विधानसभा निवडणुकीतही ‘मविआ'कडून अपप्रचाराची शक्यता - ना. रवींद्र चव्हाण

पनवेल : ‘महाविकास आघाडी'ने लोकसभा निवडणुकीत फेक नेरेटिव्ह पसरवत जनतेची दिशाभूल करीत स्वतःचा फायदा करुन घेतला. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही ‘महाविकास आघाडी'कडून अपप्रचार करण्याचा प्रयत्न होईल, अशी टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पनवेल येथे केली. दरम्यान, जनतेने आणि कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या थापेबाजीला बळी पडू नये, असे आवाहनही नामदार चव्हाण यांनी यावेळी आवर्जून केले.

‘भारतीय जनता पार्टी'ची कोकण विभागीय बैठक पनवेल मार्केट यार्ड येथे राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत २४ ऑगस्ट रोजी पार पडली. त्यानंतर या संदर्भात ना. रवींद्र चव्हाण यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. या पत्रकार परिषद प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, ‘भाजपा'चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील उपस्थित होते.

बैठकीच्या संदर्भात बोलताना बुथ आणि मंडल स्तरावर उत्कृष्ट काम आणि संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय संघटन सहमंत्री शिवप्रकाश यांनी मार्गदर्शन केल्याचे ना. रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. सर्वसामान्य माणसाचा विकास हाच ध्यास घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, ‘महाराष्ट्र'चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महायुती सरकार सक्षमपणे काम करत आहे. लाडकी बहीण योजना, वयोश्री, अन्नपूर्णा, गरीब कल्याण, स्कॉलरशिप, मुलींना मोफत उच्च शिक्षण, आनंदाची शिधा, नमो शेतकरी, पीएम किसान अशा अनेक योजना प्रत्यक्षात अंमलात आणून त्याचा लाभ जनतेला होत आहे. मात्र, विरोधक प्रत्येक वेळी या लोककल्याणकारी योजनेत खडा घालण्याचे काम करत आहे. असे असले तरी सदर योजना प्रत्येक लाभार्थी पर्यंत पोहोचवण्याचे काम लोकहिताची जबाबदारी म्हणून कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन ना. रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केले.

पूर्वी काँग्रेस सरकार रोटी कपडा मकान आणि गरीबी हटाओ असा नारा द्यायची. पण, त्यांना ते कधीही शक्य झाले नाही. मोदी सरकार गरीब कल्याण योजना राबवत ८० कोटी नागरिकांना अन्न धान्य देत आहे. पंतप्रधान आवास योजना राबवून लाखो कुटुंबाना घरकुल दिले आहे. या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केले जात आहे. बारा बलुतेदारांचे प्रश्न सोडविण्याचे आणि प्रत्येक घटकापर्यंत योजना पोहोचविण्याचे काम प्रामाणिकपणे केले जात आहे. ‘महायुती'ने सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत तर महाविकास आघाडी खोटे बोला, पण रेटून बोला या पध्दतीने काम करत आहे, असा टोलाही नामदार चव्हाण यांनी ‘महाविकास आघाडी'च्या नेत्यांना लगावला.

यावेळी बदलापूर बालिका अत्याचार संदर्भात पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना बदलापूर आणि इतर प्रकरणासंदर्भातील नराधमांच्या कृत्यांचा कोणीही समर्थन करु शकत नाही. सर्व आरोपींना अटक झाली असून सदर केस फास्ट ट्रॅकने होण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने सरकार म्हणून भूमिका घेतली असल्याची माहिती ना. रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिली. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 गणेशोत्सवापूर्वी गोवा महामार्ग खड्डेमुक्त -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे