महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
नमाज, प्रार्थना, प्रेअर आणि जून महिन्याचा लेखाजोखा...!
ही घटना असेल साधारण पाच सहा वर्षांपूर्वीची ! त्या दिवशी मंगळवार होता मला चांगलं आठवतंय... कारण या दिवशी मी सकाळच्या वेळी सेंट अँथनी चर्च कॅम्प येथे असतो. तिथे असताना, रस्त्यावर भिक्षेकऱ्यांमध्ये तपासताना, एका सुटाबुटातल्या माणसाने कार थांबवून मला ‘ऑर्डर' दिली, आमच्या बिल्डिंगच्या बाहेर एक माणूस निपचित पडलाय, बहुतेक मेलेला असेल, भिकारी वाटतो तो मला, बघून घ्या एकदा...!
तो कारमधून सुसाट निघून गेला, बिचाऱ्याच्या महत्त्वाच्या मीटिंग असतील. घराबाहेर एक माणूस ‘मेला' असेल, पण त्याने काय फरक पडतो ? मीटिंग महत्त्वाची.! असो, ज्याला प्रतिष्ठा नसते, अशा व्यक्तीसाठी तो गेल्यावर... मेला हाच शब्द वापरतात... बाकी कालकथीत, कालवश, पैगंबरवासी, दिगंबरवासी, कैलासवासी, देवाघरी... असे शब्द फक्त प्रतिष्ठा असणाऱ्यांनाच मिळतात.
माझ्याही भीक मागणाऱ्या लोकांना, गेल्यावर तरी प्रतिष्ठा मिळेल का? यासाठी जगताना त्यांनी काय करायला हवं? हा किडा तेव्हापासून डोक्यात वळवळतो आहेच...असो, मी रस्त्यावर निपचित पडलेल्या या तरुणाला पाहिले, तो जिवंत होता, त्यानंतर लगेच त्याला ऍडमिट केले, जवळपास पाच लाख रुपये खर्च आला, तो आपणच सर्वांनी मिळून भागवला. (मी एकट्याने नाही) पूर्ण बरा झाल्यानंतर समजले, याला सर्व काही काम येतं, स्वयंपाक, वेल्डिंग, फॅब्रिकेटिंग, पेंटिंग, वायरिंग, अजूनही बरंच काही...!
डिस्चार्जच्या दिवशी मी त्याला भेटायला गेलो, त्यावेळी डोळ्यात कृतज्ञता होती..पाया पडून, हाताचे चुंबन घेऊन, मध्येच आकाशाकडे बघत अल्लाहकडे तो माझ्यासाठी काहीतरी मागत होता...कृतज्ञता कशी व्यक्त करावी, हे त्याचं त्याला समजत नव्हतं...! ‘भाई घर मे कौन है?' मी सहज विचारलं.
‘कोई नही सर अकेला हूँ...'
‘कोई तो होगा ना भाई...'
‘न्नहि स्सर... कोई न्नही' प्रत्येक शब्दावर दाब देत तो म्हणाला. राम कहो या रहीम कहो, उन्ही की भरोसे जिंदा हूँ..'
‘ठीक है, इतना कुछ क्वालिटी तुम्हारे पास है, तो कुछ काम करो, मांगने के लिये रस्ते पे मत आना' असं म्हणून मी तिथून निघालो.
तो परत मागे आला, नमाज पढण्यासाठी जसे हात जुळतात, तसेच जुळवत तो म्हणाला, ‘मै आपके एहसान कैसे चुकाऊ सर...?'
वैयक्तिक माझ्या आयुष्याच्या सुरुवातीला, मला एका भीक मागणाऱ्या आजोबांनी मदत केली होती, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, मी पुढे भिक मागणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाचे काम सुरू केले आहे.... मी सुद्धा त्याकाळी त्यांना विचारले होते, 'तुमच्या उपकारातून मी कसा उतराई होऊ...?'
ते म्हणाले होते, ‘मला काहीही परत करू नकोस बाळा, जे काही तुला द्यायचे आहे, ते समोरच्या अडलेल्याला दे... आणि त्याला सुद्धा हेच सांग की तुझी पात्रता निर्माण झाल्यानंतर, तू पुढे ही मदत पुढच्या नडलेल्याला दे... साखळी चालू राहू देत...साखळी बंद नाही झाली पाहिजे....!'
अर्थातच मी त्यालासुद्धा सांगितले, ‘बाळा कोणीतरी माझ्यावर उपकार केले होते, मी त्याची परतफेड म्हणून तुला मदत केली... आता ही मदत मला परत न करता, तू पुढे एखाद्या अडल्यानडल्या व्यक्तीसाठी कर, म्हणजे एक साखळी तयार होईल... साखळी बंद नाही झाली पाहिजे....!'
त्याच्या चेहऱ्यावर भला मोठा शून्य होता..त्याला काय आणि किती समजले मला माहित नाही! मी तिथून निघून गेलो, नमाजासाठी जोडलेले हात घेऊन तो तसाच शून्यात बघत होता! पुढे जवळपास दोन वर्षे त्याचा माझा संपर्क झाला नाही, एकदा अचानक एका गॅरेजमध्ये काम करताना मला तो दिसला, त्याला काम करताना पाहून मला आनंद झाला.मी गाडीवरून उतरून त्याला मिठी मारली, पुन्हा तो अहसान वगैरेच्या गोष्टी करू लागला आणि पुन्हा मी त्याला सांगितले, कोणालातरी पुढे मदत कर रे... साखळी चालू राहिली पायजे भावा...
पुन्हा तो शून्यात...त्याला काय आणि किती कळलं साखळीविषयी मलाच समजलं नाही...नमाजासाठी जोडलेला हात मात्र पुन्हा तसाच.! यानंतर पुन्हा त्या गॅरेजवर गेलो, परंतु तो दिसला नाही.! परत भीक मागायला सुरुवात केली असेल, असं समजून मी निराश झालो. पुढे कधीतरी कॅम्प भागात मला तो ओझरता दिसला, यावेळी त्याच्यासोबत एक आजी होती...
मी त्याला गाठलं, ‘भाई कहा थे तुम?'
‘सर, दुसरा अच्छा जॉब मिल गया, वो छोड दिया...' तो हसत म्हणाला
‘बढीया यार....ये साथ में कौन है?' मी आजीकडे पाहत विचारले.
‘ये मेरी आई है सर...'
‘आई'? मी बुचकळ्यात पडलो
या जगात माझे कोणीही नाही, हे खूप पूर्वी त्याने मला ठासून सांगितले होते... तो माझ्याशी त्यावेळी खोटं बोलला होता...मला वाईट वाटलं.
‘भाई तुने मुझे बोला था, तेरा इस दुनिया मे कोई नही है, फिर ये अम्मी बीच मे कहा से आ गयी?' मी जरा रागाने विचारलं. ‘झूठ बोला उस वक्त तुमने' त्याने हातात घेतलेला माझा हात मी झटकून बोललो.... माझी नाराजी त्याला स्पष्ट दिसली.
तो हसला, आणि प्रथमच मराठीत बोलला, ‘सर, तसं काय नाय ओ...एका दिवशी ही आई मला रस्त्यावर मेल्यागत पडलेली दिसली...मला मी आठवलो.. मीपण असाच रस्त्यावर पडलो होतो....परत सर तुम्हीसुद्धा आठवला...मला तुम्ही ऍडमिट केलं होतं...मग मी पण तीला ससूनला ऍडमिट केलं. ती बरी झाली.... बरी झाल्याव मी म्हणलं, मावशी आता कुटं सोडू तुला ?
मावशी म्हणाली, ‘मी आता कुटं जावू ? मला ना मूल... ना बाळ... जिथून आनलं होतंस, तिथंच सोड मला रस्त्यावर बाळा'
मलापण अम्मी नाही... पण, असती तर मी तिला रस्त्यावर सोडलं असतं का ?
मंग मी तीला आई म्हणून डायरेक दत्तकच घेतलं ना सर... सरळ माझ्या झोपडीत घेऊन आलो, हां, आपल्याकडे हयगय नाय... उसकू बोला, अब तेरेको मय बच्चा हय, खाने का.... मस्त रयनेका... टेन्शन मेरे उप्पर छोडनेका...
आता दिवसभर मी गॅरेजवर काम करतो, भाजी विकायचा मी तिला व्यवसाय टाकून दिला आहे, ती दिवसभर भाजी विकते, संध्याकाळी आम्ही मायलेकरं एकत्र भेटतो,
सुखदुःख वाटून घेतो आणि जेवण करून मस्त झोपून जातो, टेन्शन कायकु लेनेका...?त्याच्या बोलण्यात, वागण्यात कोणताही बडेजाव नव्हता... आपण काहीतरी विशेष केलं आहे हा भाव नव्हता....!
‘आई म्हणून डायरेक् दत्तकच घेतलं ना सर....!' त्याच्या या वाक्यांनी मी किती वेळा रडलो असेल, याचं मोजमापच नाही... येड्या, तु किती मोठा झालास आता तुला कसं सांगू...? लोक स्वतःच्या सख्ख्या आई बापाला रस्त्यावर आणून बिनधास्त सोडून निघून जातात, अशा दुनियेमध्ये कोणीतरी एक जण आई दत्तक घेतो...! कित्येक जण आई बापाला आंबा समजून, गोड रस आणि गर खरवडून काढून खातात आणि पूर्ण खाऊन झाल्यानंतर त्यांना कोय म्हणून उकिरड्यावर फेकून देतात...! खरंतर ही कोय नसते.... ते बीज असतं...!!! हे बीज पुन्हा जमिनीत रुजवायचं असतं... प्रेमाचं खत घालून, मायेनं प्रेमाची धार सोडायची असते... दारात मग उमलतात आई बापाचे अंकुर, पुढे विशाल वृक्ष होऊन, हेच आई बाप आयुष्यभर आशीर्वाद देत राहतात... सावली होऊन...! जे इतरांना समजलं नाही ते याला कसं समजलं असेल?
‘तुला कसं सुचलं हे ? सांग ना, सांग की...' त्याचा खांदा गदागदा हलवत मी त्याला म्हणालो.
नमाजसाठी जोडतात तसे पुन्हा हात जोडत, आकाशाकडे पाहत शांतपणे तो म्हणाला, ‘इन्शाअल्लाह, तुमी साकळी बंद झाली नाय पाहिजे म्हनला होतात, मी कायीच नाई केलं, मी फक्त आईपर्यंत साकळी ओढत आणली... साकळी तुटू नाही दिली सर, मैने अपनी जबान रक्खी सर..!'
‘येड्या, मला वाटलं साखळीची ही गोष्ट त्यावेळी तुला समजलीच नाही...तुझा चेहरा त्यावेळी शून्य होता...निर्विकार होता...! '
‘बस क्या सर... मय वेल्डिंगवाला बंदा हू, लोखंड बिखंड से खेलना यही हमारा काम है....पयले मैं तुमकू साकळी कैसा चाहिये समजा नय... पन बाद मे मेरकू पता चला तुमकू लोखंड का साकळी नय चाहिये... तुमकू रिश्तो का साकळी चाहिये... फिर देक आपुन ने ये बना दिया..जो तुमको मांगता है वैसा....'
तो त्या आईकडे बघत म्हणाला !
‘नात्यांना वेल्डिंग करणारी अशी माणसं निर्माण झाली तर नाती तुटणार नाहीत... किंवा नात्यांना जोडणारा असा एक वेल्डर आज आपल्या प्रत्येकाच्या घरात हवाय...!'
‘वेड्या लोखंडाचं काम करता करता, तू स्वतःच आज सोन्याचा दागिना झालास ' मी बोललो. यावेळी त्याच्या डोळ्यात पाणी होतं ?..... की आभाळात ? मला समजलं नाही, कारण आज तोच आभाळ झाला होता...! आभाळ होऊनही नजर खाली जमिनीकडे होती. पोरं अशी नारळाच्या झाडागत खऱ्या अर्थाने उंच होतात, तेव्हा मूळ म्हणून जमिनीत रुतलेल्या बापाचे हात, केव्हाच आभाळाला टेकलेले असतात...! मी त्याला घट्ट मिठी मारली... दोघांच्याही डोळ्यात पूर... एरव्ही पुराचे पाणी अडवायचे असते... पण आम्ही दोघांनीही यावेळी बांध घातलाच नाही...!या वेळचा पूर चांगला होता...! आधीची काहीही पार्श्वभूमी माहीत नसल्यामुळे शेजारी उभी असलेली अम्मी गोंधळून एकदा त्याच्याकडे, एकदा माझ्याकडे पाहत होती.
मी अम्मीला ‘अम्मी सलाम आलेकुम' म्हणालो, वालेकुम अस्सलाम बेटा, असं उत्तर येईल असं मला वाटलं...
ती म्हणाली, ‘आशीर्वाद बाळा माझं नाव आहे...' शुद्ध मराठी नाव आणि आडनाव ऐकून मी त्याच्याकडे विचित्र नजरेने पहात गोंधळून पाहिलं...अरे ही तर...' पुढे मला बोलू न देता, तो हसत म्हणाला, ‘माँका धरम कहा होता है सर ? माँ तो माँ होती है... माँ होना यही उसका धरम है... आप उसको अम्मी बुलावो, आई बुलावो, अव्वा बुलावो, भगवान बुलावो, या फिर अल्लाह बुलावो....!'माँ तो माँ होती है... माँ का धरम कहा होता है स्सर ?'
यावर माझ्याकडे शब्द नव्हते! डिग्रीचा कागद फ्रेम करून, भिंतीला चिटकवून, ‘सुशिक्षित' असल्याचा मी बुरखा पांघरतो... आणि अडाणी तो... माणुसकी जपत... त्याच्याही नकळत सुसंस्कारित ‘माणूस' होऊन जातो.... इथं जिंकलं कोण? हरलं कोण ??माझे डोळे भरून आले... नमाज साठी जोडतात तसे माझे हात आपोआप जुळले... नजर आकाशाकडे गेली...नमाजसाठी जुळलेल्या माझ्या हातांकडे पाहून आश्चर्याने म्हणाला, ‘सर आप नमाज?'
‘बाळा, मस्जिदमध्ये जाऊन जेव्हा हात जुळतात, बोटं एकत्र येतात, तेव्हा नमाज अदा होते..मंदिरात जाऊन जेव्हा हात जुळतात, बोटं एकत्र येतात, तेव्हा प्रार्थना केली जाते ....चर्चमध्ये जाऊन जेव्हा हात जुळतात, बोटं एकत्र येतात, तेव्हा झेबी होते...पण समाजात, तळात- गाळात, जाऊन जेव्हा तुझे हात जुळतात, बोटं एकत्र येतात आणि तू कोणाला तरी मदत करतोस, त्यावेळी ती सेवा होते....!अशा प्रकारची सेवा करताना आपोआप नमाज, प्रार्थना आणि प्रेअर एकत्रच होऊन जाते...मग तो कोणत्या का जाती-धर्माचा असेना बाळा...!!!'
ओया अल्लाह, म्हणत, त्याचे हात देवापुढे जोडले जातात, तसे प्रार्थना करण्यासाठी यावेळी जुळले....!आणि माऊली म्हणत तो माझ्या पायाशी झुकला.... माऊली म्हणतच मीही त्याला मिठी मारली...!!! रस्त्यातच मला वि्ील भेटला....! आता गाड्यांचे कर्कश्य हॉर्न मला टाळ मृदुंगाप्रमाणे मधुर भासू लागले... रस्त्यावरची माणसं मला वारकरी वेशात दिसू लागले..वारीला न जाताही, प्रत्यक्ष पांडुरंगाने याच्या रूपात आज मला दर्शन दिले...वि्ीला इथेच दर्शन दिलेस, इथेच झाली वारी...आता सांग मी कशाला येऊ पंढरपुरी...?
(इथे मला सांगायला अत्यंत अभिमान आणि आनंद वाटतो, या तरुणाला आपण आपल्या सेंटरमध्ये प्रॉडक्शन मॅनेजर ही महत्त्वाची पोस्ट दिली आहे. कच्चा माल आणण्यापासून ते प्रॉडक्शन होईपर्यंत, त्याची क्वालिटी राखणे संपूर्ण ही जबाबदारी याची आहे.) आमच्या प्रॉडक्टमध्ये जर काही चांगले आढळले तर, त्याचे श्रेय माझ्या या मुलाचे आहे...काहीही वाईट आढळले तर सर्वस्वी मी जबाबदार आहे...!!!तर आता आणखी काय लिहू माऊली?
आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने बिबवेवाडी येथील प्रशिक्षण व रोजगार केंद्र सुरू आहे. या केंद्रामार्फत ५० अंध, अपंग, वृद्ध लोकांना रोजगाराची संधी मिळाली आहे. पूर्वी भीक मागणाऱ्या सर्व मुलांच्या शिक्षणाची सोय झाली आहे. इतकी वर्षे अजय कटारिया साहेब मदत करत होते, सध्या ते आपल्यातून निघून गेले. एक पोकळी निर्माण झाली, परंतु तरीही सरांचे चिरंजीव, चिराग कटारिया, यांनी हा वारसा पुढे चालू ठेवला आहे ..पोकळी भरून काढली आहे... सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य मिळाले आहे. रस्त्यावरील वैद्यकीय सेवा, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणे, अंगात असलेले कला कौशल्य शोधून त्यांना व्यवसाय टाकून देणे, या सर्व बाबी सुरू आहेत. अमोल शेरेकर या माझ्या सहकाऱ्याने (जे स्वतंत्रपणे दिव्यांग व्यक्तीच्या हक्कासाठी लढा देतात ) यांच्या माध्यमातून माझ्याकडे असलेल्या अनेक दिव्यांग लोकांना बॅटरीवर चालणारी दुचाकी मिळाली आहे. माझ्या या दिव्यांग बांधवांचा त्रास कमी केल्याबद्दल अमोल तुम्हाला नमस्कार !
अमोल यांच्याच माध्यमातून आपण रस्त्याकडेला पडून असलेल्या बांधवांना, तसेच हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या अत्यंत गरीब रुग्णांना, अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून अन्नदान करत आहोत. सांगण्यासारखं अजून बरंच काही आहे....! खूप कमीत कमी लिहायचं म्हणतो...पण, सासरहून बऱ्याच दिवसांनी आलेली मुलगी, माहेरी आल्यावर, आई-बाबा, दादा आणि ताई, वहिनी सोबत बोलताना थांबत नाही.... माझी सुद्धा अवस्था तशीच होते...! माझं हे लांबलेलं बडबड गीत, इतरांच्या आयुष्याचं जीवन गाणं आहे... पण, आई-बाबा, दादा, ताई, वहिनी... तुम्हा सर्वांमुळेच तर मी हे करू शकलो... मग तुम्हाला नको सांगू तर कोणाला सांगू....? तुमच्या शिवाय माझं दुसरं आहेच कोण...
लेखनकाल : ३० जून २०२५
-डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे डॉक्टर फॉर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे