सतीचं वाण : जुन्या आठवणी
१९६९ साली नरसिंह यात्रेमध्ये नरसिंह नाट्य मंडळ या मंडळाने बसवलेली नाटके सादर होत असत. त्यावर्षी हनुमंत जयंती निमित्त आमच्या यात्रा कमिटीने सतीचं वाण हा एक अध्यात्मिक मराठी चित्रपट दाखवण्यात आला होता. हा चित्रपट पाहण्यासाठी चार-पाच गावचे लोक आले होते..हा मराठी चित्रपट रात्री दीड वाजेपर्यंत चालू होता. हा चित्रपट स्त्री-पुरुष आवडीने पाहत होते.
ग्रामीण भागामध्ये १९६९ साली करमणुकीची साधने अतिशय कमी होती. आमच्या लक्ष्मीच्या देवळामध्ये प्रत्येक एकादशीला भजनाचा कार्यक्रम ठरलेला असायचा. त्यावेळी एकतारी भजन किर्तन पोवाडे भेदिक असे कार्यक्रम असायचे. आमच्या ग्रामीण भागातील शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वतःच्या शेतामध्ये किंवा दुसऱ्याच्या बांधावर रोजंदारी करीत होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही शेतकरी मंडळी एकसारखी शेती कामांमध्ये व्यापून असायची. सकाळी सात वाजता गावातली गेलेली शेतकरी व त्यांच्या बायका यामुळे गावामध्ये कुणीच माणूस दिसत नव्हते. गावामध्ये वयस्कर मानसं तेवढी घरामध्ये असायची दिवसा रिकामा झालेला गाव सायंकाळी पाचनंतर गावाकडे त्यांची वळणारी पावले झपझप रस्ता कापत गाव जवळ करीत होती. ज्या शेतकऱ्याच्या जवळ बैलगाडी आहे असे शेतकरी बैलगाडीमध्ये वैरण वाळलेल जळण व बैलगाडीत बसलेली त्याची सुगरण दिवस मावळला म्हणजे गाडीतून यायची. बैलगाडीच्या पुढे पांढराशुभ्र खंड्या कुत्रा जणू गावाकडची वाट दाखवत आहे असे पाहणाऱ्याला वाटायचे. प्रत्येक वर्षी नरसिंह यात्रेला तमाशा किंवा एखादे नाटक असा कार्यक्रम ठरलेला असायचा. १९६९ साली नरसिंह यात्रेमध्ये नरसिंह नाट्य मंडळ या मंडळाने बसवलेले संसार करायचाय मला, रात्र वैऱ्याची आहे राजा जागा रहा, माझी जमीन, शिवा रामोशी, घरच्या म्हातारीचा काळ असे नाटकाचे कार्यक्रम यात्रेनिमित्त सादर होत होते.
नाटक रात्री नऊ वाजता चालू झाली म्हणजे. दीड वाजेपर्यंत या नाटकाचा कार्यक्रम संपत असे. रात्री दीडच्या नंतर तमाशाचा कार्यक्रम पहाटे पाच वाजेपर्यंत चालत असे. गावठी यात्रा आली म्हणजे माझ्या मनाला फार आनंद व्हायचा. पै-पाहुण्यांनी व गावातील लोकांनी गाव गजबजून जात असे. या यात्रेनिमित्त नांदायला गेलेल्या मुली माहेरी येत होत्या. आई-वडील भाऊ यांना सासरचं सुख किंवा दुःख अशी चर्चा रात्रभर चालत असे; हा एक प्रेमाचा ओलावा व मुलीचं सुख ऐकून तिच्या आईला झालेला आनंद हा अतिशय सुख देणारा असा आहे. यात्रेच्या दोन दिवसाच्या काळामध्ये प्रत्येकाची भरलेली घरे एकदा का रिकामी झाली. परत घर खायला उठते यात्रेचा आनंद काही वेगळा असतो हो! चालत असलेला तमाशा लहान मुलांनी वाजवलेल्या शिट्टया रात्रभर जागा असलेला गाव कार्यक्रम पाहण्यात अतिशय दंग होऊन जातो. देवळाच्या एका बाजूला चहा भजी गाडा आणि चहा पिण्यासाठी त्या गाड्यावर पडलेली माणसांची मगर्मिठी मला विशेष वाटत होती. मंडळी १९६९ ला हनुमंत जयंती निमित्त आमच्या यात्रा कमिटीने सतीचं वाण हा एक अध्यात्मिक मराठी चित्रपट दाखवण्यात आला होता. हा चित्रपट पाहण्यासाठी चार-पाच गावचे लोक आले होते...।
... धार्मिक चित्रपट असल्यामुळे माळावरच्या शाळेसमोरील पटांगण माणसांनी गजबजून गेले होते. कवा एकदा चित्रपट चालू होतोय याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती हा चित्रपट आबाजीराव पवार यांच्या कादंबरीवर आधारलेला होता. निर्मिती संस्था रसिक चित्र यांची होती. या चित्रपटाचे निर्माते दत्ताराम गायकवाड, दिग्दर्शक दत्ता धम्रााधिकारी पटकथा-संवाद अण्णासाहेब देऊळगावकर, संगीत प्रभाकर जोग आणि या चित्रपटाची गीते जगदीश खेबुडकर यांनी लिहिली आहेत. या चित्रपटामध्ये आशा काळे, कृष्णकांत दळवी, तारा किणीकर, श्रीकृष्णाच्या भूमिकेत धुमाळ, पूजा जोशी आणि बी मजनाळकर यांनी काम केले आहे. या चित्रपटामध्ये जगदीश खेबुडकर यांची अप्रतिम गाणी आणि संगीताचा बाज जमून आला आहे. या चित्रपटातील मला एक गाणे आठवते..‘किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला रात खेळू चला रंग उधळू चला आला आला गंं कान्हा आला अष्टमीच्या रात्री गं यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ कान्हाला नावे किती रोज खोड्या करुन गोपी बाळी जमून सांज सकाळी गोपालकाला. हे अतिशय महत्त्वपूर्ण गाणे अजूनपर्यंत माझ्या लक्षातून जात नाही हेच खरे. त्यावेळी ग. दि. माडगूळकर, जगदीश खेबुडकर, शांताराम नांदगावकर, पी सावळाराम ही मंडळी अतिशय फॉर्मात होती. यावेळी ब्लॅक व्हाईट फिल्म होती. नंतर या चित्रपटामध्ये पुढे पुढे इस्टमन कलर चित्र येऊ लागले. हा मराठी चित्रपट रात्री दीड वाजेपर्यंत चालू होता. हा चित्रपट स्त्री-पुरुष आवडीने पाहत होते. गावची जत्रा जवळ आली की मला काय गावात सर्वांनाच आनंद व्हायचा. गुढीपाडव्यापासून गावातील यात्रा कमिटी जत्रेसाठी वर्गणी गोळा करत असे. यात्रेच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी पुरणपोळीचा प्रसाद हा यात्रा कमिटीने घरटी गहू गोळा करून केलेला खिरीचा प्रसाद माझ्यातरी तोंडाला एकदम चव यायची. अशीही गावची जत्रा कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखी अशी आहे.
जुन्या आठवणी राहून-राहून आठवतात जुन्या आठवणी नवीन पिढीला प्रेरणादायी ठरतील असा विश्वास वाटतो मला. सतीच वाण हा चित्रपट अध्यात्मिक असून प्रेरणा देणारा असा आहे. या चित्रपटाची कथा या एक लेख मध्ये पूर्ण होऊ शकत नाही. सांगायचं झालं तर भक्ती केल्यामुळे माणूस कसा तरला जातो आणि कठीण परिस्थितीमध्ये देव प्रसन्न कसा होतो अशी ही अध्यात्मिक कथा. राहुन राहुन आठवण आली आहे. - दत्तात्रय पांडुरंग मानुगडे