महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
देव कुठे असतो?
सावित्रीबाई घाईत होत्या. देवीचा उत्सव जवळ आला होता.. त्याना एकटीला एवढी तयारी करायची होती.. मदतीला त्यांंचा भाऊ जगदीश येतो दरवर्षी, पण त्याचा संसार मोठा, वीस गुरं होती गोठ्यात, शेती मोठी; शिवाय आंब्याच्या बागा.. घरी गाडीमानसं रोज.. त्याचे दोन मुलगे, सुना सर्वजण राबत होती म्हणून.. तरी ताईच्या मदतीला जगदीश येतोच.
सावित्रीबाईचें दोन मुलगे अनंता आणि वसंता. दोघेही मुंबईत. अनंता फायझरमध्ये चिकटला, त्याचा पगार, बोनस मोठा.. शिवाय त्याची बायको अंजली शाळा मास्तरीण. त्याला एक मुलगा.. अनंताचा मोठा ब्लॉक मुलुंडमध्ये. शिवाय चारचाकी गाडी, घरी एसी वगैरे. वसंता एका स्कुलबसवर ड्रायव्हर, त्याची बायको वनिता कपड्याच्या दुकानात कामाला. त्याना दोन मुली. मुंब्य्राच्या चाळीत संसार. सतत ओढातांड पैशाची. त्यामुळे सतत भांडण नवराबायकोमध्ये. सावित्रीबाईंनी ऐशी पार केलेली, आता पाय गुढगे कामातून गेलेले, नजर कमी झालेली, ऐकू कमी येऊ लागलेले. घरवाले गेले त्यापासून एकटी राहिलेली.. त्यामुळे जेवण करायचा आळस, त्यामुळे खाणे कमी. त्यामुळे अंगात ताकद कमी झालेली. भाऊ जगदीश किंवा त्याचे मुलगे अधूनमधून यायचे.. घरी केलेले माशाचे कालवण आणुन दयायचे.. मग त्या दिवशी त्या भात शिजवायच्या आणि दोन घास जेवायच्या.. बाकी दिवशी चहा आणि दोन बिस्किटे यावर दिवस काढायच्या.
त्यांच्या भावाला - जगदीशला ताईची काळजी वाटायची, तो ताईला ‘आपल्या घरी चल असं म्हणायचा. पण सावित्रीबाईना ते योग्य वाटायचे नाही. एकतर रोज देवींची पूजा करायची असायची आणि वर्षातून एकदा देवीचा उत्सव असायचा. तो माघ पौर्णिमेचा देवीचा उत्सव म्हणजे त्या गावची शान होती. गेल्या कित्येक वर्षांपासून त्या दिवशी देवींची पूजा व्हायची. चार ब्राम्हण चार तास पूजा करायचे... मग महाआरती दोन तास चालायची. मग देवीचा प्रसाद.. तो प्रसाद घयायला लोक गर्दी करत. सायंकाळी बायका ओटी भरायला येत.. गाऱ्हाणे घालत. रात्री भजने होत. सावित्रीबाईंचे दोन्ही मुलगे मुंबईत. त्याना आधी यायला जमायचे नाही. कसेबसे आधल्या रात्री येऊन पोचत. त्यांचा नवरा होता, तोपर्यत त्याना काळजी नसे, पण आता थकायला झाले.. एक दिवस त्या आपल्या भावाशी बोलायला लागल्या..”जगदीशा, माका आता झेपणा नाय रे.. डोळ्यांनी धड दिसणा नाय.. हे दोघे झील आधल्या दिवशी येतले.. पुढे पुढे या देवीचो उत्सव कसो होतलो.”
"मी इचारतंय अनंताक.. कायतरी मार्ग काढुक होयो.”
दुसऱ्या दिवशी जगदीश मामाने भाच्याला म्हणजे अनंताला फोन लावला.."अनंता, तुझी आई आता थकली रे.. वय झाला ना.. आता तूझ्या आईचो आणि देवीच्या उत्सवाचो काय तरी विचार करा.. तुम्ही दोघांनी.”
"होय मामा.. आता आई थकली.. देवीच्या पूजेचोपण प्रश्न आसा .. आणि वार्षिक उत्सव पण. देवींची पूजा बंद होता नये.. या देविमुळे आमच्या कुटुंबाची भरभराट झालीय..यंदा गावक देवीचो उत्सव करूया आणि पुढच्या वर्षीपासून माझ्या घरी मुलुंडमध्ये..”.
"आणि आई तुझी.. तिका आता झेपत नाय रे.. तिकापण घेऊन जा.”
"मी अंजलीक विचारून सांगतंय.. नायतर आई वसंताकडे रवात.. थोडे दिवस माझ्याकडे रवात.”
"काय ता ठरवा.. मी वसंताकपण फोन करतंय..” असं म्हणून जगदीशमामांनी फोन खाली ठेवला. जगदीशमामाने वसंतला फोन लावला..”वसंता, यंदा उत्सवाक इलास काय देवीच्या पूजेचो, वार्षिक उत्सवाचो आणि आईचो प्रश्न मिटवूक होयो. तुझी आई आता थकलीया.. तिका दिसत नाय.. कानाने व्यवस्थित ऐकू येना नाय.. अनंताक फोन केल्लंय.”
"मग काय म्हणता माझो दादा? तो पैसोवालो आसा.. तेची जागा मोठी आसा.. मी चाळीत दोन खोल्यात रवतंय..”
"पण दोघांनी काय ता ठरवा.. अनंता म्हणालो, मी देवी माझ्याकडे नेताय.. आईक वसंता नेता काय विचारा..”
"माझी जागा केदी? माझे दोन मुली..”
"बरा बरा .. तू इलंस उत्सवाक. मग बोलूया.”
अनंताने भावाला फोन केला आणि दोन्ही भावांनी गावच्या घरातील देवी मुंबईला आणायचे ठरविले. मग दोन्ही भावांनी जगदीशमामाला फोन करून हा निर्णय सांगितला. मामा आपल्या ताईकडे आला आणि तिला म्हणाला "ताई, तूझ्या दोन्ही झिलांनी फोन केल्लो, दोघांचा मत देवी मुंबईक नेऊया, कारण रोजची पूजा कारणा आसाच; पण येदोमोठो वार्षिक उत्सव, तेची तयारी करुची तुका जमाचा नाय..तेंका तयारीसाठी लवकर गावक येना जमणा नाय आणि दुसरा महत्वाचा म्हणजे या घरपण पडाक झाला, एकतर दुरुस्थ करूंक होया, नायतर नवीन बांधूक व्हया.. त्यापेक्षा देवी मुंबईक नेणा बरा. देवीबरोबर तू पण झिलाकडे जा.. झील, सुनो, नातवंडा यांच्यात म्हातारपण घालवशीत.”
"होय बाबा.. आता झेपणा नाय.. आता नातवंडाबरोबर पुढचा आयुष्य..” सगळ्या गावात बातमी पसरली. खानोलकरा देवी मुंबईला नेत आहेत, त्यामुळे यावर्षीचा या गावातील शेवटचा देवीचा उत्सव. सगळ्या गावाची विशेषतः महिलांची या देवीवर श्रद्धा होती, त्या श्रद्धेने देवींची ओटी भरत, तिला नवस बोलत. जगदीशमामाला माहित होते, या गावातील देवीचा शेवटचा उत्सव, हे लोकांना कळले आहे, त्यामुळे यावर्षी गर्दी होणार, म्हणून त्यानी आपल्या मुलाला सांगून मंडप उभा केला. चारही बाजूला पताका लावल्या, इलेक्टिक तोरणे लावली. मुख्य रस्त्यापासून घरापर्यत वाट सारवली.. सारं घर शेणाने सारवले.. रांगोळ्या घातल्या. मग देवीच्या पूजेची तयारी. देवीचा मुखवटा रंगवून घेतला.. देवघराची झाडलोट केली.. रंग काढला. एक दिवस आधी अनंता आणि त्याची बायको आली. आल्या आल्या अनंताने घरात काय काय हवे आहे, त्याचा अंदाज घेतला, तसे जगदीशमामाने बहुतेक सर्व तयारी केली होती, किराणा सामान, पंचे, केळीची पाने तयार होती. अनंताने कुडाळला जाऊन फुले, वेण्या आणल्या आणि तो पूजेसाठी येणाऱ्या भटजीना भेटायला गेला. वसंता आणि त्याची बायको वनिता दुपारी आली. थोडे खाऊन ती दोघे वाडीत आमंत्रण द्यायला गेली. प्रत्येक घरी जाऊन उद्या देवीच्या उत्सवाला या, असे आमंत्रण देत होती. राजाभाऊ हे त्यांच्या वडिलांचे मित्र. वसंतला पहाताच ते म्हणाले.. ”काय आता हो शेवटचो उत्सव देवीचो गावातलो..”
"होय काका, आईक आता जमणा नाय.. तिचा वय झाला.. ह्या उत्सवाची तयारी मोठी...जगदीशमामाचा पण वय झाला... मामा म्हणाले, तुम्ही आता ही देवी तुमच्याकडे न्या, कारण तिची रोज पूजा होऊक होयी आणि हो उत्सवसुद्धा..”
"मामाचा बरोबर आसा.. पण वसंता.. तुका एक सांगतंय.. मी तूझ्या बाबाचो दोस्त.. ही देवी म्हणजे लक्ष्मी देवीचो अवतार.. तुजा पणजोबानी काशीहुन घरात आणलेली. जो हेची पूजा करीत आणि ज्या घरात हिची पूजा होईत, त्या घराची ही देवी भरभराट करतली. तुज्या पणजोबाकडे काय व्हता? भिकारी होतो.. पण देवींची पूजा करूंक लागलो आणि परिस्थिती बदलली.”
काकांचे हे बोलणे ऐकून वसंतांची बायको चमकली. तिने नवऱ्याला खुणा केली.. चला म्हणून. वसंता बाहेर पडला तशी वनितापण त्याच्यासोबत बाहेर पडली. ती नवऱ्याला म्हणाली "ऐकलेत ना.. काका काय म्हणाले ते.. जो कोण या देवींची पूजा करेल आणि ज्या घरात ही देवी असेल, त्या घराची भरभराट होईल.. तुमचे बाबा गेल्यापासून तुमचा मोठा भाऊ दरवर्षी पूजा करत आलाय.. तरीच त्त्यांची परिस्थिती एकदम टॉप.. चार खोल्यांचा ब्लॉक, मोटर.. आता या वर्षी तुम्ही पूजा करा आणि देवी आपल्या घरी नेऊया आणि तुमची आई तुमच्या भावाकडे....”
"अग पण.. तो मोठा आहे ना.. त्याचाच मान असतो पूजा करण्याचा.”
"पण यावर्षी तुम्ही पूजा केलीत तर काय होईल? मी सांगते मामांना.. यावर्षी आमचे हे पूजेला बसतील म्हणून. आणि देवी मात्र कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरी न्यायची... तरच आपली परिस्थिती सुधरेंल.. मलापण ब्लॉकमध्ये राहायचय.. माझ्या मुलींना चांगले नवरे मिळायला हवेत...”
"अगंपण आपली जागा एव्हडीशी.. त्यात देवींची पूजा.."
"मी करीन ॲडजस्ट बरोबर... आणि तुमच्या म्हातारीला आपल्या घरी नको हा... आता त्यांच्या म्हातारपणात कोण बघणार त्यांचेकडे?"
उत्सवाची तयारी जोरात सुरु होती, आधल्या रात्री लाईटची तोरणे पेटली तसेच आंब्याचे टाळ सगळीकडे लागले. वाडीतील प्रत्येक घरातील तरुण उत्सवाच्या तयारीसाठी हजर होता. घरात वाडीतील बायका जेवणाच्या मदतीसाठी आपल्या काखेत विळी घेऊन हजर झाल्या. काही बायका तांदूळ वेचत होत्या, काही पीठ मळत होत्या.. काही भाजी चिरत होत्या... काही नारळ फोडत होत्या.. खोबरे किसणे सुरु होते... देवघरात देवीचा मुखवटा पूजेसाठी तयार होता. फुलांनी सुशोभीत करणे सुरु होते. गंध, फुले, अगरबत्ती,कापूर सर्व तयार होते. फुले, वेण्या, तुळशी, बेल, दुर्वा सर्वकाही होते. सर्व तयारी करून मंडळी रात्री उशिरा झोपली. सकाळी लवकर ब्राम्हण मंडळी येणार होती.. म्हणून सर्वाना पहाटे उठायचे होते.. पूजा आणि घरात जेवणाची तयारी. पहाटे घरातील सर्व मंडळी उठली. जगदीशमामा पूजेच्या तयारीसाठी देवखोलीत तयार होता.मोठया भावाने अनंताने आंघोळ करून तो पूजेचे सोवळे नेसत होता, लहान भाऊ वसंताने पण आंघोळ केली आणि तोपण सोवळे नेसायला आला.चारही भटजी हजर झाले आणि पूजेची तयारी करू लागले. सर्व तयारी मनासारखी झाली, तसे मुख्य भटजी बोलले "यजमान..” तसा सोवळे नेसलेला अनंता देवखोलीत आला, तेवढ्यात वसंतांची बायको वनिता देवखोलीत आली आणि जगदीशमामाला म्हणाली.. "मामा, पूजा हे करतील.. यांनापण अधिकार आहे ना?”
मामा तसेच भटजी तिच्याकडे पहात राहिले. "अधिकार दोन्ही भावांका आसता.. पण ज्येष्ठ भाऊ असताना..” हे बोलणे ऐकून मोठया भावाची बायको अंजली आत आली.. "मामा, पूजेला माझा नवरा बसेल, कारण वडिलांनंतर मोठया भावाचा अधिकार.. त्याला शक्य नसेल तर दुसरा.. पण इथे मोठा भाऊ सोवळे नेसून तयार आहे, काय हो भटजी?”
भटजी गडबडीने म्हणाले "हो.. हो.. बरोबर आहे.. म्हणजे मोठा भाऊ..”
"भटजींना काय विचारतेस? तू मोठी पैसेवाली ना.. त्यांना मोठी दक्षिणा देत असशील म्हणून..”
"मी भटजीना कधी दक्षिणा देत नसते.. हे मामाच देतात.. भटजी शास्त्राप्रमाणे बोलणार..” हे मोठयामोठ्याने बोलणे ऐकून त्यांची आई बाहेर आली. "जगदीश, काय झाला?”
"दोन्ही भावांनी पूजेक बसण्याची तयारी केल्यानी.. वनिता म्हणता माझो नवरो पूजेक बसतलो..”
"मोठया भावान पूजा करुची आसता.. तेव्हा अनंता तूच पूजेक बस.. सावित्रीबाई म्हणाली. तशी वनिता आणि वसंता रागाने बाहेर गेले. पूजा सुरु झाली.. आत वाडीतील पंधरा बायका जेवण करण्याच्या गडबडीत होत्या.. एक एक पदार्थ शिजत होता.. सावित्रीबाई सर्व गोष्टीवर लक्ष ठेऊन होत्या.. बाहेर जगदीशमामा पूजेच्या ठिकाणी काय हवे काय नको ते पहात होते. हळूहळू गावकरी जमू लागले.एवढ्या बायका पुरुष घरी आले होते; पण वसंता आणि त्याची बायको वनिता कशात नव्हते. त्याना राग आला होता... पूजेला बसायची इच्छा होती. पण सर्वांनी मोठा भाऊ म्हणून...
"म्हणून त्यांची भरभराट होत असते, कळले काय?" त्यांना मोठया कंपनीत नोकरी.. ती मास्तरीण.. तिचा पोरगा हुशार... म्हणून ती भांडत आली.. माझा नवराच पूजेला बसणार.. पण यावेळी मागे हटायचे नाही.. देवी आपल्यच घरी न्यायची.. ती परत हट्ट करेल.. पण ऐकायचे नाही..वनिता आपल्या नवऱ्याला सांगत होती. घरी पूजा झाली.. मग महा आरती.. मग महाप्रसाद... सायंकाळपर्यत लोक जेवत होती आणि आपसात बोलत होती..
"या देवीचो या गावातलो शेवटचो उत्सव.. आता देवी मुंबईक जातली. आता यापुढे उत्सव मुंबईक.. गावातल्या स्त्रिया भावुक झाल्या होत्या... मंदा काकू सांगत होती.. ”माजा चेडू अभ्यासात मागे व्हता.. या देवीक नवस बोललंय.. पुढच्या वरसापासून कधी नापास झाला नाय..”
संध्या सांगत होती "माझो नवरो दारू पी, मी देवीक नवस बोललंय.. तेची दारू सुटली.” प्रत्येक बाई आपला अनुभव सांगत होती. सावित्रीबाईना नमस्कार करत होती. सावित्रीबाईपण भावुक झाल्या होत्या.. आता देवी मुंबईला चालली, म्हणजे आपणपण मुंबईक.. पुढचे देवीचे उत्सव मुंबईत. आपण लग्न करून आलो या गावात त्या दिवसापासून या गावात आणि या घरात राहिलो.. आता देवी आणि आपण..दोघेही...
देवीचा उत्सव झोकात पार पडला.. आता देवी चालली मुंबईला म्हणून अनेकांचे डोळे पाणावले. दुसऱ्या दिवशी विसर्जन करून उत्सव संपला. सावित्रीबाई, जगदीशमामा, दोन भाऊ आणि त्यांच्या बायका एकत्र बसल्या. मामा म्हणाले ”तुमी दोघांनी देवीचा रुपडा मुंबईक न्यायचा असा ठरविलात.. पण मुंबईत खय? दोघांची दोन घरा आसात आणि तुमची आई.. तिकापण न्हेवक व्हया.”
"मी मागेच सांगितले आहे, देवी माझ्याकडे आणि आई वसंताकडे.. माझी मोठी जागा..”
"तुजी मोठी जागा.. मोठी जागा.. देवीला जागा कितीशी लागते.. एक फूट फळी ठोकली की देवी राहते.. बाबा गेल्यापासून तू देवींची पूजा करत राहिलास म्हणून तुला दिवस बरे आले.. आता मला तिची सेवा करू द्या.. माझेपण दिवस बरे येउदे.”
तेवढ्यात अनंताची बायको मध्ये बोलली "देवी आम्हीच नेणार.. तिचा वार्षिक उत्सव करावा लागतो.. त्याचा खर्च किती होतो माहित आहे काय? काल उत्सव झाला, त्याला तीन लाख खर्च आला.. दरवर्षी आम्हीच खर्च करतो.. एक रुपयातरी देता काय देवीला? नुसती देवी नेतो.. देवी नेतो..”
"काय चालवलंय.. त्यापेक्षा आईला न्या तुमच्याकडे. वनिता आता चिडली आणि बोलू लागली "म्हातारी आई आमच्या कपाळी आणि देवीचा मुखवटा तू नेणार.. कशी नेतेस ते बघते मी.. हात लाऊन बघ त्या मुखवट्याला....”
"अगं जा गं.. तुझा बाबा खाली आला तरी मला कोण थांबवू शकणार नाही.. चला हो.. घ्या तो मुखवटा.. अनंता आणि अनिता पुढे झाले आणि मुखवटा उचलू लागले तसा वसंता पुढे झाला आणि त्याने मोठया भावाला ढकललं...वसंता खाली पडला आणि देवीचा मुखवटा खाली पडला आणि मुखवटा मोडला.
मघापासून दोन्ही मुलांचे बोलणे ऐकणारी त्त्यांची आई भडकली. चिडून म्हणाली.. "चालते व्हा.. चालते व्हा.. माझ्या डोळ्यासमोर रवा नकात..”
आई खाली वाकली आणि तिने खाली पडलेल्या देवीच्या मुखवट्याला उचलले. आता जगदीशमामा बोलू लागले..
"मघापासून गप्प रवान बघतंय.. तुमका दोघांका देवीचो मुखवटो होयो. कारण कोणी तरी सांगितलं म्हणे ज्या घरात देवींची पूजा होता, त्या घराची भरभराट होता.. म्हणून दोघांका देवी होई; पण म्हातारी आई नको.. अरे मुर्खांनो.. तुमका देव.. देवी म्हणजे काय कळलाच नाय.. अरे, अशी तांब्याची नायतर पितळेच्या देवी साठी भांटतात आणि ही रक्तामासाची आई ही देवी तुमका नको? चालते व्हा.. चलत रवा.. ह्या देवीचो मुखवटो तुमका दोघांका मिळाचो नाय.. जा..”
आईने आणि मामानी पण देवीचा मुखवटा मिळणार नाही, हे सांगताच दोघे आपल्या पत्नीसोबत बाहेर पडले.
सावित्रीबाई डोक्याला हात लाऊन बसल्या होत्या. जगदीश मामा तिला म्हणाले, "ताई, तूझ्या झिलंका खरी देवी कोण ह्या कळलाच नाय... अरे मेल्यानू.. खरी देवी तुमी विसरलास.. आणि त्या मुखवट्याचो मुको घेवंक धावतास.. ताई, घाबरा नको.. तुजा हक्काचा माहेर आसा.. तुज्या माहेरक काय कमी नाय.. धान्यगोटो आसा.. दूधदुभता आसा.. मानसा आसात.. उचल तो देवीचो मुखवटो आणि चल माझ्याबरोबर....” - प्रदीप केळुस्कर