महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
कीर्तिवान! पुण्यवान
परवा नाशिकला गेल्यावर मुक्त विद्यापीठाच्या परिसरात जेवायला गेलो होतो. साध्या झोपडीत एका चुलीवर एक बाई ‘फाईव्ह स्टार' हॉटेलमधील स्वयंपाकाला लाजवेल, असा स्वयंपाक करीत होती. त्या महिलेच्या दोन जुळ्या मुली मला आणि माझा मित्र गणेशला जेवायला वाढत होत्या.
जेवण झाल्यावर माझा ‘सारथी' विजय, त्या बाईच्या घरभर फिरून ती स्वयंपाकासाठी काय काय साधनसामुग्री वापरते, हे पाहण्यामध्ये मग्न झाला होता. घरात एकूण आठ भांडी होती. त्यातल्या चार भांड्यांत सारी औषधे, गोळ्या होत्या आणि चार भांड्यात जेवण बनवायचे साहित्य. माझा सारथी एकदम बडबड्या, हसी-मजाक करणारा. आम्ही दोघं बाहेर जेवत होतो. माझा सारथी बाहेर आला आणि म्हणाला, "संदीप सर, ह्या मावशी जेवणात मसाल्याऐवजी औषधाच्या गोळ्या टाकतात, असं मला वाटतं.” त्यावर मी त्यांच्याकडे गंभीरपणे पाहिलं. तेव्हा तो तितकाच गंभीर होऊन मला म्हणाला, "अहो सर, किचनमध्ये असलेल्या बऱ्याच डब्यांमध्ये गोळ्या आणि औषधे आहेत. मला दिसते, म्हणून मी तसं म्हणालो.”
मी थोडीशी ‘स्माईल विजयला दिली आणि पुन्हा शांतपणे जेवण करत होतो. विजय बोलता बोलता गंमतीत बोलून गेला. या महिलेच्या घरात एवढ्या गोळ्या, औषधे का? असा प्रश्न माझ्या मनात सतत घोळत होता. जेवणानंतर मी त्या महिलेला त्या गोळ्या आणि औषधांबद्दल विचारल्यावर ती काहीच बोलत नव्हती. एकदम शांत असलेल्या महिलेने गोळ्या औषधाचे नाव काढल्यावर दोन्ही मुलींकडे गंभीरपणे कटाक्ष टाकला. माझ्या लक्षात आलं की, काहीतरी गंभीर विषय असणार. खूप खोदून, खोदून विचारल्यावर ती महिला आजारी आहोत, काहीतरी झालंय”, असं सांगत होती.
स्वयंपाक करणाऱ्या त्या महिलेच्या पतीचा फोटो घरामध्ये दर्शनी भागात लावला होता. त्या फोटोला घातलेल्या हारामुळे त्यांचं अलीकडच्या काळामध्येच निधन झाल्याचं लक्षात येत होतं. आता गणेश आणि विजय दोघेही बाहेर गेले होते. आता एकान्त आहे हे लक्षात घेऊन हळूच सांगितलं, कारभारी आणि मला दोघांनाही मोठा आजार झाला होता. त्यात कारभारी जात राहिले. तो आजार माझ्या दोन्ही मुलींनाही झाला. कुणाचा तरी आधार मिळाला आणि या आजारातून आम्ही तूर्तास तरी सगळे विसरून कामाला लागलो”. त्या महिलेने मागच्या अनेक वर्षांपासूनच आजारामुळे त्रासून गेलेले जीवन माझ्यासमोर ठेवले.
त्या महिलेसोबत काम करणारी दुसरी एक महिला, तिनेही जे काही घडलं ते मध्येमध्ये सांगायला सुरुवात केली. काय-काय खाचखळग्यांनी भरलेलं एखाद्याचं आयुष्य असतं! ज्या आयुष्याला वाट काढता काढता नाकीनऊ येऊ लागतात. त्यातच असं कोणीतरी भेटतं, जो आधार देतो. आणि मग आयुष्य जगण्याचा पुन्हा लळा लागतो, असंच काहीसं या कुटुंबाच्या बाबतीत झालं होतं. मी ज्या महिलेशी बोलत होतो, त्या महिलेचे नाव रत्नमाला सूर्यवंशी. रत्नमाला सूर्यवंशी हिचे पती, त्र्यंबक सूर्यवंशी यांचे एच आय व्ही संसर्गाने निधन झाले. रत्नमालासह तिच्या दोन्ही मुली एच. आय. व्ही. बाधित आहेत. रत्नमालाकडे काम करणारी गीताबाई नावाची महिला कॅन्सरग्रस्त आहे. तिने मुंबईमध्ये एका डॉक्टरच्या मदतीने कॅन्सरचे मोफत उपचार घेतले. ज्या मुंबईच्या डॉक्टरने त्या महिलेला खूप मदत केली, त्याच डॉक्टरांचा संदर्भ घेऊन रत्नमाला मुंबईला उपचारासाठी मुंबईला गेली. योग्यवेळी योग्य तास उपचार न झाल्यामुळे रत्नमालाचे पती त्रिंबक यांचे निधन झालं होतं. रत्नमाला आणि तिच्या दोन्ही मुलींना त्याच मदत करणाऱ्या डॉक्टरांनी समुपदेशनच्या माध्यमातून बाहेर काढलंच काढलं. त्यांच्यावर होणारा पूर्ण औषधाचा खर्च, त्यांचा येण्याजाण्याचा खर्च, सर्व काही डॉक्टरांनी स्वतः करून दिले. रत्नमाला, गीताबाई आणि जाई-जुई ह्या चौघीजणीही त्या मुंबईच्या डॉक्टरांचे अफाट कौतुक करत होत्या.
गीताबाई म्हणाली, ‘आमच्या परिसरातील अनेकांना त्या डॉक्टरांनी देवदूत बनून मदत केली आहे. माझ्या गावातील एका माणसाच्या सांगण्यावरून मी त्या डॉक्टरांकडे गेले आणि माझा जीव वाचला”. असं गीताबाई सांगत होत्या.
ते डॉक्टर कोण? ‘ते' कुठे राहतात? त्यांचा पत्ता काय आहे? त्यांचा संपर्क नंबर काय आहे? त्यांची संस्था कुठली? अशी माहिती मी रत्नमाला यांच्याकडून घेतली आणि परत मुंबईकडे जायला निघालो. मी बाहेर पडणार, इतक्यात रत्नमालाची मुलगी जुई मला म्हणाली, "आमच्याकडे परत जेवायला येणार ना भाऊ?” मी लगेच म्हणालो, ‘हो येणार ना. का नाही येणार?”
त्यावर जुई म्हणाली, जेव्हा आम्हाला मोठा आजार आहे हे लोकांना कळतं, तेव्हा ‘ती' माणसं आमच्याकडे जेवायला येणं बंद होतं. आणि ‘ती' माणसे जेवायला येणं बंद झालं की, "उदरनिर्वाहाचे सगळे मार्ग बंद होतात.” तिचं ते बोलणं ऐकून माझं मन एकदम सुन्न झालं. तिला काय बोलावं, हे मला कळत नव्हतं. मी तिला हळूच म्हणालो, "तुम्हाला जो आजार झाला आहे, तो आजार तुमच्या सहवासात कुणीही आलं तरी त्याला होत नाही. त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. जी माणसं अडाणी आहेत, त्यांना काहीच कळत नाही. ते अशा प्रकारचा दुरावा करीत असतील.” मी खिशामध्ये हात घातला खिशात थोडेबहुत पैसे होते, ते त्या मुलीच्या हाती ठेवले आणि मी माझा परतीच्या मार्गाला लागलो.
मुंबईच्या ‘त्या' डॉक्टरांनी ‘त्या' महिलेचे तिच्या कुटुंबीयांचे प्राण का वाचवले असतील? त्या सर्वांसाठी स्वतः खर्च का केला असेल? त्या डॉक्टरांनी अनेकांना का मदत केली असेल? असे अनेक प्रश्न मला पडले होते. मी अधिकचा विलंब न लावता त्या डॉक्टरांना फोन केला. त्यांच्याशी माझं प्राथमिक स्वरूपात बोलणं झालं. मुंबईमध्ये गेल्यावर भेटण्यासाठी त्यांची वेळही घेतली. ज्या दिवशी भेटीची वेळ ठरली होती, त्याच दिवशी सकाळी डॉक्टर फोन करून मला म्हणाले, ‘मी रात्री मुरबाड जवळच्या एका आदिवासी पाड्यावर तपासणीसाठी गेलो होतो. तिथे आसपासचे अनेक रुग्ण आले होते. त्यामुळे रात्री खूप उशीर झाला. सकाळी त्याच भागात दुसरीकडे एका ठिकाणी महिलांसाठी आरोग्य शिबीर लावले होते. म्हणून तिकडेच थांबलो. मी दिलेल्या पत्त्यावर, तुम्ही आदिवासी पाड्यावर येऊ शकाल का?”
क्षणाचाही विलंब न लावता मी 'हो” म्हणालो. आदिवासी पाड्यावर सकाळी सकाळी जाऊन पोहोचलो. तिथे महिलांची प्रचंड गर्दी होती. छान ड्रेसमध्ये चष्मा, टोपी घालून डॉक्टर सगळ्यांना तपासत होते. "बस बेटा, जा बेटा, ये बेटा, बेटा, बेटा, बेटा” हाच शब्द डॉक्टरांच्या तोंडी होता. डोळ्यांची तपासणी, रक्ताची तपासणी, तिथेच रिपोर्ट, तिथेच औषधे, सगळ्या प्रकारच्या रोगांवर उपचार आणि औषध एकाच ठिकाणी देण्याची व्यवस्था डॉक्टरांनी केली होती.
मी नमस्कार करून डॉक्टरांना माझी ओळख करून दिली. ते म्हणाले, "आता एवढे पेशंट झाले की, आपण गप्पा मारत बसू.” मी आसपास असणाऱ्या अनेक लोकांना ‘हे' डॉक्टर कोण आहेत? ते कधीपासून येत आहेत?” हे विचारत होतो. तसे डॉक्टरांचे काम शहरातल्या लोकांसाठी असते, पण या डॉक्टरांना मात्र आदिवासी पाड्यांवर किंवा ग्रामीण भागामध्ये भेटण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी यावं वाटते. ही डॉक्टरांची खासियत होती. डॉक्टर त्यांच्या तंद्रीत रुग्ण तपासण्यामध्ये गर्क झाले होते. मग आमचं बोलणं सुरू झालं. लोक भेटायला येत होते. आम्ही जेवण केलं. तिथल्या परिसरात फेरफटका मारला, तरी आमचं विषयाला धरून बोलणं सुरूच होतं.
एका छोट्याशा शहरातला मुलगा, ज्याचे वडील साधे किराणा दुकान चालवायचे, ‘तो' मुलगा आज जगातल्या ऐंशी देशांमध्ये जाऊन आरोग्यसेवेचे काम करतो. व्यवसाय आणि आरोग्य याचा तीळमात्र संबंध न ठेवता, केवळ सामाजिक भाव ठेवून, येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला बरं करायचं ही माझी जबाबदारी आहे असं समजत, लाखो रुग्णांचा खर्च उचलत जगाला सामाजिक सेवेने भुरळ घालणाऱ्या डॉ. महाजन यांची कहाणी थक्क करणारी होती. डॉ. प्रदीप महाजन (८८९८०७०९०४) नांदेड येथील जुना मोंढा भागातील व्यंकटराव महाजन या व्यापाऱ्याचा मुलगा. घरी छोटे दुकान, सहा भाऊ. वडिलांना वाटायचं की, सहापैकी एकातरी मुलानं डॉक्टर व्हावं, सेवाभावी कामाचा घरात असणारा वारसा पुढे चालवावा. तेव्हाच्या हलाखीच्या परिस्थितीत डॉ. महाजन यांनी अंबाजोगाई येथे वैद्यकीय शिक्षण घेतले. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतले. अमेरिकेत सुपर स्पेशलायझेशन केले. मुंबईच्या कोपरखैरणे भागात १९८८ ला त्यांनी स्वतःचा एक छोटासा दवाखाना सुरू केला. या काळातही त्यांनी शिक्षण बंद केलं नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या बारा उच्च पदव्या मिळाल्यानंतर डॉक्टर तेरावी पदवी घेण्यासाठी आजही शिकत आहेत.
‘मूत्रतज्ञ आणि ‘मूळपेशी यातील तज्ज्ञ अशी डॉक्टरांची ओळख आहे. या डॉक्टरांच्या वेगवेगळ्या खासियत आहेत. त्यातील पहिली खासियत आहे, येणारा रुग्ण हा माझ्यासाठी एक जबाबदारी घेऊन येतोय. तो माझ्यापर्यंत आला म्हणजे तो जबाबदारीतून मुक्त होतो. आता मी त्याला बरा करणार आहे. त्याच्याकडे पैसा आहे का नाही, याचं मला काही देणंघेणं नाही. हे काम गेल्या कित्येक वर्षांपासून डॉक्टर अविरतपणे करत आहेत. त्या पाड्यावरून आम्ही निघालो. एकाच गाडीमध्ये सुरू झालेल्या प्रवासात आमच्या गप्पा सुरूच होत्या. मी डॉक्टराना म्हणालो, "डॉक्टर साहेब, टोपी काढा आता. आपण एसी गाडीत आहोत.” डॉक्टर साहेबांनी टोपी काढली आणि लगेच टोपी घातली. म्हणाले, ही टोपी माझ्या वडिलांची देणं आहे. माझे वडील गेले, तेव्हा मी केस कापले, तेव्हा टोपी घातली. तेव्हा सारेच म्हणत होते, टोपी खूप छान दिसते. मग अनेक पद्धतीच्या टोपी घेतल्या आणि ती नियमित घालत आहे.
डोळ्यांवरचा चष्मा काढत डोळ्यांत आलेले पाणी पुसत डॉक्टर म्हणाले, बाप जातानाही काहीतरी देऊन गेला. लहानपणी दुकानात बसलेला बाप चणे फुटण्यासाठी १० पैसे द्यायचा. उड्या मारत चणे फुटाणे खायचो. घरी आल्यावर बाप म्हणायचा, तुला जसा आनंद मिळतो ना, तसा लोकांच्या दुःखात सहभागी हो. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहा. पोरा, डॉक्टर हो. मला घेऊन बापाच्या डोळ्यात सेवाभावी स्वप्न होते. आज जगभरात आरोग्याचे काम करताना माझा बाप मला त्या प्रत्येक दुःखितांच्या चेहऱ्यावर हसू आल्यावर दिसतो'. डॉक्टर जे जे बोलत होते, ते सारे काही अद्भुत होते. ते सारे मी शांतपणे ऐकत होतो.
डॉ. प्रदीप महाजन जगातल्या त्या सर्व सर्वश्रेष्ठ डॉक्टरांमधील एक होते. त्यांच्या स्पेशल असलेल्या विषयापेक्षा सर्वसमावेशक विषयात रुची घेऊन ते प्रचंड काम करतात. जगातल्या ८० देशांत आरोग्याच्या निमित्ताने नेहमी जाणे येणे असलेल्या देशात डॉ. प्रदीप महाजन यांनी आरोग्यक्षेत्रात, संशोधनात, शिकवणीत दिलेले योगदान कदाचितच कुणी दिले असेल. डॉ. प्रदीप महाजन यांनी भारतासह केनिया, मॉरिशस, नेपाळ, घाणा या देशांत सेवाभावी दवाखाने उभे केले आहेत. मी डॉ. प्रदीप महाजन यांना म्हणालो, ‘सर, जगातील आरोग्यसेवा आणि भारतातील आरोग्यसेवा याकडे तुम्ही कसे पाहता?' त्यावर डॉ. महाजन म्हणाले, ‘भारत सर्वच बाबतीत आघाडीवर आहे. आरोग्यसेवेत भारताने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. अलीकडे तर रिसर्च, विमा सुविधा, एकूण आरोग्य यंत्रणा यात भारताने दिलेले योगदान खूप मोठे आहे. फक्त धंदा म्हणून आरोग्यसेवेकडे पाहणाऱ्या लोकांवर वचक ठेवायला अनेक वेळा सरकारी यंत्रणा कुचकामी ठरते'.
डॉक्टरांशी बोलताना मी नाशिकची रत्नमाला आणि गीताबाई यांचा विषय काढला. त्यावर डॉक्टर म्हणाले, ‘देवाने आपल्याला भरपूर दिले आहे. त्यातले थोडे थोडे इतरांना द्यायचे. आपला जन्म इतरांना देण्यासाठीच झाला आहे, हे माझ्या वडिलांचे सूत्र घेऊन मी आयुष्यभर त्याचे पालन केले. आपल्या पेशंटच्या चेहऱ्यावर हसू आले पाहिजे. माझ्याकडे सेवाभाव आहेच. यात अजून वाढ होतच राहते. सेवाभाव रुजावा, माझ्या सोबतच्या टीमने, दुसऱ्या पिढीने माझा वारसा कायम चालू ठेवावा, यासाठी मी फॅमिली वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. मोफत रुग्णसेवा, विम्यातून आरोग्यसेवा, शासकीय मदतीतून आरोग्य सेवा, वेगवेगळ्या आरोग्य सुविधांमधून आरोग्यसेवा देत रोज किमान शंभर रुग्ण मी पाहत असेन.'
आम्ही बोलत बोलत डॉ. महाजन यांच्या कोपरखैरणे येथील घरी पोहचलो. डॉ. महाजन म्हणाले, ‘मला परदेशातील दोन ऑपरेशन करायचे आहेत. तुम्ही थोडे बसा', यावर मी डॉक्टरांना म्हणालो, ‘मी सोबत असलो, तर चालेल काय?' डॉक्टर म्हणाले, ‘येस कम, कम'. मी ऑपरेशन थेटरमध्ये गेलो. एक आफ्रिका आणि दुसरे दुबई या दोन ठिकाणच्या दोन पेशंटचे ऑपरेशन डॉक्टरांनी केले. मी फार चकित झालो. दीड तासात दोन ऑपरेशन झाले होते. कात्री घ्या, कापा, शिवा. हे औषध द्या, ते औषध द्या. संपूर्ण ऑपरेशन होईपर्यंत डॉक्टरांचे डोळे आणि हात भरभर काम करीत होते.
ऑपरेशन थेटरच्या बाहेर आल्यावर गावकुसातून आलेले अनेक रुग्ण डॉक्टरांनी तपासले. एक तंत्रज्ञ दवाखान्यात आलेल्या नवीन मशीन सुरू करून युद्धपातळीवर काम करीत होता. एक महिला सर्वांना ‘जेवण केले का? काही अडचण आहे का? औषधी घेतली का?' अशी विचारणा करीत होती. ‘तो व्यक्ती' आणि ‘ती महिला' यांची ओळख करून देताना डॉ. महाजन म्हणाले, ‘हा माझा मुलगा सिद्धान्त आणि ही माझी पत्नी विपुला, सर्व सांभाळतात. सिद्धान्त आर्मीमध्ये ऑफिसर होता. आता खूप मोठ्या प्रमाणावर रिसर्च करतो. माझे दवाखान्याचे संपूर्ण व्यवस्थापन तोच सांभाळतो'. माझ्या लक्षात आले, डॉक्टरांनी त्यांचा सेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी माणसे तयार केली आहेत. डॉ. महाजन एका स्कुटरवर हात ठेवत म्हणाले, ‘संदीप, माझा मोठा भाऊ विजयकुमार महाजन यांनी मला डॉक्टर झाल्यावर ही स्कुटर दिली होती. बापाच्या नंतर ‘भाऊ' बाप म्हणून सावली देत असतो. तसेच समाजाच्या बाबतीत असते. कोणी काहीही देणार नाही, कोणी जाणीव ठेवणार नाही, कोणी मदत करणार नाही, हे माहिती असतानादेखील आपण समाजासाठी काम करीत राहणे, त्यात सात्यत्य ठेवणे हे फार आवश्यक आहे.
मी संस्थेच्या ऑफिसमध्ये पाहत होतो. पुढचे दहा बारा दिवस जगभर आरोग्य कँम्पचे नियोजन केले आहे. कुठे औषधी पाठवायचे आहेत, कुठे रुग्णाच्या नातेवाईकाला पैसे द्यायचे, कुठे सांत्वनासाठी भेटीला जायचे आहे. बापरे! एक माणूस किती कामे करतो! मी नुसता विचार करीत होतो. जगभर डॉक्टरांचा अनेक वेळा सन्मान झालाय, पण आपल्या देशात मात्र डॉक्टरांचा सन्मान झाला नाही, हेच मी पाहत होतो. एवढे मोठे साम्राज्य सांभाळायचे कसे? हा प्रश्न डॉक्टरसाहेब यांच्या समोर नक्की आहे. उद्याचा खर्च भागवायचा गंभीर विषयही आहे. अनेक विषय गंभीर आहेत, तरीही डॉक्टर साहेबांचा सेवेचा उत्साह काही कमी झाला नाही.
मी डॉक्टरांचा निरोप घेऊन निघणार, इतक्यात सिद्धान्त आणि विपुलजी यांनी माझा पाहुणचार केला. मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या ‘रसाळी'च्या जेवणाने मी एकदम तृप्त झालो आणि ‘मलबार हिल'कडे निघालो.
मी विचार करीत होतो, काही काही माणसे किती मोठमोठी कामं करतात! आज जगाच्या कानाकोपऱ्यात डॉ. प्रदीप महाजन आरोग्य सेवेचा वसा घेऊन प्रचंड पुण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या कामातून त्यांची ‘कीर्तर्ी' सातासमुद्रापार गेली आहे. त्यांचे काम आणखी उत्साहात चालण्यासाठी त्यांना आर्थिक आणि मानसिक मदतीची गरज नक्कीच आहे. आपल्या अवतीभोवती असे ‘कीर्तिवान', ‘पुण्यवान' अनेक ‘हिरे' आहेत, ज्यांना तुमच्या आमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. बरोबर ना? -संदीप काळे