पालकांनी तालुका, महापालिकेच्या पडताळणी समितीकडून पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन

आरटीईः निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ८ मे पर्यंत मुदतवाढ
 

ठाणे ः वंचित गटातील आणि दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक स्तरावरील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यतचे शालेय शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. या प्रवेश प्रक्रिया अंतर्गत सन २०२३-२४ या वर्षासाठी ऑनलाईन लॉटरी पध्दतीने निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी ८ मे २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पालकांनी प्रवेशपत्र तसेच हमीपत्राची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका, महापालिकेच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन ‘जिल्हा परिषद'चे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे.

आरटीई अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके आणि सहा महापालिका कार्यक्षेत्रात ५ एप्रिल २०२३ रोजी लॉटरीची प्रक्रिया राज्यस्तरावरुन पूर्ण करण्यात आली आहे. या लॉटरी निवड यादीमध्ये ठाणे जिल्ह्यातील एकूण १०,९९६ अर्जांची निवड झाली आहे. यामधील अद्यापपर्यंत केवळ २१४५ बालकांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत. निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी ८ मे २०२३ पर्यंतच मुदतवाढ देण्यात आली आहे. पालकांनी प्रवेशपत्र तसेच हमीपत्राची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका, महापालिकेच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून विहित कालावधीत ८ मे पर्यंतच आपला प्रवेश निश्चित करावा. यानंतर प्रवेश निश्चित झाल्याची पावती आणि कागदपत्रे शाळेत जमा करुन प्रवेश निश्चित करावा. प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर लघुसंदेश (एसएमएस) प्राप्त होतील. परंतु, फक्त लघुसंदेशावर अवलंबून न राहता ‘आरटीई'च्या वेबसाईटरील अर्जाची स्थिती या सदरामध्ये अर्ज क्रमांक लिहून आपल्या पाल्याची निवड झाली अथवा नाही, याची खात्री करुन घ्यावी.

निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील. प्रवेश प्रक्रियेतील अडचणींसाठी संबंधित तालुका, महापालिका कार्यक्षेत्रातील सक्षम अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. प्रवेशासाठी जाताना आरटीई वेबसाईटवर पालकांसाठी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.

अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत, त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि साक्षांकित प्रती पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित करावा. आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन कारेकर यांनी केले आहे. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

नमुंमपा शाळेतील शिक्षण व्हिजनचा नावलौकिक