मुख्यमंत्र्यांचा राज्यातील शिक्षकांशी संवाद

शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नवी मुंबई ः राज्यातील शाळांचा दर्जा वाढवितानाच विशेषतः सरकारी शाळांचे सक्षमीकरण करण्याच्या तसेच पूर्व प्राथमिक स्तरांपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यातील शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.
शिक्षक दिनानिमित्त वर्षा बंगला येथील समिती सभागृहातून राज्यातील शिक्षकांशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंग देओल, संचालक कैलास पगारे उपस्थित होते. तर राज्यातील जिल्हाधिकारी यांच्यासह शिक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यानंतर शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी प्रास्ताविक केले.

महाराष्ट्राने शिक्षणामध्ये दिशादर्शक काम करुन देशाला नेहमीच नवनवीन प्रयोग आणि विचार दिले आहेत. राज्यातील सर्व मुलांना समान आणि गुणवत्तापूर्ण दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शासनाने केंद्र शासनाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत काही महत्त्वाचे आणि सर्वसमावेशक निर्णय घेतले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे मुख्यमंत्री ना. शिंदे म्हणाले.

शाळांच्या विकासासाठी विशेषतः सरकारी शाळांच्या सक्षमीकरणाकरिता अनेक धोरणात्मक निर्णय शासनाने घ्ोतले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा प्रयत्न केला असून, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणावर ६ टक्के खर्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिक्षणामध्ये गळतीचे प्रमाण, शिक्षकांच्या योग्य मुल्यमापनाची प्रक्रिया या सर्वच बाबींचा नवीन शैक्षणिक धोरण आणताना या निर्णयांमध्ये विद्यार्थी केंद्रीत विचार असून संपूर्ण शिक्षण विभाग फक्त मुलांच्या शिक्षणासाठी सर्व स्तरांवरुन काम करेल. यासाठी पोषक वातावरण या माध्यमातून निर्माण करण्यात येत असल्याचे ना. एकनाथ शिंदे म्हणाले.

राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणात आपल्या राज्याने शिक्षणात मागील काही कालावधीपासून मोठी झेप घ्ोतली असून, प्रगतीकडे वाटचाल सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे पालकांचा व समाजाचा सरकारी शाळांबद्दल आत्मविश्वास वाढला आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनातून नवे प्रयोग विद्यार्थी करु लागले आहेत. शिक्षक, विद्यार्थी आणि समाज यांच्यातील सुसंवादाने शिक्षण अधिक आनंददायी होऊ लागले आहे, असे त्यांनी यावेळी सागितले.

राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील काही उल्लेखनीय बाबींचा उल्लेख करतांना मुख्यमंत्र्यांनी जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद श्रीरामतांडा येथील शाळेमुळे १०० टक्के स्थलांतरण रोखल्याने पटसंख्येत वाढ झाल्याचे सांगितले. कोणत्याही सुट्टीविना शाळा ३६५ दिवस अविरत सुरु राहणारी चंद्रपूर जिल्ह्यातील पालडोह येथील जिल्हा परिषद शाळा, तोरणमाळ येथील जिल्हा परिषदेची शाळा आजुबाजुच्या २९ पाड्यावरील १६०० मुलांसाठीची आदर्श निवासी शाळा झाली आहे. असे असंख्य नाविन्यपूर्ण प्रयोग केल्याबद्दल शिक्षकांचे कौतुक आहेे. आदर्श शाळा निर्माण करण्याचे खरे शिल्पकार शिक्षक असून अशा शाळांची संख्या वाढविण्यासाठी निर्धार करुया आणि उर्वरित सरकारी शाळांचा विकास करुन त्यात भरीव पटसंख्या वाढवूया, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

ध्येयवादी आणि प्रयोगशील शिक्षकांची मोठी परंपरा या राज्याला लाभली असून या परंपरेमुळे इथली शिक्षण व्यवस्था अधिक समृध्द झाली आहे. शिक्षकांची जागा कुणीही किंवा कोणतेही तंत्रज्ञान भरु शकत नाही इतके महत्त्वाचे स्थान त्यांचे आहे, या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये चांगल वाइट शोधण्यासाठी शिक्षकांनी अधिक सजगपणे प्रयत्न करणे गरजेचे आहेे. शाळाबाह्य मुलांच्या समस्या, मध्यान्ह भोजन आणि व्यवतीगत लाभाच्या इतर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतील त्रुटी शोधून त्यांच्या सुलभतेने अंमलबजावणीवर विशेष लक्ष केंद्रीत करतानाच शिक्षण क्षेत्रात मैलाचा दगड ठरतील असे महत्त्वाचे विषय, उपक्रमांना प्राधान्य दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आई-वडीलांबरोबरच शिक्षकांचाही प्रत्येकाच्या जीवनात मोठा वाटा असतो. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक-२३ मधील शिक्षणाचा आणि शिक्षक रघुनाथ परब यांच्याविषयीची आठवण सांगितली. कोरोना काळातील आव्हानाचे संधीत रुपांतर करुन राज्यात अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून अभ्यासाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रीय पुरस्कार विजेते बीड जिल्ह्यातील सोमनाथ वाळके आणि शशिकांत कुलथे या दोन शिक्षकांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. यावेळी भिवंडी, सिंधुदूर्ग, पुणे, सोलापूर, नाशिक, नंदूरबार, औरंगाबाद, हिंगोली, अमरावती, नागपूर, गडचिरोली, वाशीम, उस्मानाबाद, वर्धा, येथील शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

विद्यापीठस्तरीय १६ व्या अविष्कार संशोधन महोत्सवामध्ये सीकेटी महाविद्यालयाची उत्कृष्ट कामगिरी