महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
लेकरांची ‘विठूमाऊली'
‘श्री विठ्ठल' अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत. श्री विठ्ठलाचे भक्त म्हणजेच वारकरी वि्ीलाला ‘माउली' संबोधतात. आई ज्याप्रमाणे बाळाच्या सर्व इच्छा पुरवते, त्याचे लाड करते आणि त्याची काळजीही घेते; त्याप्रमाणे विठूमाऊली तिच्या भक्तांच्या समस्त इच्छा पुरवते. भक्तांवर येणारी संकटे परतवून लावते, प्रसंगी भक्ताच्या घरी जाऊन त्याची सेवाही करते. माऊलीच्या अशाच एका भक्ताची कथा...
निस्सीम भक्ती आणि पराकोटीच्या भावामुळे साक्षात विठ्ठलालाच बोलावून बंधनमुक्त करण्यास भाग पाडणाऱ्या संत सखुबाई वारकरी संप्रदायाच्या इतिहासात कायमच्या अजरामर झाल्या. कृष्णा नदीच्या काठावर कऱ्हाड या ठिकाणी पती आणि सासू-सासऱ्यांसह राहणाऱ्या सखुबाई भगवंताच्या भक्तीमध्ये सदैव लीन राहायच्या. सखूबाईंचे पती, सासू आणि सासरे या तिघांनाही सखूबाईची भगवत भक्ती रुचत नव्हती. त्यामुळे ते तिघेही तिचा पुष्कळ छळ करत; मात्र या छळाला भगवंताची देणगी मानून त्या सर्व काही सहन करत असत. एकदा कृष्णा नदीकाठी सखू पाणी भरण्यासाठी गेल्या असता त्यांना पंढरीकडे निघालेली दिंडी दिसली. विठ्ठल दर्शनाच्या ओढीने त्याही दिंडीत सहभागी झाल्या. याविषयी त्यांच्या घरी कळताच त्यांच्या पतीने त्यांना मारहाण करत घरी आणले आणि घरात एका खुंटीला बांधून ठेवले. पंढरपूर यात्रा संपेपर्यंत त्यांना बांधून ठेवायचे, दोन सप्ताह काहीच खायला प्यायला द्यायचे नाही असे ठरवून तिघेही आपापल्या कामाला लागले.
सखुना बांधलेला दोर इतका घट्ट होता कि काही दिवसांनी त्यांच्या शरीराला खड्डे पडू लागले. याही परिस्थितीत त्यांनी आर्त भावाने श्री वि्ीलाला साद घातली.. ‘हे नाथा, या डोळ्यांनी तुझे एकदा जरी चरण पाहिले असते, तरी मी तात्काळ प्राण त्यागले असते. मी जशीही आहे तुझीच आहे, तूच मला या बंधनातून मुक्त कर' आर्त भावाने आळवलेली सखूची हाक थेट श्री विठ्ठलाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचली. क्षणाचाही विलंब न करता भगवंताने सुंदर स्त्रीचे रूप घेतले आणि सखूकडे गेला. स्त्री रूपातील भगवंत सखूबाईंना म्हणाला, ‘मी पंढरपूरला जात आहे तुला नाही जायचे का ?' यावर सखू उदगारल्या 'मी इथे बांधलेली आहे, माझ्यासारख्या पापिणीच्या नशिबात पंढरपूरची यात्रा कुठे ' यावर स्त्रीरूपातील भगवंत म्हणाला ‘बाई मी तुझ्या पाठीशी आहे, तुझ्या जागी मी उभी राहते, माझ्याऐवजी तू पंढरपूरला जा. असे म्हणून भगवंताने तिच्या शरीराभोवती गुंडाळलेला केवळ दोरखंड मुक्त केला नाही, तर या भवसागरातून सखूबाईंना कायमचे बंधनमुक्त केले. १५ दिवस उपाशी राहिलेल्या सखू मृत पावल्या तर आपण संकटात येऊ या भीतीने तिचे नातेवाईक सखूबाईंचे रूप घेतलेल्या भगवंताचा दोरखंड सोडतात. पुढे सखूबाई येईपर्यंत सखूच्या जागी साक्षात श्री विठ्ठल सखूबाईंच्या पतीची आणि सासू सासऱ्यांची सेवा करतो. भगवंताच्या सहवासाने सखूच्या पतीच्या आणि सासू सासऱ्याच्या स्वभावात परिवर्तन होऊन त्यांच्या वर्तणुकीत पालट होतो.
भावाचा भुकेला असलेल्या भगवंताने भक्ताच्या घरी जाऊन भक्ताचीच सेवा केल्याची कितीतरी उदाहरणे संत चरित्रांत सापडतात. ज्याप्रमाणे सखूबाईंसाठी त्याने १५ दिवस स्वतःला बांधून घेतले, तिच्या पतीची आणि सासू सासऱ्यांची सेवा केली, त्याप्रमाणे त्याने जनाबाईसाठी धुणी धुतली, एकनाथांच्या घरी श्रीखंड्या बनून पाणी भरले आहे. अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत. टाकीचे घाव सोसल्याशिवाय जसे दगडाला देवपण येत नाही, तसे प्रतिकूल परिस्थीतिला सामोरे गेल्याशिवाय भक्ताच्या भक्तीची कसोटी लागत नाही. संतांची चरित्रे वाचल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे सर्वच संतांनी जीवनात कितीही घनघोर संकट आले तरी भगवंताची साथ तिळमात्रही सोडली नाही. उलट या परिस्थितीत त्यांनी केवळ भगवंतालाच आळवले. मायेतील प्रलोभने त्यांनी कधी जवळ केली नाहीत. मी भगवंताचा आणि माझा केवळ आणि केवळ भगवंत याच उत्कट भावाने त्यांनी मनोभावे उपासना केली. शेवटी भगवंतालाही न राहवून भक्ताच्या साहाय्याला धावून यावेच लागते.
भगवंत जसा सखूबाईंना बंधनमुक्त करण्यासाठी आला, संत गोरा कुंभारांना त्यांचे बाळ जिवंत करण्यासाठी आला, संत तुकारामांना सदेह वैकुंठात नेण्यासाठी आला. ज्ञानेश्वरांसाठी रेड्यामुखी वेद वदवण्यासाठी आला तसा तो आपल्याही साहाय्यासाठी का धावून येणार नाही? घरातील परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही सखूबाईंनी वि्ीलाची आराधना सोडली नाही. साधना करताना घरातून होणारा विरोध सहन करत आपणही भगवंताची मनोभावे साधना करतो का? ज्या आर्ततेने सखूबाईंनी श्री विठ्ठलाला साद घातली त्या उत्कटनेने भगवंताला आपण आळवतो का? पुंडलिकासाठी जो भगवंत गेली २८ युगे एका विटेवर उभा आहे तो भगवंत आपल्या आर्त हाकेसाठी का बरे धावून येणार नाही? - जगन घाणेकर