बोर्डाच्या परीक्षा केंद्रांवरील संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना

इयत्ता १२वी, १०वी परीक्षा कालावधीत कोकण विभागात कॉपीमुक्त अभियान

नवी मुंबई ः ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ'तर्फे यावर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या इयत्ता १२ वी आणि इयत्ता १० वी च्या परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे गैरमार्ग प्रकार होऊ नये यासाठी कोकण विभागात ‘कॉपीमुक्त अभियान' राबविण्यात येणार असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.

‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ'तर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) ची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ या कालावधीत तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) ची परीक्षा २ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा कालावधीत परीक्षा केद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून ‘कॉपीमुक्त अभियान' राबविण्यात  येणार आहे. या अभियन अंतर्गत परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे गैरमार्ग प्रकार होणार नाहीत. याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्था चालक यांचे उद्‌बोधन  करण्यात येणार असून, सदर ‘अभियान'बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी तसेच परीक्षा सुरळीत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी विभागनिहाय तसेच जिल्हानिहाय भरारी पथक, दक्षता समिती आणि बैठे पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

इयत्ता १२ वी आणि इयत्ता १० वी या विद्यार्थांच्या जीवनातील महत्वपूर्ण टप्प्यावरील परीक्षा निकोप वातावरणात होण्यासाठी तसेच त्यातून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सदर महत्वपूर्ण अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधी ते स्थानिक स्तरावरील सरपंचांपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. -डॉ. महेंद्र कल्याणकर, विभागीय आयुक्त-कोकण. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी टाकाऊतून टिकाऊ स्पर्धा