एकत्र कुटुंबाचे सकारात्मक विचार आणि संस्कार
विभक्त कुटुंब पद्धतीमुळे प्रथम सासू सुना.. नंतर आजी आजोबा नाते जवळजवळ संपले आहे. एकत्र कुटुंबाचे सकारात्मक विचार आणि संस्कार हे आज कुठेही फारसे दिसत नाही. स्मार्टपणा वाढत चालला त्यांना स्मार्ट फोन मोबाईलवर अर्धा एक तास बोलण्यासाठी वेळ आहे. समोर बसून कुटुंबातील व्यक्तीशी बोलण्यासाठी वेळ आणि विषयच नाही.
कधी काळी भारत हा कृषिप्रधान देश होता. बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून कामधंदा, व्यवसाय व्यापार करायचे. त्यामुळेच एका कुटुंबाचा अनेक कुटुंबाशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण होत होते. त्यातूनच सामाजिक बांधिलकी म्हणून एकमेकांची खूप इज्जत करायचे. खानदानी नात्याला महत्व असायचे. त्यामुळे कोणीही कोणाबद्दल नकारात्मक विचार करतच नव्हते. कारण घराघरात सकारात्मक विचारांचे संस्कार लहानपणापासून होत होते. म्हणूनच एकत्र कुटुंबात नातू, पणतू झाले तरी कुटुंब एकत्र राहत होते. तेव्हा शिक्षणाला महत्व नव्हते, संस्कार महत्वाचे होते आणि ते पांच दहा मिनिटाच्या वागणुकीतून दिसून येत होते. हेच एकत्र कुटुंबाचे सकारात्मक विचार आणि संस्कार प्रेरणादायी आणि लक्षवेधी होते. आज ते जवळ जवळ संपले. २०२५ मध्ये आपण प्रवेश केला आहे. देशात लोकशाही होती, आणि लोक काय म्हणतील ही भीती २०१९ पर्यन्त होती. कोरोनाने माणसांना माणसात आणले होते, देवाची मंदिरे बंद झाली होती. माणसांची सेवा करणारी दवाखाने चोवीस तास उघडे होती. देवाची कितीही आराधना केली तर तो धाऊन येत नव्हता; पण माणसातील डॉक्टर देव चोवीस तास सेवा देण्यासाठी उपस्थित होता. तेव्हाही सकारात्मक विचार आणि संस्कार असलेला माणूस सेवा देत होता. नकारात्मक विचार आणि संस्कार असलेला माणूस डॉक्टर पैसे कसे काढता येतील हाच विचार करीत होता.
एकत्र कुटुंबाचे सकारात्मक विचार आणि संस्कार यामुळेच पांच भाऊ तीन बहिणी लग्न झाल्यावरही एकत्र कुटुंबात एकत्र स्वयंपाक करून एकत्र जेवत होते. पांच भावाच्या मुलामुलींचे लग्न होऊन त्यांना मुलंमुली होऊन त्यांचेही लग्न होऊन नातसुना घरात आल्यावरही एकत्र कुटुंब गुण्यागोविंदाने राहत होते. वडिलधाऱ्यांंना योग्य तो मान सन्मान दिला जात होता. घरातील आर्थिक व्यवहार मोठा भाऊ सांभाळत होता, कोणीही कधी कोणतीच तक्रार करीत नव्हता आणि त्यांच्या बायका कधीच आर्थिक व्यवहारात ढवळाढवळ करून विचारपूस करीत नव्हत्या, एवढे महान संस्कार त्यांचावर झालेले असत. आज विभक्त कुटुंबात नकारात्मक विचार आणि संस्कार मिळत असल्यामुळे मुला-मुलींना शिक्षण खूप मिळते पण संस्कार कुठेही दिसत नाही. आजची मुल शाळा महाविद्यालयातून पदव्या घेऊन बाहेर पडलेले आहेत. त्या पदव्यांमुळे त्यांना चांगली नोकरी मिळते, त्यानंतर बायको. मग नवीन संसार सुरु होते. बायकोला स्वतःचा टू बी एच के पलॅट पाहिजे. एकत्र कुटुंबात तिला गुदमरल्यासारखे होते. शिक्षण आणि संस्कार यातील फरक उघड होतो. मग सुरु होते महाभारत, रामायण. हेही एका महिलेमुळेच घडले होते खरे; पण त्यात एकही महिलेचा बळी गेला नव्हता. बळी सर्व पुरूषांचे गेले.
दोन सुशिक्षित मुलाचे वडील स्वर्गवासी झाल्यामुळे सर्व संपती आईच्या नांवे असते. आईच्या नावे असलेली जागा आपल्या नावावर करून घेण्याची सुप्त इच्छा मनात धरून आईच्या ताब्यासाठी दोन भाऊ भांडत होते. आईला विचारल्यावर ती म्हणाली जो माझ्या तीन औषधाच्या गोळ्यांची नावे एका झटक्यात सांगेल त्याच्याकड़े मी जाईन. दोन्ही भाऊ खजील झाले. हा एकत्र कुटुंबातील शिक्षण आणि संस्कार यातील फरक ठळकपणे आईने दाखवून दिला. एकत्र कुटुंबाचे सकारात्मक विचार आणि संस्कार. शिक्षणासाठी दूरदेशी गेलेल्या गरीब होतकरु मुलाने आईला पत्र पाठवले. त्यात त्याने लिहिले, इथे माझी जेवणाची चंगळ आहे. काळजी करु नकोस. आईने ते पत्र वाचून एक वेळेचे जेवण सोडले. कारण पत्राच्या शेवटी मुलाच्या अश्रुने शाई फुटली होती. मुलांला पत्र लिहून पाठवतांना जे लक्षात आले नाही, ते आईच्या कसे लक्षात आले? एकत्र कुटुंबाचे सकारात्मक विचार आणि संस्कार हा बदल दाखवून देतात.
भारताच्या कृषिप्रधान देशातील अशिक्षित अडाणी शेतकरी शेतातून कोणी खाण्याचे फळ, शेंगा, आंबे चोरून खाल्ले तर भांडत नव्हता. तर विचारून मागितले असते, तर दिले असते, चोरी करण्याची गरज काय होती असे बोलत होता. आताचा शेतकरी आंब्याच्या झाडावर चढून चोरुन आंबे काढणाऱ्या मुलांच्या पाठीत काठी घालून त्याला शिक्षा म्हणून किंवा थोडा वेळ धाक म्हणून त्या मुलांना झाडाला बांधून ठेवतो. त्यांची दखल निसर्ग घेतो आणि का कुणास ठाऊक पण त्यानंतर त्या झाडाला कधीच मोहर येतच नाही. निसर्गही शिक्षणातील व संस्कारातील फरक ओळखतो. कृषिप्रधान देशातील शेतकरी शेतातून दमून घरी आला की आई बाबा आजीचे पाय चेपून देत होता. ते पाहूनच त्या शेतकऱ्याचा मुलगा शिक्षण घेऊन मोठा साहेब झाला. शहरात आला. ऑफीसातून दमून घरी आल्यावर बाबाने आजीचे पाय चेपून दिल्याचे पाहून, नातीने न सांगता बाबाच्या पाठीला तेल लावून दिल्याचे पाहून आजी म्हणाली, "ताटातील वाटीत आणि वाटीतलं ताटात.” हेच संस्कार एकत्र कुटुंबात लहानपणापासून होत असतात. तेच शेतकऱ्याची मुल शिक्षण घेऊन शहरात गेले की संस्कार विसरतात. मग त्यांची मुल त्यांना घरात ठेवत नाही, तर वृद्धाश्रमात ठेवतात. हे आज खुलेआम केले जात आहे. कोणाची भितीच राहिली नाही. कारण एकत्र कुटुंबाचे सकारात्मक विचार आणि संस्कार राहिलेच नाही.
उच्चशिक्षित मुलांनी वडील गेल्यावर भावांनी संपतीची वाटणी केली. म्हाता-या आईला आपल्या घरी नेताना बहीण म्हणाली, मी खुप भाग्यवान, माझ्या वाट्याला तर आयुष्य आलंय. यातून आपण काय बोध घेणार आहोत? एकाच घरात मुलगा आणि मुलगी लहानची मोठी होतात. शिक्षण आणि संस्कार घेतात. मग हा फरक कसा पडतो? एकत्र कुटुंबाचे सकारात्मक विचार आणि संस्कार मुलामुलीवर होत असतात. मुलंमुली उच्च शिक्षण घेऊन मोठे झाले तरी घरातील संस्कार विसरत नाही. एक मुलगा आपल्या बाबांना म्हणतो बाबा मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही. कारण तू पण आजी आजोबांना सोडून कधीच कुठे गेला नाहीस. असे ऐकून कोणत्या बाबाला एकदम वडिलोपार्जित प्रॉपर्टी नावावर झाल्यासारखे फीलिंग आल्याशिवाय राहणार नाही.
एकत्र कुटुंबाचे सकारात्मक विचार आणि संस्कार कसे असतात? त्या कुटुंबातील मुलंमुली मोठी झाल्यावर कशी मदत करतात? एका मुलीच्या नवऱ्याचा मित्र भेटायला हॉस्पिटलमध्ये आला, तो खूपच आजारी होता म्हणून. जाताना मित्राच्या बायकोच्या हातात पाच हजार रुपयाचे पाकीट बळजबरीने कोंबून गेला. म्हणाला,लग्नात आहेर द्यायचाच राहिला होता. माझा दोस्त बरा झाला की छानसी साडी घ्या. त्या पाकिटापुढे आज सारी प्रेझेंट्स फोल वाटली तिला. कारण हे संस्कार एकत्र कुटुंबात होतात. एकत्र कुटुंबाचे सकारात्मक विचार आणि संस्कार महिला महिलांना कसे समजून घेतात. यावरच अवलंबून असतात. सध्या बाहेर इतके नकारात्मक विचार पेरले जातात की लोकांचा माणसातल्या चांगुलपणा वरचा विश्वास उडत चाललाय. अशावेळी अशा सकारात्मक विचारांच्या छोट्या छोट्या घटना माणसांना खूप मोठी प्रेरणा देऊन जातात. आपल्या मित्र मंडळीत नातलगाच्या कुटुंबात असा घटना आपण पाहतो पण बोलत नाही. त्या कोण किती गांभीर्याने घेतात हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे. पण मला त्या घटना कधी आवडतात, तर कधी वेदनादायक वाटतं. मी मग त्यांचे असे संकलन करून ठेवतो. त्या सर्व एकत्र केल्या की असा प्रेरणादायी आणि लक्षवेधी लेख तयार होतो.
विभक्त कुटुंब पद्धतीमुळे प्रथम सासू सुना.. नंतर आजी आजोबा नाते जवळजवळ संपले आहे. एकत्र कुटुंबाचे सकारात्मक विचार आणि संस्कार हे आज कुठेही फारसे दिसत नाही. स्मार्टपणा वाढत चालला त्यांना स्मार्ट फोन मोबाईलवर अर्धा एक तास बोलण्यासाठी वेळ आहे. समोर बसून कुटुंबातील व्यक्तीशी बोलण्यासाठी वेळ आणि विषयच नाही. हा प्रत्येक व्यक्तीच्या विचारातील सकारात्मक आणि नकारात्मक विचार आहे. जनावरे एकत्र राहतात; पण ते मुके प्राणी भावना समजून वागतात. आज माणसांना टू बी एच के, थ्री बी एच के मध्ये एकत्र राहून कोणाच्या कोणत्याही भावना समजत नाहीत. कारण काय? तर एकत्र कुटुंबाचे सकारात्मक विचार आणि संस्कार. लोकशाही संपल्यात जमा आहे. जागोजागी हुकुमशाही सुरू आहे त्या विरोधात बोलण्याची लिहीण्याची किंमत मोजावी लागते. विज्ञान झपाट्याने पुढे जात आहे. तरी आपण कुलदेवताचे नवस दर्शन घेतल्या शिवाय कोणतेच काम करण्याचा विचार करत नाही. आधुनिक तंत्रज्ञान नेटवर्क कॉम्प्युटर, मोबाईलला मिळत नसेल तर घरात वाय फाय बसवून घेतले जात आहे. त्यामुळे नेटवर्क चोवीस तास मिळावे हा महत्वाचा मुद्दा असतो. त्याचवेळी आपल्या समोर एकत्र कुटुंबाचे सकारात्मक विचार आणि संस्कार मात्र दिसत नाही. तर विभक्त कुटुंबाचे नकारात्मक विचार आणि संस्कार राज्यावर आणि देशावर राज्य करतांना दिसतात. गेल्या अनेक वर्षभरात आपण काय मिळविले आणि काय गमावले यांचा ताळेबंद आपणच मांडायचा असतो. पुढील काळात काय मिळवायचे आहे, हे आताच ठरवले पाहिजे. घर, घरातील कुटुंब, सोसायटीमधील कुटुंबांनी, गांव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देशातील एकूण कुटुंबांनी कोणत्या विचाराने संस्काराने जगायला पाहिजे. सकारात्मक विचार आणि संस्कार. म्हणजेच लोकशाही. नकारात्मक विचार आणि संस्कार म्हणजेच हुकुमशाही कुटुंबातील एक छायाचित्र आणि देशातील एक छायाचित्र स्पष्टपणे दिसते. भविष्यात काय स्वीकारावे ? - सागर रामभाऊ तायडे