नवी मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी
नवी मुंबईच्या जिव्हाळ्याच्या मागण्या मान्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आदेश
नवी मुंबई : आमदार गणेश नाईक नवी मुंबईतील जिव्हाळ्याच्या मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला यश आले असून नाईक यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत 8 ऑगस्ट रोजी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला माजी खासदार संजीव नाईक, शासकीय, सिडको, महापालिका, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, मेरीटाईम बोर्ड, एमआयडीसी आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी...
नवी मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याची मागणी आमदार नाईक यांनी लावून धरली होती. ती मान्य करण्यात आली असून त्याबाबतचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत दिले. या मालमत्ता करमाफीमुळे नवी मुंबईतील हजारो सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पालिकेचे आरक्षित भूखंड डीपी मंजुरीवेळी मार्गी लागणार
नवी मुंबई महापालिकेने तयार केलेल्या विकास आराखड्यामध्ये नागरी सोयीसुविधांसाठी भूखंडांवर आरक्षण टाकले आहेत
परंतु, हे भूखंड विकण्याचा सपाटा सिडकोने लावला होता. नवी मुंबईकरांना भविष्यात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भूखंडांची आवश्यकता असल्याने नाईक यांनी सिडकोच्या भूमिकेचा विरोध करून शासन स्तरावर भूखंड विक्रीवर स्थगिती आणली होती. तसेच नवी मुंबईसाठी आवश्यक भूखंड आरक्षित ठेवण्याची मागणी केली होती. ही मागणी देखील मान्य झाली असून प्रस्तावित विकास आराखडा मंजूर करतेवेळी महापालिकेकडून मागणी झालेले मात्र सिडकोने विकलेले सुविधा भूखंडाचा प्रश्न मार्गी लावावा, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
अक्षता आगासकर प्रकरणी उज्वल निकम यांची नियुक्ती...
नवी मुंबईतील अक्षता आगासकर या भगिनीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी नाईक यांनी हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून निष्णात वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती. या मागणीनुसार आता उज्वल निकम यांना विशेष वकील म्हणून नियुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
प्रकल्पग्रस्तांची बांधकामे जमिनीचा मालकी हक्क देऊन नियमित करण्याची मागणी...
प्रकल्पग्रस्तांनी आजपर्यंत केलेली गरजेपोटीची सर्व बांधकामे जमिनीचा मालकी हक्क देऊन नियमित करण्याची मागणी नाईक यांनी या बैठकीत केली.
बीएमटीसी कामगारांसाठी ऐच्छिक योजना...
सिडकोच्या बंद पडलेल्या बीएमटीसी परिवहन सेवेतील कामगारांना उदरनिर्वाहासाठी योजना लागू व्हावी याकरता आमदार नाईक यांचा पाठपुरावा सुरू होता. या महत्त्वाच्या विषयावरही निर्णय झाला असून 100 चौरस फुटाचे गाळे किंवा दहा लाख रुपये अशी ऐच्छिक योजना या कामगारांसाठी लागू करण्यात येणार आहे.
ऐरोली-काटई मार्गिकेचे काम लवकरच...
ऐरोलीवरून कल्याण-डोंबिवली काटई कडे जाणाऱ्या उन्नत मार्गाचा वापर नवी मुंबईकरांना करता आला पाहिजे याकरिता मुंबई आणि काटई कडील दोन्ही बाजूंनी चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गीका बांधण्याकरता आमदार नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. काटईकडील दोन्ही मार्गिका तयार झाल्या असून आता मुंबईकडील मार्गिका बांधण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे.
अटल सेतू बाधित मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई...
न्हावा शेवा अटल सेतूमुळे व्यावसायिक नुकसान झालेल्या मच्छीमार बांधवांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नाईक यांनी केली होती. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी तातडीने आर्थिक मदत वाटपाचे आदेश दिले आहेत.