प्रा. मेघना मेहेंदळे यांचा ‘ज्ञानसाधना'च्या माजी विद्यार्थ्यांकडून कृतज्ञ सन्मान

आपल्या पाल्यांशी विश्वासाचे नाते निर्माण करा - प्रा. मेहेंदळे

ठाणे : आता तुम्ही विद्यार्थ्यांच्या नाही तर पालकाच्या भूमिकेत आहात, त्यामुळे चांगले पालक बना. आपल्या मुलांना स्वतंत्र विचार करु द्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा. विचारांचा वाद झाला तरी चालेल; पण त्यांच्याशी संवाद कायम राहू द्या. मुलांनी आपल्याशी मनातले बोललेच पाहिजे असे विश्वासाचे नाते निर्माण करा. त्यांना मार्ग दाखवा, दिशा दाखवा; पण त्याचे त्याला दडपण वाटेल असे वागू नका. त्यांचे दोस्त व्हा, अशा शब्दात आपल्या माजी विद्यार्थ्यांना पालकत्वाचे धडे देत ‘ज्ञानसाधना महाविद्यालय'च्या निवृत्त उपप्राचार्य तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. मेघना मेहेंदळे आपल्या माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्या जुन्या आठवणींमध्ये रमून गेल्या.

 ठाणे येथील ‘ज्ञानसाधना महाविद्यालय'च्या १९८४ ते २००५ वर्षांतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना नेमक्या १५ ऑगस्ट १९४७ या स्वातंत्र्यदिनीच जन्मलेल्या निवृत्त उपप्राचार्य प्रा. मेघना मेहेंदळे यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन ठाणे येथील स्व. दादा कोंडके ॲम्पिथिएटर येथे केले होते.

 अर्थशास्त्र सारखा क्लिष्ट विषय सोपा करुन सहजपणे उलगडणाऱ्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका, कुशल प्रशासक, ‘भारतीय महिला फेडरेशन ठाणे समिती'च्या अध्यक्ष म्हणून महिलांच्या न्याय-हक्कासाठी सजग असणाऱ्या महिला सक्षमीकरण चळवळीच्या प्रणेत्या, शासनाच्या बाल न्याय मंडळाच्या न्यायाधीश, महिला मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा आधारवड असलेल्या निस्सीम समाजसेविका अशा विविध अंगांनी समृध्द असणाऱ्या प्रा. मेघना माधव मेहेंदळे यांच्या संपन्न कारकिर्दीचा त्यांच्या वयाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना गौरव करण्याचे ‘ज्ञानसाधना महाविद्यालय'मधील १९८४ पासूनच्या विविध बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ठरवले आणि या कार्यक्रमाचे उस्फुर्त आयोजन करीत गुरुदक्षिणा दिली.

याप्रसंगी त्यांचा प्रेरणादायी जीवनपट उलगडणारा ‘कृतीशील सेवाव्रती' असा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. विद्यार्थिनींनी ७६ अंक स्वरुपातील उजळणाऱ्या दिव्यांनी त्यांचे औक्षण केले. माजी नगरसेवक तथा विद्यार्थी संजय तरे, ॲड. अनुराधा परदेशी आणि सर्व विद्यार्थी समुहाच्या वतीने त्यांस शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. त्यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन विद्यार्थी निवेदक मकरंद जोशी यांनी केले.

नवी मुंबई महापालिका जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी नेटके सूत्रसंचालन आणि एकनाथ पवळे यांनी आभार प्रदर्शन केलेल्या सदर अभिष्टचिंतन आणि कृतज्ञता सोहळ्याच्या आयोजनाची प्रमुख जबाबदारी महेंद्र म्हस्के, एकनाथ पवळे, प्रिती पाटील, सीमा कोंडे, योगिता कारखानीस, संतोष पांडव, संतोष धुरी, रविंद्र करमरकर, अजय कांबळे, प्रतिज्ञा शिंदे, अनिल कदम, सचिन पाटील, सविता कुऱ्हे, सरिता जाधव, अजित देशमुख, रमेश सांडभोर या माजी विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पार पाडली. माजी विद्यार्थी मोहनीश कळसकर, सुनिता सुर्यवंशी, मिनल साळवी यांनी बहारदार गीते सादर करीत कार्यक्रमात स्वररंग भरले.

दरम्यान, ‘ज्ञानसाधना'च्या २२ वर्षाच्या अध्यापन कारकिर्दीतील सर्व बॅचेस मधील मुला-मुलींनी एकत्र येत माझ्या अभिष्टचिंतनासाठी आयोजित केलेला सदर सोहळा माझ्याकरिता अत्यंत सुखावह असा गोड धक्का असून सेवानिवृत्तीनंतर १८ वर्षांनीही विद्यार्थी आपल्याला विसरलेले नाहीत. तो अविस्मरणीय आणि अनमोल असा ठेवा आहे, अशा शब्दांत प्रा. मेघना मेहेंदळे यांनी भावना व्यक्त केल्या. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

अखेर शिक्षण विभागाकडून १७८ शिक्षकांची भरती पूर्ण