिवाळी खऱ्या अर्थाने संपते ती तुलसी विवाहानंतर. एवढा मोठा कालपट कोणत्याही सणाचा नसतो. म्हणून तर म्हणतात ना...‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा.'
आपला देश कृषीप्रधान असल्यामुळे वसुबारस या दिवाळीच्या पहिल्या दिवसाचे महत्त्व शेतकरी कुटुंबाला जास्त असते. गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव असतात असे मानले जात असल्यामुळे यादिवशी गाय व वासराची पूजा केली जाते. आपल्याला दूध देऊन पोषण करणाऱ्या गायीप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्त्रिया उपवास करतात. खास गोड नैवैद्य बनवून गायीला दाखवितात. जिथे गाय उपलब्ध नसते तिथे घरात पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय-वासराचे चित्र रेखाटून पूजा केली जाते. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून गृहिणी दिवाळी सणाची सुरूवात करते. दुसरा दिवस असतो धनत्रयोदशीचा. या दिवशी घरातल्या धनाची म्हणजे दागदागिन्यांची पूजा केली जाते. नवीन कपड्यांची व अलंकारांची खरेदी शुभ समजत असल्याने लोक आवर्जून यांची खरेदी करतात. शेतकरी व कारागिर आपापल्या अवजारांची पूजा करतात. देवाला धणे व गुळाचा नैवेद्य दाखवून घराच्या सुख-समृद्धीची कामना केली जाते. वैद्यकीय क्षेत्रातले लोक धनवंतरीची पूजा करून हा दिवस आयुर्वेद दिन म्हणून साजरा करतात.
नरक चतुर्थीचा दिवस म्हणजे दिवाळीची पहिली आंघोळ. सुवासिक तेल, उटणं लावून अभ्यंगस्नान करण्यासाठी सगळं घर त्या दिवशी पहाटेचं उठतं. आंघोळ झाल्यानंतर दरवाजात रांगोळी काढून पणत्या लावल्या जातात व नरकासुराचे प्रतिक म्हणून कारिट डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडले जाते. देवाला अभ्यंगस्नान घालून दिवाळीला केलेला फराळ नैवद्य म्हणून दाखविला जातो व त्यानंतर घरातले सगळे छान गप्पागोष्टी करत फराळावर ताव मारतात. काही उत्साही लोक पहाटे फटाक्यांची आतषबाजी करून आसमंत दुमदुमवतात आणि दिवाळी सुरू झाल्याची जणू सगळीकडे दवंडीच पिटवतात. आश्विन अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. या दिवशी सगळीकडे दीपोत्सव साजरा केला जातो.समृद्धी व ऐश्वर्य यांचे प्रतिक असणाऱ्या लक्ष्मीची घरोघरी पूजा केली जाते. घर स्वच्छ, निरोगी ठेवायला मदत करणाऱ्या केरसुणीची देखील पूजा स्त्रिया न विसरता या दिवशी करतात. आपलं घर धनधान्यांनी, पैशाने व आरोग्याने समृद्ध व्हावे हीच प्रार्थना प्रत्येकाच्या मनात असते. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा. या दिवशी काही ठिकाणी बलीची प्रतिमा तयार करून पूजा केली जाते, तर काही ठिकाणी शेणाचा बळीराजा करून त्याची पूजा केली जाते. याच दिवशीसाडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त असलेला दिवाळी पाडवा घरोघरी साजरा केला जातो. पती-पत्नीच्या नात्याला दृढता आणणारा हा दिवस असतो. संध्याकाळी पत्नी पाटाभोवती रांगोळी काढून आपल्या पतीचे औक्षण करते व पती प्रेमाने ओवाळणी म्हणून पत्नीला पैसे, दागिने किंवा साडी देतो. त्यानंतर येते भाऊबीज. भावाबहिणीच्या नात्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी वाढविणारा हा दिवस. बहीण भावाला ओवाळून त्याच्या मांगल्याची, सुखी व निरोगी आयुष्याची कामना करते, तर भाऊ ओवाळणी देऊन आयुष्यभर तिच्या सुखदुःखात आपण सहभागी असल्याची ग्वाही देतो. आपल्या बहीणींचेघर कितीही लांब असले तरी आजही भाऊ आवर्जून ओवाळून घेण्यासाठी आपल्या बहीणींच्या घरी जातात व आपल्या नात्याची विण घट्ट करतात.
पुराणातील कथांनुसार दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येत परतले. त्यावेळी अयोध्या नगरी दिव्यांनी उजळविण्यात आली होती. चांगल्या गोष्टींचा वाईट गोष्टींवर विजय मिळवून देण्याची प्रेरणा देणारा दिवाळी सण थाटामाटात गावागावांत, शहरांमध्ये आपण आजही उत्साहाने साजरा करतो. प्रत्येक जण आपलं घर, अंगण स्वच्छ करून रोशणाई करतात, दाराला तोरण बांधून आकाशकंदील लावतात, दारात सुंदर रांगोळी घालून पणत्यांनी सगळा परिसर उजळून दीपोत्सव घरपती साजरा करतात. दिवाळीत गोड-तिखट पदार्थांची रेलचेल असते. करंज्या, लाडू, चकल्या, चिवडा, शंकरपाळ्या, कडबोळी, अनारसे असे अनेक पदार्थ घरोघरी बनवले जातात. मुंबईत चाळ संस्कृती जेव्हा मोठ्या प्रमाणात होती तेव्हा स्त्रिया एकमेकींच्या घरी मदत करायला जायच्या. आजही काही ठिकाणी हे एकमेका साहाय्य करू चे धोरण दिवाळी फराळ निर्मितीसाठी दिसते. ज्यांना फराळ बनवणं शक्य नाही ते विकत आणून फराळाची मजा लुटतात. नवीन कपडे, वस्तू, दागदागिने, वाहानं, घर इत्यादींची खरेदी करून लोक आपल्या आनंदात भर घालत असतात. प्रेमाने आपल्या नातलगांना, मित्रपरिवाराला घरी येण्याचं निमंत्रण देतात. एकमेकांना फराळ, मिठाई, भेटवस्तू इत्यादी देऊन आपला व प्रियजणांचा आनंद द्विगुणीत करतात. दिवाळीत बौद्धिक खाद्य मिळावं म्हणून वाचनप्रेमी घरांमध्ये दिवाळी अंकाची खरेदी केली जाते व फराळाच्या आस्वादाबरोबर साहित्यिक आस्वाद घेतला जातो. बच्चे कंपनी घराच्या अंगणात, इमारतीच्या परिसरात मातीचे किल्ले बांधतात. यातून त्यांना दिवाळीच्या सुट्टीत विरंगुळा तर मिळतोच, त्याशिवाय आपला इतिहास, परंपरा यांकडे सकारात्मकतेने पहाण्याचे बाळकडू मिळते. आनंदाची बरसात करणारा दीपोत्सव नेमका शेतकऱ्यांच्या सुगीच्या दिवसांत येतो. त्यामुळे शेतकरी सुगीच्या कामात व्यस्त राहतो. पावसाळ्यात पेरलेल्या धान्याची कापणी सुरू झाल्याने बळीराजाचं कुटुंब शेतातली धनलक्ष्मी घरी घेऊन येतं. अशीच सुखसमृद्धी आपल्या घरात येत रहावी म्हणून शेतकरी कुटुंब गाय-वासराची, शेणा-मातीची पूजा करून दीपोत्सव साजरा करतं.
दीपोत्सव आपल्या घरी आनंदी, सकारात्मक वातावरण घेऊन येतो. सकारात्मक ऊर्जा जर आपल्याला दैनंदिन जीवनात मिळत राहिली तर आपल्या घरी रोजचं दिवाळी होईल...संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्या प्रमाणे
”मी अविवेकाची काजळी ।
फेडूनि विवेकदीप उजळी ।
ते योगिया पाहे दिवाळी ।
निरंतर ।”
म्हणजे आपल्या मनातली अविवेकाची काजळी आपण बाजूला सारली व आपल्या मनातला विवेकाचा नंदादीप पेटवला, तर आपल्या घरी सद्विचारांची अखंड दिवाळी साजरी होऊ शकते. तेव्हा या सद्विचारांना स्मरत आपण दीपोत्सव साजरा करूया व म्हणूया,
लक्षदीप हे उजळले घरी
दारी शोभली कणा रांगोळी
फुलवाती अंगणात सोनसकाळी
आली दिवाळी, आली दिवाळी...
- मंगल कातकर