जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून हारक्युलस हॉईस्टच्या कामगारांना भरघोस पगारवाढ आणि सुविधा 

कंपनी आणि कामगारांचा आदर्श उद्योग क्षेत्रासाठी लाभदायक- कामगारनेते जितेंद्र घरत 

पनवेल : जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील धामणी येथे असलेल्या हारक्युलस हॉईस्ट लिमिटेड कंपनीमधील कामगारांना भरघोस पगारवाढ व सोयीसुविधा देण्याचा करार संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि. १५) संपन्न झाला. 

            या कार्यक्रमाला अनपेक्षितपणे रायगडचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार रविंद्र चव्हाण माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व नवनिर्वाचित विधान परिषदेचे सदस्य श्रीकांत भारतीय यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी कंपनीतर्फे व्हाईस चेअरमन विवेक महेंद्रु व कंपनीचे सेक्रेटरी किरण मुकादम, संघटनेतर्फे अध्यक्ष जितेंद्र घरत, संघटनेच्या सचिव समिरा चव्हाण, संघटक रवींद्र कोरडे, चंद्रकांत कडू, युनिट अध्यक्ष विशाल बारस्कर, उपाध्यक्ष अविनाश जाधव, सरचिटणीस अल्ताफ शेख, चिटणीस कल्पेश मांडलेकर, खजिनदार कल्पेश मेहेतर, सह खजिनदार रविंद्र कुडपाने, सदस्य राम जाधव उपस्थित होते. 

        चार वर्षासाठी झालेल्या करारानुसार कामगारांना १२ हजार ५०० रुपयांची दरमहा पगारवाढ (पहिल्या वर्षी ४२००, दुसऱ्या वर्षी ३२००, तिसऱ्या वर्षी ३१०० व चौथ्या वर्षी २००० रुपये), ३० हजार रुपये बोनस, तीन लाख रुपयांचा फॅमिली मेडीक्लेम पाॅलीसी, सणांसाठी ७० हजार रुपये अड्वान्स, कामगारांना वार्षिक सहल, त्याचबरोबर रजा व इतर सेवा सुविधा मिळणार आहेत. या कराराचा ४३ कामगारांना लाभ मिळणार असून त्याबद्दल कामगारांनी संघटना व कंपनीचे आभार मानून आनंद व्यक्त केला. 

          यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जय भारतीय जनरल कामगार संघटना फार चांगले काम करीत आहे. कंपनी आपल्या कामगारांना सर्व सुविधा देत आहे तर आपण देखील कंपनीला उत्पादन वाढीसाठी मदत केली पाहिजे, हा चांगला उद्देश ठेवून कामगारही काम करत आहेत, त्यामुळे कंपनी आणि कामगारांची उन्नती होत आहे.  कंपनी आणि कामगार यांचे ऋणानुबंध महत्वाचे ठरत असून औद्योगिक क्षेत्राच्या हितासाठी उत्तम बाब असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले. 

           संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी या प्रसंगी करारा संदर्भात माहिती देताना सांगितले की, जय भारतीय जनरल कामगार संघटना स्थापन झाल्यानंतर पहिली संघटना हारक्युलस कंपनीत स्थापन झाली. कंपनी व कामगार यांचे संबंध एवढे चांगले आहेत कि गेल्या सहा वर्षांत एकदाही वाद निर्माण झाला नाही. प्रत्येक वेळी कोणताही प्रश्न निर्माण झाला की गुण्या गोविंदाने मार्ग निघतो. कामगार देखील अशाप्रकारे काम करतात की कंपनीला कधीच नाव ठेवायला जागा नसते. त्यामुळे कंपनी आणि कामगारांचा आदर्श उद्योग क्षेत्रासाठी लाभदायक आहे, असेही घरत यांनी नमूद केले.  

      

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते यांची घरवापसी