विद्यार्थ्यांना दिले अग्निशामक वापरण्याचे ज्ञान

शेतकरी शिक्षण संस्थेच्या शाळेत अग्निशामकाच्या वापराबद्दलचे मार्गदर्शन

नवी मुंबई : अग्निविषयक सावधानता बाळगणे फार गरजेचे आहे, फायर एस्टींग्वीशर आज जागोजागी आहेत; परंतु त्याचा वापर कसा करायचा हे माहीत असणे.. तेही दिवाळीसारख्या अधिककरुन फटाके उडवले जाण्याच्या दिवसांत जास्त गरजेचे आहे हे लक्षात घेऊन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली पाटील आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा पाटील यांनी घणसोली मधील शेतकरी शिक्षण संस्थेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी अग्निशामक आणि त्याचा प्रत्यक्ष जीवनात केला जाणारा वापर याविषयी प्रात्यक्षिक शिबिर ६ नोव्हेबर रोजी आयोजित केले होते.  

अग्निशामक प्रत्यक्ष वापर व त्याचे विविध प्रकार याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी उपस्थित प्रमुख पाहुणेे सुरेंद्र चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मोजक्या आणि सोप्या भाषेत, प्रत्यक्ष उदाहरणे देऊन अगदी सहज समजेल अश्या पद्धतीने माहिती दिली. त्यांनी सांगितले की बहुतेक सर्व अग्निशामक हे दिसायला गोल डब्यासारखे, (आतील कुपी) धातूच्या जाड पत्र्यापासून बनवलेले असतात. यात दोन पदार्थ असतात. त्यातला एक हा घन, द्रव किंवा वायू स्वरूपातील अग्निविरोधक पदार्थ असतो तर दुसरा कुपीमध्ये, उच्च दाबाखालील रासायनिक पदार्थ असतो, जो अग्निशामकाचा दांडा दाबल्यावर आतील अग्निविरोधक पदार्थ बाहेर फेकतो, याचा वापर करताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे नियोजन तसेच सूत्रसंचालनाची जबाबदारी शाळेतील शिक्षिका सौ.पूनम नलावडे  व सौ. वृषाली कारले यांनी उत्तमरीतीने पार पडली. विद्यालयाचे अध्यक्ष डी.बी.म्हात्रे आणि कार्यकारिणी, सौ. सुरेखा पाटील आणि सौ. वैशाली पाटील, विद्यालयातील शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी या साऱ्यांच्या योगदानातून हा कार्यक्रम पार पडला.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

इंदिरानगर सेवा वस्तीतील अभ्यासिकेला भेट