चारही ग्रामपंचायतींमध्ये विजयश्री खेचून आणू

पनवेल : केंद्र आणि राज्य सरकार आपले आहे आणि विकासाची दूरदृष्टी आमदार महेश बालदी यांच्यामध्येही आहे. त्यामुळे सुज्ञ मतदारांनी परिवर्तन आघाडीच्या मागे ठामपणे उभे राहावे. म्हणजे आपण चौकसह परिसरातील चारही ग्रामपंचायतींमध्ये विजयश्री खेचून आणू, असा निर्धार भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी  व्यक्त केला. ते चौक येथील भव्य जाहीर सभेत बोलत होते. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, मनसे व रिपाइं (आठवले गट) परिवर्तन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ पोतदार सभागृहात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला आमदार महेश बालदी, माजी आमदार देवेंद्र साटम, शिवसेना उपनेते विजय चौगुले, भाजप नेते विनोद साबळे, खालापूर तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे, लक्ष्मण पवार, मनसेचे आशिष चौधरी, गोपीनाथ जाधव, आरपीआयचे महेंद्र धनगावकर, प्रमोद महाडिक, पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका विद्या गायकवाड, चौक ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या उमेदवार गायत्री गणेश कदम व सदस्य पदाचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आमदार महेश बालदी यांनी येथील जनतेला सहा महिन्यांत वीज, पाणी, रस्ता देऊ, असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, उरण विधानसभा मतदारसंघासाठी १६० कोटी रुपये मंजूर केले आहेत. इरसाळ वाडीतील वेदना मला जाणवल्या आहेत. मोरबे धरणा खालील प्रश्नही सोडवू. चौकमध्ये प्रशस्त सभामंडप, मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल. गाव सुजलाम सुफलाम करू. माजी आमदार देवेंद्र साटम यांनी चारही ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे थेट सरपंचपदाचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले म्हणाले की, सध्या राज्यात जनतेचे सरकार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वेळ देणारे आहेत. आता आपले प्रशांत ठाकूर मंत्री व्हावेत. भाजप तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे यांनी सांगितले की, आमदार महेश बालदी यांनी चौक परिसरात विकासनिधी नऊ कोटी, तलाव सुशोभीकरण ४. ५ कोटी, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाचा पुनर्विकास करण्याचा इरादा केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये सत्ता देऊन विकासासाठी आमदार महेश बालदी यांचे बळ वाढवा.
 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सिद्राम ओहोळ यांच्यावर महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष पदाची जवाबदारी