गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा, अन्यथा योग्य धडा शिकवू

कल्याण : रस्त्यांवरील खड्डे भरण्यात केडीएमसी प्रशासन सपशेल अपयशी ठरली असून गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त झाले नाही तर आमच्या पध्दतीने धडा शिकवू, असा इशारा कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिला आहे. तसेच खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना घडून शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला संपूर्णपणे केडीएमसी आयुक्त जबाबदार असतील, अशा शब्दांत आमदार भोईर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

‘एमएमआरडीए'च्या माध्यमातून नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत कल्याण पश्चिम प्रभाग क्रमांक-१ आणि २ मध्ये मंजूर निधीतून मुख्य रत्स्यांचे काँक्रीटीकरण कामाचे भूमीपुजन आ. विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना त्यांनी खड्ड्यांबाबत केडीएमसी प्रशासनाला धारेवर धरले.

गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच शिल्लक असून कल्याण मधील मानाच्या गणपतींचे आगमन सुरु झाले आहे. मात्र, अद्यापही ‘केडीएमसी'कडून खड्डे भरण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली जात नाही. काही दिवसांपूर्वी आठवडाभर पावसाने विश्रांती घ्ोतली असताना ‘केडीएमसी'ने खड्डे भरण्याचे काम केले पाहिजे होते. परंतु, शहरातील खड्डे भरण्यासाठी ‘केडीएमसी'चे कोणतेही नियोजन, तयारी नसल्याचे आ. विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.

सदर खड्ड्यांमुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले असून त्यामुळे एखादी दुर्घटना घडली आणि शांत असणाऱ्या शहरातील वातावरण बिघडून विनाकारण गालबोट लागल्यास त्याला संपूर्णपणे केडीएमसी आयुक्त जबाबदार असतील, अशा शब्दांत आमदार भोईर यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त झाले नाही तर आम्ही आमच्या पध्दतीने ‘केडीएमसी'ला धडा शिकवू, असा इशाराही भोईर यांनी दिला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार लोकसभा निवडणुकीपूर्वी कल्याण मधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी ५० कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सदर विकासकामे सुरु करता येत नव्हती. त्याच अनुषंगाने गांधारी आणि रौनक सिटी येथील मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाचे  भूमीपुजन करण्यात आले. तर कल्याण पश्चिम मधील उर्वरित मुख्य रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम गणेशोत्सवानंतर सुरु होणार असल्याची माहिती आ. विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली.

सदर भूमीपुजन समारंभाला प्रभुनाथ भोईर, जयवंत भोईर, वैशाली भोईर यांच्यासह शिवसेना उपशहरप्रमुख सुनिल खारुक, रामदास कारभारी, डॉ. धीरज पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘मनसे'च्या लढ्याला पहिले यश