राडारोडा वाहून नेणाऱ्या डम्परवर भरारी पथकाची कारवाई

गेल्या महिनाभरात १३८ वाहनांवर दंडात्मक कारवाई


ठाणे  : हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात भरारी पथकांची पाहणी सुरु आहे. ८ डिसेंबर रोजी पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंदनगर नाका येथे भरारी पथकाने राडारोडा वाहून नेणाऱ्या दोन गाड्यांवर कारवाई केली.

ठाणे महापालिका उपायुक्त (परिमंडळ-२) आणि पर्यावरण विभाग यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत एकूण १४० डम्पर वाहने तपासण्यात आली. त्यापैकी दोन वाहने बांधकामाचा राडारोडा ठाणे महापालिका हद्दीत आणत होती. त्या वाहनांना जॅमर लावण्यात आला. तसेच, प्रत्येकी पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाईही करण्यात आली. महापालिका भरारी पथक आनंदनगर नाका परिसरात अचानक भेट देऊन नियम मोडून राडारोडा वाहून नेणाऱ्या कारवाई करणार आहे, अशी माहिती महापालिका उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली.

ठाणे महापालिका हद्दीत येणाऱ्या डम्परला राडारोडा वाहतुकीचा स्कॅन कोड असणे बंधनकारक आहे. तसेच, मुंबई महापालिकेचा राडारोडा वाहतुकीस परवानगी असल्याचा परवाना आवश्यक आहे.याशिवाय, गौण खनिजाची वाहतूक करताना त्याच्या रॉयल्टीची पावती सोबत असणे आवश्यक आहे. तसेच याबाबत माहिती देणारा फलक पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंदनगर नाका या भागात लावला जाणार आहे, असे मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी सांगितले.

आतापर्यंत, गेल्या महिनाभरात ठाणे महापालिका क्षेत्रात भरारी पथकांनी १३८ वाहनांवर कारवाई करुन ५ लाख १३ हजार रुपये दंड वसूल केला आहे. तर, कचरा जाळण्याच्या ५३ घटना नोंदवण्यात आल्या असून, कचरा जाळणाऱ्याकडून दंडापोटी २ लाख ९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

हवा प्रदूषण तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाईन
ठाणे महापालिकेने हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अमलात आणल्या आहेत. त्याचसोबत, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार, हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ठाणे महापालिकेची हेल्पलाईन (८६५७८८७१०१) सुरु करण्यात आली आहे. त्यावर आतापर्यंत २२ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. महापालिका क्षेत्रात होत असलेल्या हवेच्या प्रदूषणाबाबत नागरिकांनी ८६५७८८७१०१ या व्हॉट्‌सॲप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

उघड्यावर कचरा जाळणे, बांधकाम होत असताना परिसरात धूळ/धूराचा उपद्रव होणे, रस्त्यावरील बांधकाम कचरा/डेब्रिजची विना- आच्छादन वाहतूक, रस्त्यांच्या कामांमुळे होणारे धुळीचे प्रदूषण, बांधकामाचा कचरा इतस्ततः टाकला जाणे, हॉटेल-बेकरीमधून होणारे धूळ/धुराचे प्रदूषण, रसायनांचा येणारा उग्र वास, वाहनांचे अवैध पार्किंग, इत्यादी हवा प्रदूषणाबाबतच्या तक्रारी नागरीक हेल्पलाईनवर व्हॉट्‌सॲपद्वारे छायाचित्रासह नोंदवू शकणार आहेत. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 ‘एनआयए'च्या रडारवर राबोडी