श्रीरामांचे जीवनचरित्र प्रत्येकाने अभ्यासावे !

लक्षावधी वर्षांची थोर परंपरा आणि संस्कृती लाभलेला जगाच्या पाठीवरील एकमेव धर्म म्हणजे हिंदू धर्म. प्रभू श्रीराम हे सकल हिंदूंचे आराध्य दैवत त्यामुळे त्यांची जयंती अर्थात श्रीराम नवमी केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात अत्यंत उत्साहाने साजरी केली जाते. आदर्श राज्य म्हणून आजही रामराज्याचे उदाहरण दिले जाते.

साक्षात भगवान श्रीविष्णूंनी श्रीरामाचा अवतार घेऊन मनुष्याने आदर्शवत जीवन कसे जगावे याचा परिपाठ घालून दिला. श्रीरामांच्या चरित्राचा म्हणजेच रामायणाचा अभ्यास जगातील नामांकित विद्यापीठांतून आज केला जात आहे. आदर्श राज्यकारभार कसा करावा, जनतेचे पालन पोषण कसे करावे, जनतेच्या समस्या कशा सोडवाव्यात, राज्यावर येणाऱ्या संकटांचा सामना कसा करावा याचा बोध रामायणातून होतो त्यामुळे आपल्या राज्यकर्त्यांनी रामायणाचा अभ्यास करायलाच हवा. सध्याच्या काळात दिवसागणिक समाजाचे होत चाललेले नैतिक अधःपतन, बोकाळत चाललेली गुन्हेगारी, नात्यांतील दुरावा, एकमेकांवर कुरघोडी करण्याची वाढत चाललेली प्रवृत्ती, स्वार्थांधता यावर उपाय म्हणून श्रीरामांचे जीवनचरित्र आज प्रत्येकाने अभ्यासायला हवे.  

 सर्वार्थाने श्रीराम सर्वार्थाने आदर्श होते. त्याकाळी जेव्हा राजे आणि राजपुत्र एकाहून अधिक विवाह करत. त्या काळीही श्रीरामांनी एकपत्नीव्रत आचरले होते. पत्नीच्या हरणानंतर वानरांचे संघटन करून त्यांनी बलाढ्य अशा रावणाचा वध केला आणि सीतामातेची सुटका केली. अश्वमेध यज्ञाच्या वेळी यजमान म्हणून विधी करण्यासाठी पत्नीची आवश्यकता असताना त्यांना दुसरी पत्नी करण्याचा सल्ला दिला गेला; मात्र श्रीरामप्रभूंनी सीतामातेची प्रतिकृती बनवून तिला शेजारी ठेवले आणि यज्ञविधी पूर्ण केले. पत्नीशी एकनिष्ठ राहण्याचा आदर्श यानिमित्ताने त्यांनी जगासमोर ठेवला. आजमितीला समाजात अनैतिकता बोकाळलेली पाहायला मिळते. विवाहित असताना विवाहबाह्य संबंध ठेवले जातात. नात्याचा अडसर नको म्हणून लिव्ह इन रिलेशनशिपचा करार करण्याचे पाश्चात्यांचे स्तोम याला न्यायालयीन मान्यता मिळाल्याने भारतातही मोठ्या प्रमाणात माजू लागले आहे. देशातील सेलिब्रिटी मंडळी या कुप्रथेचे जाहीरपणे समर्थन करू लागली आहे. आजच्या तरुणांना लग्न करण्याआधी लिव्ह इनमध्ये राहण्याचा सल्ला देऊ लागली आहेत. भारतीय संस्कृतीला न शोभणाऱ्या या फॅडमध्ये आता गुन्हेगारीचा शिरकाव होऊ लागला आहे. सहकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या छळाचे, फसवणुकीचे गुन्हे नोंद होऊ लागले आहेत. एकमेकांचे जीव घेतले जात आहेत. आईवडिलांच्या विरोधाला न जुमानता घेतलेल्या निर्णयात फसवणूक झाल्याने काही मुली आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. कित्येक मुलींचे जीवन यामध्ये उध्वस्त होत आहे.

 शारीरिक गरजा भागवण्यासाठी अनैतिकतेला कागदी कराराचे नैतिक लेबल लावून निर्माण झालेल्या संबंधांत नात्याचा गोडवा कुठून येणार? नैतिकतेचा आदर्श प्रभू श्रीरामांनी आपल्यासमोर ठेवला आहे तो पुनर्जीवित करण्याचे दायित्व आजच्या पिढीवर आहे. वडिलांनीं सावत्र आईला दिलेल्या वचनाचा मान राखत प्रभू श्रीरामांनी १४ वर्षांचा वनवास पत्करला. एकीकडे राज्याभिषेकाची सिद्धता सुरु असताना अचानकपणे आलेला वनवास प्रभूंनी हसत हसत स्वीकारला. वनवासातून परतल्यानंतर कोणताही पूर्वग्रह मनात न बाळगता प्रभू श्रीरामांनी माता कैकयीचे पदस्पर्श करून आशीर्वाद घेतले. कुठे संपत्तीसाठी जन्मदात्या आईची हत्या करणारी आजची पिढी आणि कुठे वनवास देणाऱ्या सावत्र आईंशीही सख्ख्या आईच्या मायेने प्रेम करणारे प्रभू श्रीराम. रावणाचा वध केल्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार करण्यास विभीषण तयार नव्हते, अशावेळी ‘मरणांती वैराणी' या वचनानुसार प्रभू श्रीरामांनी बंधुत्वाच्या नात्याने रावणाचे अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शवली. संकटकाळात सुग्रीव आणि विभीषणाला साहाय्य करून प्रभू श्रीरामांनी मित्रत्वाचा आदर्श जगासमोर ठेवला. प्रभू श्रीराम एकवचनी होते. मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा सत्यच असायचा. वनवासात असताना श्रीरामांनी अनेक शापित जीवांचा उद्धार करून आपले अवतारत्व सिद्ध केले होते.

  भगवंताच्या कृपेने आणि श्रीरामभक्तांच्या प्रयत्नांनी ५०० वर्षांनंतर श्रीरामजन्मभूमीत राम मंदिर उभे राहिले, असेच प्रयत्न सुरु ठेवले तर रामराज्यही दूर नाही. रामराज्य म्हणजेच आदर्श राज्य. जिथे समस्त जीव गुण्यागोविंदाने नांदतील. जिथे सज्जनांचे रक्षण होईल आणि दुर्जनांचे निर्दालन केले जाईल. जिथे अनाचार, अत्याचार आणि भ्रष्टाचार यांना स्थान नसेल. राजधर्म काय असतो, राजाचे प्रजेपती काय कर्तव्य असते हे प्रभू श्रीरामचंद्रांनी आपल्या आचरणातून जगाला दाखवून दिले आहे. देशात रामराज्य आणायचे असेल तर राजकीय मंडळींवर विश्वास ठेवून चालणार नाही. रामराज्याची स्थापना सर्वप्रथम आपल्या मनात करावी लागणार आहे. त्यासाठी मनातील दोषांचे निवारण आणि गुणांचे संवर्धन करण्याचे प्रयत्न आपल्याला करावे लागतील. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे' या समर्थांच्या वचनानुसार सामाजिक स्तरावर कार्य करताना प्रत्येक वेळी भगवंताचे अधिष्ठान असणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रोहिडेश्वराला साक्षी ठेवून हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. साक्षात आई भवानीचे त्यांना आशीर्वाद होते. समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकारामांसारख्या महान संतांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

 महाराजांच्या मुखात सदैव जगदंब जगदंब हा जप असे. आई भवानीची कृपा आणि स्वराज्यनिष्ठ मावळ्यांची साथ यांच्या बळावर शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.नामस्मरणाचा महिमा अगाध आहे. नामस्मरणाने मनाची शुद्धी होते, सत्संगाने नामस्मरणाला चालना मिळते. अंतर्बाह्य शुद्धी होऊन अंतःकरणात रामराज्य आले की समाजात रामराज्य स्थापन होण्यास वेळ लागणार नाही. सर्वांनी संघटितपणे प्रयत्न केले तर असाध्य असे काहीच नाही. कधीकाळी असाध्य वाटणारे श्रीराम मंदिराचे ध्येय पूर्ण झाले. भारतभूमीमध्ये रामराज्याची पहाटही लवकरच पाहायला मिळावी यासाठी श्रीरामनवमीच्या पावनदिनी प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना करूया !
-जगन घाणेकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

भारतीय एडिसन - डॉ शंकर आबाजी भिसे