आत्महत्या करू नका !

मागील दहा दिवसांत राज्यात आत्महत्यांची एकामागोमाग एक प्रकरणे उघडकीस आली आहेत. या सर्व घटना केवळ एका आठवड्यातील आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात गेल्या ६ महिन्यांत १०० हुन अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचे समजते. आत्महत्या तेच करतात.. ज्यांचे मन कमकुवत आहे. आत्महत्या हे मानसिक आजाराचे टोकाचे लक्षण आहे. भारतीय संविधानानुसार तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास टाकला, ज्याच्यासोबत सात जन्माची गाठ बांधण्यासाठी घरच्यांकडे हट्ट केला अशा माणसाने विश्वासाला तडा दिला, सासरच्यांनी हाल केले आणि एक सुशिक्षित सुज्ञ तरूणी आपल्या पोटच्या गोळ्याला एकटी टाकून परलोकवासी झाली. आज समस्त राज्याच्या भावना वैष्णवीच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आज वैष्णवीच्या सासरच्या मंडळींकडून आणि त्यांच्या वकिलांकडून जे आरोप केले जात आहेत, त्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. वैष्णवी हगवणे यांच्या सासरच्यांचा एका पक्षाच्या पक्षप्रमुखाशी थेट संबंध असल्याने हे प्रकरण सध्या हायप्रोफाईल बनले आहे. परिणामी समस्त वृत्तवाहिन्या या प्रकरणातील लहान सहान अपडेट्‌स जाणून घेण्यासाठी लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे चालू घडामोडींवर लक्ष टाकले असता मागील आठवडाभरात राज्यात आत्महत्यांची एकामागोमाग एक प्रकरणे उघडकीस आली आहेत. एप्रिल महिन्यात तळोजा परिसरात सोनम नावाच्या तरुणीने पोटच्या मुलीची हत्या करून स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या  प्रकरणाची आता उकल झाली असून वंशाला दिवा देऊ शकत नसल्याने सासरची मंडळी करत असलेल्या छळाला कंटाळून सोनमने आत्महत्या केल्याचे उघड झाले. परभणीतील एका २१ वर्षीय तरुणीनेही सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना या आठवड्यात घडली.  चुलत भावासोबत असलेल्या प्रेमसंबंधांना विरोध केल्याने उल्हासनगरातील एका १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटनाही  नुकतीच वाचनात आली. अंबरनाथ तालुक्यातील कुशीवली गावात एका प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. डोंबिवलीतील देसलेपाडा परिसरात राहणाऱ्या मोहित नावाच्या एका ३० वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेल्याने कर्जबाजारी झालेल्या मोहितने कर्ज चुकवणे अवघड झाल्याने आत्महत्या केल्याचे कारण पुढे आले आहे. चंदीगडमधील पंचकुला येथील सात जणांच्या संपूर्ण कुटुंबाने कर्जबाजारीपणामुळे विष प्राशन कल्याची घटना याच आठवड्यात घडली. या सात जणांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. रत्नागिरीतील एका पोलीस पाटलाने आत्महत्या केल्याची घटनाही नुकतीच घडली. या सर्व घटना केवळ एका आठवड्यातील आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात गेल्या ६ महिन्यांत १०० हुन अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्तही हल्लीच प्रकाशित झाले आहे.  

एका सर्वेक्षणानुसार देशातील १३ टक्के तरुण कोणत्या ना कोणत्या तणावामुळे ग्रस्त असतात. जगभरातील तरुणांच्या आत्महत्यांपैकी १० टक्के आत्महत्या केवळ भारतात होतात. हा आकडा दोन लाखांच्या घरात असतो, त्यातील एक लाख हे १५ ते ३५ वयोगटांतील असतात, नॅशनल क्राईम ब्युरोच्या आकडेवारीनुसार गेल्या काही वर्षांत आत्महत्यांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या, प्रेमात अपयश आल्याने तरुणांची आत्महत्या, दुर्धर आजाराने ग्रस्त झाल्याने रुग्णाची आत्महत्या, नोकरीत अपमानास्पद वागणूक मिळाल्याने नोकरदारांची आत्महत्या, व्यवसायात कर्जबाजारी झाल्यामुळे व्यावसायिकाची आत्महत्या, कामाचा ताण सहन न झाल्याने कर्मचाऱ्यांची आत्महत्या यांसारख्या घटनांचे सध्या पीक आले आहे. आलेल्या संकटाचा सामना करण्याची उमेदच संपून गेल्यामुळे मनुष्य आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. ऐन उमेदीच्या काळात आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्यामागे अनेक भौतिक आणि मानसिक करणे असू शकतात. मात्र आज हा टोकाचा निर्णय घेण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यामागे कुठेतरी आपणच कारणीभूत आहोत याचाही विचार आत्महत्या करणाऱ्याने करायला नको का? परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही किंवा परीक्षेत कॉपी करताना पकडले यांसारख्या क्षुल्लक कारणांमुळे विद्यार्थी आत्महत्या करतात. पालकांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाही, आपल्यामुळे आपल्या पालकांना खाली मान घालावी लागेल या विचाराने विद्यार्थी आपली जीवनयात्रा संपवतात; मात्र आपल्या अशा जाण्याने पालकांना आयुष्यभराचे दुःख आपण देऊन जात आहोत याचा विचार हे विद्यार्थी केव्हा करणार? मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी सुंदर सुंदर स्वप्न पाहिलेली असतात, क्षणात या साऱ्या स्वप्नांचा चुराडा होतो. प्रेमात अपयश आल्याने ऐन तारुण्यात तरुण तरुणी आत्महत्येचा निर्णय घेतात; मात्र हे करताना त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यासाठी आजतागायत किती काय केले आहे याचा विचार ते केव्हा करणार. अपेक्षित जोडीदार मिळणे हेच जीवनाचे ध्येय असते का? आपल्याला लहानाचे मोठे करण्यात आपल्या पालकांनी घेतलेले परिश्रम, त्यांनी आपल्याला लावलेली निरपेक्ष माया अशी क्षणात संपवून टाकायची असते का? नोकरीत अपमानास्पद वागणूक मिळते, इतरांची प्रगती होते मात्र आपल्याला डावलले जाते, वरिष्ठ अधिकारी आपल्याला घालून पाडून बोलतात, आपल्यावर कामाचा ताण टाकतात ही कारणे जीवनयात्रा संपवण्यासाठी कारणीभूत कशी काय असू शकतात. प्रयत्न केल्यावर, इतरांची मदत घेतल्यावर या सर्वांवर उपाय खरंच सापडणार नाहीत का ? शेवटी प्रत्येकाचे नशीब हे वेगवेगळेच असते. व्यवसायात कर्जबाजारी झाल्याने काही जण टोकाचा निर्णय घेतात; मात्र आपल्या आत्महत्या करण्यामुळे कर्जाची परतफेड होणार आहे का? आत्महत्या केल्याने तुमची मुक्तता होईल..मात्र तुमच्या घरच्यांनी काय अपराध केला आहे ? काहीजण याही पुढे जाऊन आपल्या मागे घरच्यांना त्रास नको म्हणून मुला बाळांना संपवून स्वतः आत्महत्या करतात. ज्या निष्पाप जीवांचे या सुंदर दुनियेत नुकतेच आगमन झाले आहे त्यांना संपवण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला ? त्यांना मारताना आपल्या काळजाला भेगा कशा पडत नाहीत? आपल्या कृत्यात त्या निष्पापांचा अपराध तो काय ?दुर्धरआजाराने कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांनी हे भोग आपल्याच पदरी का पडले आहेत, आपली कर्मे या सर्वाला कारणीभूत आहेत का? दुर्धर आजाराने ग्रस्त सर्वचजण आत्महत्या करतात का, हा विचार कधी केला आहे का? कोणत्याही संकटावर आत्महत्या हा उपाय असूच शकत नाही. घरातील एकाच्या आत्महत्येमुळे सारे कुटुंब विस्कळीत होते. आत्महत्या तेच करतात.. ज्यांचे मन कमकुवत आहे. आत्महत्या हे मानसिक आजाराचे टोकाचे लक्षण आहे. आजमितीला भारतात ज्या प्रमाणात शारिरीक आजाराविषयी जागरूकता आहे त्या तुलनेत कितीतरी पटीने मानसिक आजाराविषयी गैरसमज आहेत. प्रत्येकाला जसा शारीरिक आजार होऊ शकतो तसा जीवनातील प्रसंगानुरूप मानसिक आजारही उद्‌भवू शकतो, त्यासाठी वेळीच मानसोपचारतज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे असते; मात्र ‘मानसोपचार तज्ज्ञाकडे केवळ वेडेच जातात आणि आपल्याला काही वेड लागलेले नाही' असा फार मोठा गैरसमज भारतीयांत पसरला आहे, परिणामी सौम्य स्वरूपात असलेला मानसिक आजार कालांतराने उग्र स्वरूप धारण करतो आणि त्यातूनच पुढे आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. आत्महत्या करणाऱ्यांच्याप्रति समाज सहानुभूती दाखवत असला तरी भारतीय संविधानानुसार तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे.  आत्महत्या केली म्हणजे सुटका होईल या विचाराने आत्महत्या करणारा हे धाडस करतो, मात्र ही खऱ्या अर्थाने सुटका नसतेच असे अध्यात्म सांगते. अध्यात्मानुसार मानवासह प्रत्येक प्राणीमात्राच्या जन्म हा प्रारब्धभोग भोगून संपवण्यासाठी झालेला असतो. त्यामुळे जन्म आणि मृत्यू हे विधिलिखित असते. त्यामध्ये ढवळाढवळ करून स्वतःहून मृत्यू ओढवून घेतल्यास पृथ्वी लोकातील समस्यांपासून सुटका मिळेल; मात्र विधात्याच्या नियोजनात हस्तक्षेप केल्यामुळे आत्महत्या करणाऱ्याचा आत्मा पुढील अनेक वर्षे भुवलोकात हालअपेष्टा सहन करत तडफडत असतो. त्या सहन करून संपवल्याशिवाय त्याला पुढच्या योनीमध्ये जन्म मिळत नाही. ८४ लक्ष योनीचा फेरा पूर्ण केल्यानंतर मिळणाऱ्या मनुष्य जन्माचे सार्थक करणे विधात्याला अपेक्षित असते; मात्र स्वतःच्या कर्मदरिद्रीपणाने आत्महत्येसारखी पळवाट स्वीकारणाऱ्याची मृत्यूनंतरही सुटका नसते. त्यामुळे आत्महत्या करून सूटका होते हा केवळ गैरसमज आहे. - जगन घाणेकर 

 

 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

निलू निरंजना (चरित्र)