जुईनगर-नेरुळ मधील दुषित पाण्याच्या समस्येचे निवारण
नवी मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून जुईनगर-नेरुळ नोडमध्ये दुषित पाण्याच्या समस्येने रहिवाशी त्रस्त झाले होते. याबाबत रहिवाशांनी ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'च्या सचिव विद्या भांडेकर यांच्याकडे तक्रारी केल्यावर भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा केला. या पाठपुराव्यामुळे जलकुंभापासून ते थेट जलवाहिन्यांपर्यत सर्वच पातळीवर
महापालिका प्रशासनाने काम करत दुषित पाण्याच्या समस्येचे निवारण केले. जुईनगर-नेरुळ नोडमध्ये दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे रहिवाशी विशेषतः लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढीस लागले होते. पोटात दुखणे, उलट्या, जुलाब होणे आदि आजारांनी घरोघरी रुग्ण दिसू लागले होते. त्यामुळे विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु केल्याने आरोग्य विभागाला जाग आली. त्यांनी स्थानिक भागात डॉक्टरांचे पथक पाठवून रहिवाशांची तपासणी करुन उपचार करण्यात आले. महापालिका पाणीपुरवठा विभागाने जलकुंभ ते गृहनिर्माण सोसायट्यांपर्यत जलवाहिन्यांची पाहणी केली. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्या भांडेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत जलकुंभाची पाहणी करुन समस्या दाखविली. ज्या ठिकाणी जलवाहिन्यांची समस्या होती, त्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने जलवाहिन्या बदली करण्यात आल्या.
एकंदरीतच दुषित पाणी समस्येचे निवारण करण्यासाठी विद्या भांडेकर करीत असलेल्या पाठपुराव्याची प्रसिध्दी माध्यमांनी दखल घेत त्यास प्रसिध्दी दिली. परिणामी, दुषित पाण्याची समस्या प्रकाशझोतात आली. महापालिका प्रशासनाने दखल घेऊन तातडीने हाती घेतलेल्या कामामुळे दुषित पाण्याच्या समस्येचे तुर्तास निवारण झाल्याने विद्या भांडेकर यांनी संबंधितांचे आभार मानले आहे. तर विद्या भांडेकर यांच्या पाठपुराव्यामुळे दुषित पाण्याच्या समस्येचे निवारण झाल्याने स्थानिक रहिवाशांनी विद्या भांडेकर यांचे आभार मानले.
दुषित पाण्याच्या समस्येचे निवारण केल्यामुळे महापालिका प्रशासनासह या समस्येला प्रसिध्दी देवून सदरची समस्या प्रकाशझोतात आणण्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रसिध्दी माध्यमांचेही आभार मानते. -विद्या भांडेकर, सचिव - नवी मुंबई जिल्हा काँग्रेस.