महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
शिवराज्याभिषेकाचे अलौकिकत्व
शिवराज्याभिषेक दिन शिवरायांना समजून साजरा केला जावा. छत्रपतींचे नेमके उद्दिष्ट काय? हा आपल्या धर्मनिरपेक्ष देशात अनेक तर्कवितर्कांचा मुद्दा होऊ शकतो. स्वराज्याचा विस्तार कुठपर्यंत करायचा या आपले सरदार रावजी सोमनाथ यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना महाराज असं म्हणाले की ”सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर ‘श्रीं' ची इच्छा.” तुम्हीं आम्हीं सर्वांनी आपण निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करणे हाच एक शिवरायांचा मावळा म्हणून त्यांना केलेला मानाचा मुजरा असेल. त्या माध्यमातून देशाचेही भविष्य उज्ज्वल करण्यासाठीच्या महासागररुपी कार्यात आपल्यामुळे एका थेंबाची निश्चितच भर पडेल.
भारताच्या इतिहासातील तेजाळणारे आणि लखलखते पान म्हणजे शिवराज्याभिषेक. यावर्षी या शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असे म्हणतात.. "छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानच्या सीमा तुमच्या आमच्या उंबरठ्यापर्यंत आल्या असत्या.” शिवकालीन महान हिंदी कवी भूषण असे लिहितात "शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी.”
हा राज्याभिषेक भारतभूमीत राहणाऱ्या, स्वतःला खऱ्या अर्थाने हिंदवी म्हणवणाऱ्या सर्वांच्या स्वातंत्र्यासाठी प्रेरणास्त्रोतच आहे. शिवरायांनी ज्यासाठी अठरापगड जाती जमातीच्या समाज बांधवांना स्वराज्याची आणि स्वाभिमानाची हाक दिली. परकीयांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्ततेचे आवाहन केले. ते स्वराज्य आता निर्माण झाले होते. रयतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करतील असे राजे निर्माण झाले होते. आता त्यांना एका प्रस्थापित राज्य व्यवस्थेची गरज होती. रयतेला सर्वमान्य राजे हवे होते म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेतला. राज्यव्यवस्थेसाठी एका निन्श्चित अधिष्ठानाची आवश्यकता होती. त्यातून सर्वमान्य असे रयतेचे राज्य निर्माण होणार होते. जुलूम, अन्याय, अत्याचार व गुलामगिरीची राजवट संपवणारे, लोक कल्याणकारी रयतेचे राज्य निर्माण करणारे, स्त्रियांच्या अब्रूचे रक्षण करणारे राजे या राज्याभिषेकाने जनतेला मिळाले. महाराजांनी दिलेलं सर्वात मोठ देणं म्हणजे आत्मसन्मान, स्वाभिमान ती एक भावना जी शिवपूर्व कालखंडात मराठी माणसांमध्ये सुमारे शंभर वर्षांपासून संपली होती. ५ जून १६७४ ला संध्याकाळी राज्याभिषेकाच्या सोहळ्याला सुरुवात झाली. तो सोहळा मध्यरात्रीपर्यंत सुरू होता.
शिवराज्याभिषेकाचे आणखी एक कारण म्हणजे मुघल, सुलतान, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्धी व इतर स्थानिक सत्ताधीश महाराजांना राजा मानत नव्हते. एका जहागीरदाराचे बंडखोर पुत्र यापेक्षा वेगळे स्थान ते देत नव्हते. रयतेत महाराजांबद्दल प्रचंड आत्मीयता, प्रेम, जिव्हाळा, आदर होताच. पण प्रशासकीय कामे करतांना मुघल किंवा सुलतानांचेच शिक्के चालत. त्यामुळे रयतेची द्विधा मनस्थिती होई. महाराज वंशपरंपरागत राजे नव्हते. त्यांनी छत्रपती होण्यासाठी कोणताही विधी केलेला नव्हता. राज्य असूनही राजेपण नव्हते. त्यामुळे राजकीय स्थैर्य येत नव्हते. लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी व प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी त्यांचे अभिषिक्त सम्राट होणे त्यावेळच्या परिस्थितीसाठी अत्यंत आवश्यक होते. खरंतर राजे देशभरातील जनतेच्या हृदयसिंहासनावर आधीच विराजमान झाले होते, आता लौकिक अर्थाने ते सिंहासनावर विराजमान होणार होते. हे सोनेरी सिंहासन रामजी दत्तो यांनी अत्यंत कलाकुसरीने बनविले होते. काशीहून खास राज्याभिषेकासाठी आलेले पंडित गागाभट्ट यांच्या सुचनेनुसार महाराज सिंहासनाकडे मार्गक्रमण करीत असताना, प्रत्येक पायरी चढताना आणि प्रत्येक पाऊल टाकताना त्यांच्या मनाच्या भावविश्वामध्ये सुखदुःखाच्या आठवणींचा कल्लोळ माजला होता.या हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी त्याच्या स्थापनेपासून म्हणजे आपल्या बाल सवंगड्यांसह घेतलेल्या रायरेश्वराच्या मंदिरातील प्रतिज्ञेपासून आजच्या राज्याभिषेकाच्या आनंद सोहळ्यापर्यंत ज्या ज्या विलक्षण घटना घडल्या त्यांची आठवण व ज्यांनी या स्वराज्यासाठी आपल्या जीवनासह सर्वस्व समर्पण केले त्या सर्वांची आठवण महाराजांना या क्षणी होत होती. बाल सवंगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात परकीयांची गुलामगिरी झुगारून देऊन रयतेच्या हिंदवी स्वराज्य निर्मितीची घेतलेली प्रतिज्ञा, प्रतापगडाच्या पायथ्याशी स्वराज्याचा घास गिळण्यासाठी आलेल्या आदिलशहाचा मातब्बर सरदार अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्याचा प्रसंग, सिद्धी जोहरच्या पन्हाळ्याच्या वेढ्यातून आपले महाराज यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी स्वतः महाराज बनून स्वतःचे प्राण देणारे शिवा काशिद व महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचेपर्यंत गाजापूरची खिंड पावन करणारे बाजीप्रभू देशपांडेंचे बलिदान, दिलेरखानाच्या पुरंदर वरील हल्ल्यात स्वतःच्या प्राणांची बाजी लावणारे मुरारबाजी देशपांडे, मिर्झाराजे जयसिंगाशी २३ किल्ले आणि चार लक्ष होनांचा मुलुख देऊन केलेल्या तहाची, बादशहाने आपल्याला आग्रा येथे कैद केल्याची घटना, आर्ग्याहून आपल्या सुटकेसाठी जीवावर उदार होणाऱ्या मदारी मेहतर व हिरोजी फर्जंद यांची, मुलाचे लग्न सोडून कोंढाण्यावर गेलेल्या तानाजी मालुसरेंच्या प्राणार्पणाची, तर आपल्या केवळ सहा साथीदारांसह बहलोलखानाच्या प्रचंड सैन्यावर तुटून पडणाऱ्या सेनापती प्रतापराव गुजरांची. हा राज्याभिषेक त्या समस्तवीरांच्या समर्पणाचा, त्यागाचा राज्याभिषेक होता.
पुरंदरच्या तहात महाराजांकडे फक्त १२ किल्ले एक लक्ष होनांचा मुलुख शिल्लक होता. त्यानंतर नऊ वर्षांनी महाराजांचा राज्याभिषेक होतेवेळी महाराजांकडे ३६० किल्ले होते. ही घटनासुद्धा विलक्षण अचंबित करणारी आहे. महाराजांच्या एकूण जीवन प्रवासाचा अभ्यास केला तर आपल्या सहजच लक्षात येते संकटेच आपल्याला शक्ती देतात. हा राज्याभिषेक शिवरायांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केला नव्हता, तर स्वराज्य अधिक भक्कम व्हावे म्हणून केला होता. महाराज सिंहासनावर आरुढ झाल्यानंतर रायगडाचा सारा आसमंत घोषणांनी निनादून गेला. "क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.” वाद्यांचा कडकडाट ढोल, ताशे, सनई, चौघडे, नौबती, तुताऱ्या झडू लागल्या. चारही दिशांना तोफा दुमदुमू लागल्या. राष्ट्रभूमीला राजे छत्रपती लाभल्याची आनंदवार्ता देशभरात पसरली. जणू वारा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये जाऊन सांगत होता, "राजे छत्रपती झाले”. रयतेचे राज्य स्थापन झाले. या अलौकिक क्षणाची बातमी सर्व जगभर पसरली. राज्याभिषेकामुळे शेजारच्या राज्यांशी करार करणे सोयीचे झाले. राज्याभिषेकापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी नवीन शक ही कालगणना सुरू केली. म्हणजे राजे शककर्ते झाले. महाराजांनी राज्याभिषेकापासून दोन नाणी एक शिवराई' आणि दुसरे होन' काढली. फारसी भाषेतला राज्यकारभार स्वभाषेत व्हावा म्हणून महाराजांनी रघुनाथपंत हणमंते' यांच्याकडून राज्यव्यवहार कोषाची निर्मिती केली. हा राज्यव्यवहार कोश तयार करताना महाराजांनी विजयनगर साम्राज्यातील राज्यव्यवहार कोशचा आधार घेतला होता. विजयनगरच्या सत्ताधीशांनी राज्यव्यवहार कोश तयार करताना वेद, उपनिषदांचा आधार घेतला होता. हे जागतिक दर्जाचे इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे.
महाराजांनी या रयतेच्या मनात स्वतःबद्दल एक आगळावेगळा विश्वास निर्माण केला होता. स्वराज्याप्रति निर्माण झालेला हा विश्वास म्हणजे आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो, आपण आपले राज्य निर्माण करू शकतो. म्हणजेच आधी मरेपर्यंत लढणाऱ्या मराठ्यांना जिंकेपर्यंत लढण्याची प्रेरणा दिली. खरंतर राज्याभिषेक म्हणजे शतकानूशतकांच्या अंधार कोठडीतून बाहेर निघालेला तो एक तळपता, दैदीप्यमान प्रकाशाचा सूर्य होता. सातव्या आठव्या शतकापासून जी इस्लामी आक्रमणे सुरू झाली. त्यांनी अखंड भारतावर कब्जा केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनापूर्वी सुमारे शंभर वर्ष संपूर्ण भारताचे क्षात्रतेज लयास गेले होते. भारतीय संस्कृती व परंपरांना उतरती कळा लागली होती. यावेळेस या सर्वांवर मात करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन झाले ते आगमन विलक्षण ओजस्वी व तेजस्वी ठरले. निराशेच्या घनदाट अंधारात स्वच्छ प्रकाशाची वाट चोखाळणारी माणसे निर्माण करण्यात महाराज यशस्वी झाले होते. येथील प्रत्येक व्यक्ती स्वतः राजा असल्याप्रमाणे आपल्या राज्याचा रक्षक होता. तो तिथे चाकर नव्हताच. त्याला कोणाच्या आदेशाची गरजच नव्हती. ही भावना आपल्या रयतेच्या मनात स्वराज्याविषयी निर्माण करण्यात महाराज यशस्वी झाले. त्याचीच औरंगजेबाला भीती वाटत होती. म्हणूनच स्वतःचं एवढं मोठं देशभर आणि देशाबाहेरही पसरलेले साम्राज्य असताना त्याच्या शंभर पट लहान असलेल्या स्वराज्याचा घास घेण्यासाठी तो सतत धडपडत होता. महाराजांच्या मृत्यूनंतर तर तो स्वतः २७ वर्ष आपलं लाखोंचं सैन्य व अब्जावधी संपत्ती घेऊन महाराष्ट्रात ठाण मांडून बसला. पण त्यात त्याला यश आलेच नाही. याउलट त्याचा शेवटही याच भूमीत झाला.
राज्याभिषेकाचे सर्वात मोठे यश म्हणजे तो आजही तुम्हां आम्हां सर्वांना प्रेरणा देत राहतो. हे त्या शिवराज्याभिषेकाचे वैशिष्ट्य आहे. राजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले. कितीही मोठी संकटे येऊ द्या, राजांनी ध्येयाचे विस्मरण कधीही होऊ दिले नाही. परकीय आक्रमणा मागील उद्देश हा केवळ साम्राज्यविस्तार किंवा धन-संपत्ती मिळवणे एवढाच नव्हता. त्यासोबत आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे हासुद्धा होता. ही गोष्ट कदाचित छत्रपती शिवाजी महाराज सोडून इतर अनेक भारतीय सत्ताधीशांच्या लक्षातच आलेली नाही. हा देश आपला आहे, इथे आपलीच सत्ता असली पाहिजे. परकीयांनी येथे सत्ता स्थापन करता कामा नये. त्यांना इथे राहायचे असेल तर त्यांनी आपल्या अटी मान्य केल्या पाहिजेत. ही परकीय आक्रमकांबद्दलची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्यांच्या आधीच्या व त्यांच्या नंतरच्या अनेक सत्ताधीशांच्या लक्षात आली नाही. नाहीतर मराठे १७०७ नंतर लगेचच दिल्लीपती झाले असते. कारण त्यांनी महाराजांच्या मृत्यूनंतर सतत २७ वर्ष औरंगजेबाच्या अवाढव्य सैन्याशी संघर्ष करून त्याला जेरीस आणले होते. मुघलांची सत्ता खिळखिळी होण्यास सुरुवात झाली होती. आपण महाराजांची विचारधारा विसरलो म्हणूनच परत पारतंत्र्यात गेलो.
खरंतर आज आपण हा दिवस का साजरा करायचा हा अनेकांना पडलेला एक मोठाच प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या उद्देशाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती तो उद्देश आजही पूर्ण झाला असे म्हणता येत नाही. महाराजांना दीर्घायुष्य न लाभल्याने त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. माझ्या मते ते स्वप्न पूर्ण केले जावे असे ज्यांना ज्यांना वाटते त्या सर्वांनी शिवराज्याभिषेक दिन शिवरायांना समजून साजरा करणे आवश्यक आहे. छत्रपतींचे नेमके उद्दिष्ट काय? ह्या आपल्या धर्मनिरपेक्ष देशात अनेक तर्क वितर्कांचा मुद्दा होऊ शकतो. याबद्दल अनेक संशोधनेही नोंदविली जातात. स्वराज्याचा विस्तार कुठपर्यंत करायचा या आपले सरदार रावजी सोमनाथ यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना महाराज असं म्हणाले की "सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर ‘श्रीं' ची इच्छा.”
आज तुम्हीं आम्हीं सर्वांनी आपण निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करणे हाच एक शिवरायांचा मावळा म्हणून त्यांना केलेला मानाचा मुजरा असेल. त्या माध्यमातून देशाचेही भविष्य उज्ज्वल करण्यासाठीच्या महासागररुपी कार्यात आपल्यामुळे एका थेंबाची निश्चितच भर पडेल. अशा असंख्य थेंबानी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळेच हा भारत देश उद्या आत्मनिर्भर होऊन जगात विश्वगुरु होईल यात शंकाच नाही. हा राज्याभिषेक सोहळा पुढील अनेक पिढ्यांना असेच संघर्षरत राहून यशस्वी जीवन जगण्याची प्रेरणा देत राहील.
- प्रा.प्रशांत शिरुडे, के.रा.कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, डोंबिवली