करंजा बंदर होणार सर्वात मोठे फिशिंग हार्बर-फडणवीस
उरण : करंजा येथे १ हजार मच्छीमार बोटी क्षमतेचे मच्छीमार बंदर उभारणीचे कामाला गती देण्यात येणार असून त्यासाठी १५३ कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याशिवाय याठिकाणी अत्याधुनिक अशी जेट्टी तयार करण्यात येणार असून, करंजा बंदर देशातील सर्वात मोठे फिशिंग हार्बर म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उरण येथेब केले.
‘उरण नगरपरिषद'च्या नवीन प्रशासकीय इमारत, सावित्रीबाई फुले फुल मार्केट आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आणि समाज विकास केंद्र, उरण टाऊन हॉल यांचे लोकार्पण आणि उपजिल्हा रुग्णालय भूमीपुजन, उरण चारफाटा येथील मच्छीमार्केटचे उद्घाटन यांसह विविध विकास कामांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १ सप्टेंबर रोजी उरण येथे झाला. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे,आ. प्रशांत ठाकूर, आ. रविंद्र पाटील, आ. महेश बालदी, जिल्हाधिकारी किशन जावळे, ‘रायगड जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
‘न्हावाशेवा-शिवडी अटल सेतू'मुळे रायगड जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. भविष्यात उद्योगाचे खरे मॅग्नेट रायगड जिल्हा होणार आहे. यामुळे जिल्ह्यात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. नवी मुंबई विमानतळामुळे जीडीपी मध्ये १ टक्के वाढ होणार आहे. डेटा हब म्हणून रायगड आणि नवी मुंबईची ओळख निर्माण झाली आहे. या २ भागांमध्ये मोठ्या प्रमाणात डेटा सेंटरची निर्मिती होत असून देशपातळीवर डेटा सेंटर्सची ६० टक्के क्षमता रायगड आणि नवी मुंबईत आहे. त्यामुळे यापुढील काळात महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन म्हणून रायगड जिल्हा होत असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे.
मच्छीमारांचे हित जोपासत वाढवण बंदराची उभारणी करण्यात येत आहे. या बंदरामुळे निर्यात क्षमता वाढणार आहे. ग्लोबल सप्लाय चेनचा भाग आपण आता झालो आहोत, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. आ. महेश बालदी यांनी अतिशय कल्पकतेने मतदार संघात दर्जेदार आणि उत्कृष्ट विकासकामे केली आहेत. त्यांच्या प्रत्येक विकासकामासाठी पुरेसा निधी आणि आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. उरणच्या विकासासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खा. श्रीरंग बारणे यांनी मनोगत व्यवत केले.आ. महेश बालदी यांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीचा पुनर्रुच्चार प्रास्तविकातून केला.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी केली.
सदर कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.