मुख्यमंत्र्यांची सुपारी घेऊन शिवसैनिकांना संपवण्याचा प्रयत्न कराल तर खबरदार!

नवी मुंबईत ‘शिवसेना'चा तडीपार मोर्चा

नवी मुंबई ः ईडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांची सुपारी घेऊन आणि शिंदेे गटाचे मांडलिकत्व पत्करुन जर पोलीस मातोश्रीच्या निष्ठावंतांना संपवण्याचा प्रयत्न करीत असतील तर खपवून घेतले जाणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे संयमी आहेत, म्हणून महाराष्ट्र शांत आहे. नाहीतर तुमची पळताभुई थोडी झाली असती. विनाकारण जर तुम्ही शिवसैनिकांना त्रास देत असाल तर आमच्या हातात आता मशाल आणि मनात विस्तव आहे. त्यामुळे आगीशी खेळण्याचा प्रयत्न करु नका, असा इशारा ‘शिवसेना'च्या वतीने नवी मुंबई आणि ठाणे पोलिसांना देण्यात आला. 


नवी मुंबई आणि ठाणे पोलिसांनी मातोश्रीच्या निष्ठावंत शिवसैनिकांवर शिंदेे गटाच्या इशाऱ्यावरुन सुरु केलेल्या खुनशी कारवाईच्या निषेधार्थ १९ ऑवटोबर रोजी नवी मुंबई पोलीस मुख्यालयावर धडक तडीपार मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे पाच हजार शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी मोर्चकऱ्यांनी ईडी सरकार आणि पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला.


दमदाटी करुनही मातोश्रीचे निष्ठावंत शिंदे गटात जात नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडी सरकारने पोलीस यंत्रणेचा गैरवापर करुन अनेक पदाधिकाऱ्यांना त्रास देण्यास सुरूवात केली आहे. नवी मुंबईतील ज्येष्ठ नगरसेवक ए. के. मढवी यांना तडीपार करण्यात आले आहे. शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या पोलीस संरक्षणात आचानक कपात झाली. अनेक पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांची छळवणूक सुरु झाली आहे. या खुनशी कारवाईचा जाब विचारण्यासाठी ‘शिवसेना'च्या वतीने १९ ऑवटोबर रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात बेलापूर येथील सीएनजी पंपाजवळ असलेल्या मैदानापासून झाली. या ठिकाणी सुरुवातील मोठी सभा घ्ोण्यात आली. त्यानंतर मोर्चा पोलिसांच्या खुनशी कारभाराचा निषेध करीत पोलीस आयुक्त कार्यालयाच्या दिशेने निघाला. एक तासानंतर सदर मोर्चा जुन्या महापालिका मुख्यालयासमोर आल्यानंतर पोलिसांनी अडवला. त्यानंतर ‘शिवसेना'च्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.  


सदर मोर्चात शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे, विधान परिषदचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, आमदार अजय चौधरी, सुनील प्रभू, विलास पोतनीस, संजय पोतनीस, सुनील शिंदे, मनिषा कायंदे, शिवसेना उपनेते विनोद घोसळकर, शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे, जिल्हाप्रमुख वि्ील मोरे, द्वारकानाथ भोईर, सुभाष भोईर, केदार दिघ्ो, बबन पाटील, शिरीष घरत, मनोहर भोईर, चंद्रकांत बोडारे, मधुकर देशमुख, आप्पा पराडकर, भाऊ चौधरी, संजय तरे, जिल्हा महिला संघटक रंजना शिंत्रे, विजया पोटे, निता परदेशी, सुवर्णा जोशी, ममता पाटील, विनया मढवी, युवासेना सहसचिव करण मढवी, आदि पदाधिकारी सहभागी झाले होते.


महाराष्ट्रात शांतता राहु द्या...
अलिबाबा आणि चाळीस चोरांचे सरकार आल्यापासून निष्ठावंत शिवसैनिकांना त्रास देण्याचा सपाटा पोलिसांनी लावला आहे. पोलिसांनी कायद्यानुसार काम करावे, कुणाचे तरी कार्यकर्ते म्हणून वागू नका. सरकार आज असले तरी उद्या जाणार आहे. त्यावेळी मात्र जितका त्रास दिला आहे तो व्याजासकट वसूल करू, असा इशारा यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी दिला.


माझ्या घरावर सरकार पुरस्कृत हल्ला...
‘शिवसेना'चा जन्म अन्यायाचा विरोध करण्यासाठी झाला आहे. त्यामुळे शिवसैनिक त्रासाला घाबरत नाही. माझे पोलीस संरक्षण काढल्यानंतर लगेच मध्यरात्री माझ्या घराबर हल्ला करण्यात आला. सदर हल्ला सरकारनेचे घडवून आणला आहे. असे कितीही हल्ले झाले तरी मी झुकणार नाही. प्राण गेले तरी शिवसेना सोडणार नाही, असे यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.


उपमुख्यमंत्र्यांविरुध्द शंभर गुन्हे...
एम. के. मढवी यांच्यावर दाखल झालेल्या १२ गुन्ह्यांपैकी १० गुन्हे निकाली निघाले आहेत. त्यांच्या विरोधात झालेल्या दोन एनसीवरुन त्यांना तडीपार करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शंभर गुन्हे दाखल आहेत, अशी कबुली त्यांनी स्वतःच दिली आहे. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी उपमुख्यमंत्र्यांना तडीपार करण्याची हिंमत करुन दाखवावी. सुपारी घेऊन त्रास देणाऱ्यांवर उद्या सेवेतून तडीपार होण्याची वेळ येणार आहे, असा संताप यावेळी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.


दम असेल तर एन्काऊन्टर करा...
एम. के. मढवी यांना एन्काऊन्टरची धकमी देणारे पोलीस उपायुक्त यांनी हिंमत असेल तर येथे येऊन एन्काऊन्टर करुन दाखवावे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्याप्रमाणे काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ‘शिवसेना'च्या माध्यमातून शासनाकडे करण्यात येणार आहे. एन्काऊन्टरची धमकी आणि तडीपारीची कारवाईवर येत्या अधिवेशनामध्ये आवाज उठवण्यात येणार आहे, असा इशारा विधान परिषदचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी यावेळी दिला. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

तूर्भेत शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे - ठाकरे गट भिडले