राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीला गती द्यावी - ना. चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी सुरु केली आहे. त्याला गती देण्यासाठी सुकाणू समिती तयार करण्यात आली आहे. या ‘सुकाणू समिती'च्या मार्गदर्शक सुचनांनुसार पुढील शैक्षणिक वर्षांपासून सर्व विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये एनईपी अंमलबजावणीसाठी अंतिम आराखडा तयार करावा, असे निर्देश उच्च-तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात सुकाणू समिती आणि सर्व कुलगुरु यांची ९ जून रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ना. चंद्रकात पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०'च्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीची बैठक उच्च-तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. याप्रसंगी उच्च-तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च-तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक विनोद मोहितकर, ‘शैक्षणिक धोरण-२०२० अंमलबजावणी समिती'चे अध्यक्ष तथा ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ'चे माजी कुलगुरु डॉ.नितीन करमळकर, ‘मुंबई विद्यापीठ'चे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी, ‘संत गाडगेबाबा, अमरावती विद्यापीठ'चे माजी कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, जळगाव येथील ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ'चे कुलगुरु डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, एम. जे. कॉलेज जळगावचे निवृत्त प्राचार्य अनिल राव, उद्योजक महेश दाबक, ‘एसव्हीकेएम'चे अध्यक्ष डॉ. माधव एन वेलिंग यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० तयार करण्यात आले आहे. या धोरणानुसार बौध्दिक विकास आणि अध्ययनाच्या तत्वांवर आधारित अभ्यासक्रम-अध्ययन,  शाखांची रचना, संधी, समानता, समावेशकता, आणि शैक्षणिक दर्जा, नवीन संशोधन अशी उद्दिष्टे ठेवून भारतीय शिक्षण पध्दतीत बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने सदर धोरण तयार करण्यात आले आहे. यावर्षी सर्व अकृषी विद्यापीठ, स्वायत्त महाविद्यालये आणि ज्या संस्थांनी शैक्षणिक उपाययोजना केली आहे, अशा संस्थांमध्ये या धोरणाची अंमलबजावणी सुरु करण्यात येत आहे. पुढील शैक्षणिक वर्षात सर्व विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये १०० टक्के सदर धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत सर्व विद्यापीठांनी  संभाव्य अडचणींचा आणि उपाययोजना यांचा अभ्यास करुन ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत  शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून  अंमलबजावणी करण्यासाठी अंतिम आराखडा आणि अनुषंगिक धोरण तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे ना. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

सदर धोरणाची अंमलबजावणी करत असताना विद्यार्थी, पालक, प्राध्यापक यांना येणाऱ्या अडचणी यावर सकारात्मक दृष्टिकोनातून सर्व विषयांवर सकारात्मक धोरण ठरविले जाईल, असे ना. पाटील यांनी यावेळी सांगितले.

सर्व विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी, पदव्युत्तर स्तरावर सुधारित अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात गेल्या वर्षापासून विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. गठित केलेल्या ‘सुकाणू समिती'ने गेल्या सहा महिन्यांपासून सर्व विद्यापीठांचे कुलगुरु, प्र-कुलगुरु, अधिष्ठाता आणि अन्य संबंधित घटकांशी चर्चा करुन सुधारित अभ्यासक्रम आराखडा तयार केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून विद्यापीठ परिसरातील शैक्षणिक विभाग आणि राज्यातील पारंपरिक स्वायत्त महाविद्यालयांत पदवी, पदव्युत्तर स्तरावरील बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी तसेच एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी तसेच २० एप्रिल २०२३ रोजीच्या शासन निर्णयात नमूद केलेले अन्य पारंपरिक अभ्यासक्रम आणि सर्व संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर एम.ए., एम.कॉम. आणि एम.एस्सी. अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार निश्चित केलेल्या क्रेडीट आराखड्यानुसार राबविले जातील. उर्वरित अस्वायत्त संलग्नित महाविद्यालयात सध्या सुरु असलेले अभ्यासक्रमच राबविले जातील. झालेल्या बैठकीत सर्व कुलगुरुंनी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०' अंमलात आणण्याच्या दृष्टीने आवश्यक तयारी करण्यासाठी अधिक कालावधी लागणार असल्याचे  सांगितले आहे, असेही ना. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांचे रँकींग...
भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकनाचा सन-२०२३ चा अहवाल केंद्र सरकारने जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विद्यापीठ आणि संस्थांचा क्रमांक वरच्या यादीत असला पाहिजे यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हणून केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांचे रँकींग जाहीर  करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन उच्च-तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी केले. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

प्रशासकीय सेवेत काम करताना विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन व भूमिका महत्वाची