पालकांनी शाळेत दिलेले नंबर सुरक्षित राहत नाहीत का?

 ‘खाजगी क्लासेस'च्या ‘फोन कॉल'ने पालक हैराण

वाशी : २ जून २०२३ रोजी दहावी परीक्षाचा निकाल लागला असून, विद्यार्थ्यांची ११वी प्रवेश प्रकिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या दोन महिन्यांच्या कालावधीत खाजगी क्लासेस चालकांनी त्यांच्या क्लास मध्ये प्रवेश घ्यावा म्हणून ‘फोन कॉल'चा पाऊस पाडला आहे. परंतु, खाजगी क्लासेस मधून सतत येणाऱ्या फोन कॉलमुळे पालक वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पुणे शहरानंतर नवी मुंबई शहराला शिक्षणाची दुसरी पंढरी बोलली जाते. त्याचाच फायदा घेत नवी मुंबई शहरात ‘खाजगी क्लासेस'चे पेव फुटले आहे. त्यामुळे अकरावीतील विद्यार्थ्यानी  आपल्याच क्लासेस मध्ये  प्रवेश घ्यावा म्हणून दहावीच्या परीक्षेपासूनच परीक्षा केंद्रांवर  घिरट्या घालत खाजगी क्लासेस चालक सावज शोधत होते. तर आता दहावी परीक्षाचा निकाल लागून दोन महिने होत आले आहेत.  यावर्षी अकरावी प्रवेश प्रकिया अंतिम टप्प्यात असून, प्रवेशासाठी लगबग सुरु आहे.मात्र, याच दरम्यान खाजगी क्लासधारकांनी त्यांच्याकडे शिकवणी लावावी म्हणून ‘फोन कॉल'चा अक्षरशः पाऊस  पाडला आहे. तर वेळी-अवेळी येणाऱ्या ‘फोन कॉल'मुळे पालक वैतागले असून,  शाळेत नोंदणी केलेले फोन नंबर परस्पर खाजगी क्लासेस चालकांंकडे जात असल्याने पालक नाराजी व्यक्त करीत आहेत.


मागील काही दिवसांपासून आम्हाला आमच्या पाल्यांचे ११वी करीता खाजगी क्लासेस मध्ये प्रवेश करावा म्हणून सारखे फोन येत आहेत. मात्र, आम्ही ‘खाजगी क्लास'ना कुठेही आमचा फोन नंबर दिला नसताना देखील खाजगी क्लासेस मधून प्रवेशासठी फोन येत आहेत. त्यामुळे पालकांनी शाळेत दिलेले नंबर सुरक्षित राहत नाहीत का?, असा प्रश्न सतावत आहे. -  मनिषा भोईर, पालक. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

ठाणे महानगरपालिकेकडून ठाण्यातील  विद्यार्थ्यांचा सन्मान