नेरुळमध्ये १७ वर्षाखालील मुलींच्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेचे १० सामने

नवी मुंबई ः नवी मुंबईत १७ वर्षाखालील मुलींच्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेचे १० सामने होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत आणि फिफा (१७ वर्षा आतील) महिला फुटबॉलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडुंना यश संपादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात ‘३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा-२०२२' मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडुंना ध्वज प्रदान आणि ‘१७ वर्षाखालील मुलींची वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा-२०२२ यजमान शहर बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी क्रीडा मंत्री गिरीष महाजन, क्रीडा विभागाचे सचिव रणजीत सिंह देओल, आयुक्त सुहास दिवसे, ‘फिफा'चे प्रतिनिधी रोमा खान, ‘अखिल भारतीय फुटबॉल महासंघ'चे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण पदक विजेते चिराग शेट्टी, महाराष्ट्र कबड्डी संघाच्या सोनाली शिंगटे यांना ध्वजप्रदान करण्यात आला.

फिफा महिला फुटबॉल वर्ल्ड कप सारख्या जागतिक दर्जाच्या महिलांच्या फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात राज्याने घ्ोतलेल्या पुढाकारामुळे महिला फुटबॉल क्रीडा प्रकाराचा राज्यामध्ये प्रसार होण्यास आणि महिलांनी या खेळात सहभागी होण्यास उत्तेजन मिळणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी. तसेच युवकांना मैदानी खेळासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. भारतात पहिल्यांदाच फिफा महिला (१७ वर्षाखालील) फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे यजमान पद महाराष्ट्र राज्याला मिळाल्याचा आनंद असल्याचे सांगून या स्पर्धांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा-२०२२ गुजरात येथे २७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत होणार आहे.  या स्पर्धेत देशभरातील ७ हजार खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये राज्यातील ८०० खेळाडुंचे पथक रवाना होणार असून, ध्यानचंद पुरस्कारार्थी प्रदीप गंधे पथक प्रमुख असणार आहेत. कबड्डी, खो-खो, हॉकी, स्केटिंग, कुस्ती, मल्लखांब, फुटबॉल, वॉटरपोलो, बॉक्सिंग अशा ३४ क्रीडा प्रकारात सहभागासाठी महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यावश्यक सुविधांसह पूर्व प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्यामध्ये क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी शासनाने खेळाडुंना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रवकमेत वाढ केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्यांना १० लाख रुपये देण्यात येत होते. आता ती रक्कम ५० लाख रुपये एवढी करण्यात आली आहे. रौप्य पदक विजेत्यांसाठी ७.५० लाखाऐवजी ३० लाख, तर कास्य पदक विजेत्यांसाठी ५ लाखाऐवजी २० लाख एवढी रक्कम करण्यात आली आहे, असे क्रीडा मंत्री गिरीष महाजन म्हणाले.
याचबरोबर ११ ते ३० ऑक्टोबर पर्यंत नवी मुंबई मध्ये ‘फिफा (१७ वर्षाखालील) महिला वर्ल्ड कप इंडिया-२०२२'चे आयोजन शालेय शिक्षण, क्रीडा विभाग आणि फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. भारतात सदर सामने पहिल्यांदाच होणार असून १२ ते ३० ऑवटोबर पर्यंत डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर १० सामने होणार आहेत. सदर सामने पाहण्यासाठी जास्तीत जास्त खेळाडुंसह विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन क्रीडा मंत्री महाजन यांनी केले आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

विज्ञान, गणित शिक्षकांसाठी ठाणे जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न