धनगरवाडी प्रकाशाने भरली

 संपादक मेहताच्या केबिनमध्ये मिटिंग सुरु होती. या वृत्तपत्रातील सर्व नवीन, जुने वार्ताहर जमले होते. उपसंपादक खानोलकर, विशेष वार्ताहर कामत पहिल्या रांगेत बसले होते. दुसऱ्या तिसऱ्या रांगेत जुनिअर वार्ताहर, नवशिके वार्ताहर बसले होते. सर्व मंडळी जमली याची खात्री झाल्यावर सम्पादक मेहता बोलू लागले.. "लोकसभा इलेक्शन एका महिन्यावर आले, आता आपल्या पेपरनेपण त्याची तयारी करायला हवी, रोजच्या बातम्या दिल्ली पासून गल्लीपर्यत त्यात येणारच;  पण आपल्या जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात आपण पोचायला पाहिजे. मुंबई पुण्याचे पेपर्स, त्त्यांचे वार्ताहर, इलेक्ट्रॉनिक मीडिया त्त्यांचे रिपोर्टरपण आपल्या भागात येणारच. पण आपण अत्यन्त मायक्रो इंटिरियर्स पर्यत पोचायला हवे. या भागातील लोकांना बोलते करायला हवे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली, आजही या भागातील लोक कसे राहतात, त्यांच्यापर्यत सरकारी योजना पोचतात की नाही, याचा रिपोर्ट लोकांपर्यत कळवायला हवा. तसेच आपले जे मागील खासदार, ते त्या भागात कधी त्या लोकापर्यत पोचले होते का याचाही अंदाज येतो. म्हणून आपल्या जिल्ह्यातील अनेक छोटया गावांना, वस्त्यांना आपण भेटी देणार आहोत. त्याचे रिपोर्ट आपल्या वर्तमापत्रात छापून येणार."

आपल्या जिल्ह्यातील विभाग पाडले असून खानोलकर प्रत्येकाला विभाग देणार आहेत. त्या भागात आपण जाऊन तेथील लोकांना भेटायचे आहे, स्वतःच्या डोळ्यांनी सर्व पाहायचे आहे, त्यावर रिपोर्ट लिहायचा आहे आणी खानोलकराकडे दयायचा आहे. खानोलकर या विभागाचे प्रमुख असतील. त्यातील योग्य तेव्हढे रिपोर्ट वर्तमापत्रात छापून येईल.

मिटिंग संपली, खानोलकरांनी प्रत्येकाला त्याचा एरिया दिला. नीलिमाला सह्याद्री घाटातील भाग मिळाला. तिची मैत्रीण संध्या तिला त्याचाच बाजूचा भाग मिळाला. नीलिमा आणी संध्या बाहेर आल्या, कॅन्टीनमध्ये शिरल्या आणि गुगल उघडून आपल्याला मिळालेला एरिया पाहू लागल्या.

निलिमा - अगं मला सहयाद्रीचा भाग मिळालाय, त्या भागात पंधरा दिवस काढायचे म्हणजे.. राहायची तरी सोय असते की नाही.. निदान वॉशरूम्स.

संध्या - अगं शहर सोडलं की कुठलं वॉशरूम्स.. ऍडजस्ट करावे लागेल.. आणि कुठे लग्न करून दिलंय त्या भागात. थोडे दिवस काढायचे, आपल्यासारख्याच स्त्रिया राहतात ना त्या भागात,                महत्वाची.

  दोन दिवसांनी नीलिमा आपली ॲक्टिव्हा घेऊन निघाली, गुगल मॅप पहात पहात तालुक्याच्या गावी पोचली. याच भागातील एक वार्ताहर दुसऱ्या पेपरमध्ये नोकरीला होता, त्याची ओळख होतीच. त्या वार्ताहराने आपल्या घरी तिची सोय केली होती. नीलिमा आशिषच्या घरी पोहोचली, आशिष ड्युटीवर होता, पण त्याची बायको मयुरी घरी होती, तसेच आशिषचे सत्तर वर्षाचे बाबा घरी होते. आशिषने घरी कल्पना दिलेली, त्यामुळे मयुरीने तिचे स्वागत केले, तिला तिच्यासाठी वेगळी खोली दाखवली. फ्रेश झाल्यावर नीलिमा आशिषच्या बाबांना भेटायला गेली, तिने तिला मिळालेला एरिया त्याना दाखवला आणि या गावात जाण्याचा सोपा मार्ग विचारला. त्यानी नीलिमाला प्रत्येक गावाची माहिती पुरवली आणि कसे जायचे किंवा त्या भागात गेल्यावर कुणाला भेटायचे याची व्यवस्थित माहिती पुरवली. दुसऱ्या दिवसापासून नीलिमा तिच्या ऍक्टिव्हा वरुन निघाली. प्रत्येक गावाचा नकाशा तिच्यासोबत होता. त्या गावात गेल्यावर गावातील प्रत्येक वाडीवर ती जात होती, त्यातील तिला वाटेल त्या दोन घरात ती शिरत होती. घरातील स्त्रिया तिला भेटत. मग ती सरकारी योजना कितपत या घरात आहेत किंवा सरकारी अनुदाने या कुटुंबाना पोहोचतात का याचा अंदाज घेत असे. अंगणवाडी जवळ आहे का, मुलांना दुपारची खिचडी मिळते का याचा अंदाज घेत असे.

एकांदरीत तिच्या लक्षात आले, सरकारी योजना गावात पोहोचतात, ज्या भागातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य धडपडे आहेत, त्या भागात शंभर टक्के योजना पोहोचल्या होत्या. नीलिमा आपले रोजचे रिपोर्ट खानोलकर साहेबाना पाठवत होती. आता नीलिमाला अगदी सह्याद्रीपट्ट्यात जायचे होते, ही गावे एका बाजूला आणि जंगलातील असल्याने तिने तिच्याच पेपरमधील संध्याला बोलावून घेतले. संध्या आली, तशी दोघी निघाल्या. आशिषच्या बाबांनी तिला कल्पना दिली होती, "त्या भागात जंगली श्वपादे असण्याची शक्यता असते, जंगली डुक्कर, लांडगे रानगायी, वाघ सुद्धा दिसतात. तेंव्हा दिवसा उजेडी जा आणि दिवसा उजेडी परत या, म्हणून.

आज नीलिमाला सह्याद्रीपट्ट्यातील मोरेवाडी भागात जायचे होते, कालच तिच्या सोबतीला संध्या आली होती, त्यामुळे हसतगमत तिची गाडी चालली होती. या भागात वळणे खुप म्हणूंन गाडी हळू हळू चालवत दोघी दहा वाजता गावात पोहोचल्या.

तेथील एका लहानश्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिने चहाची ऑर्डर दिली आणि मोरेवाडीमधील किती वाड्या आहेत ते ती पाहू लागली. अकंदर सात वाड्या होत्या. प्रत्येक वाडीत वीस बावीस माणसे रहात होती, फक्त धनगरवाडीत दोनच स्त्रिया दिसत होत्या. तिने त्या हॉटेलवल्याला विचारले,

"या धनगरवाडीत दोनच माणसे दिसतात, बाकी कोण राहत राहत नाही तिथं?”

"लई एका बाजूला हाय धनगरवाडा, जायचं यायचं पण कठीण, कोन बी जात नसलं तिकडं.”

"मग ती लोक येतात का इकडे?”

"कवातरी एक म्हातारी दिसते.”

नीलिमा संध्याला म्हणाली,  "संध्या, आपण तिकडे जायला हवं, गावात, शहरात सगळेच जातात पण धनगरवाडीत..”

त्यांचे बोलणे ऐकून हॉटेलवाला म्हणाला, ”पण ताई, तिकडं रस्ता न्हाई, घाट हाये.. तुमची गाडी जायची न्हाई.. तुमास्नी घाटी चढून जायला लागलं”

"हो चालेल, आम्ही गाडी इकडेच ठेवतो.

संध्याने गुगल मॅप उघडला आणि मोरेवाडीतील धनगरवाडीच्या दिशेने दोघी चालू लागल्या. चढणं होती, वाट अरुंद होती, दोन्ही बाजूला काटेरी झुडुप होती. मधूनच खसखस ऐकू येत होती, एखादे पाखरू झाडातून बाहेर येत होतं. दोघी हातात हात घेऊन आणि हातात काठी घेउंन चढणं चढत होत्या.

अर्धा तास चढन चढल्यावर सपाट भाग लागला, दोघी पहात राहिल्या, पश्चिम दिशेला सहयाद्रीच्या रांगा दिसत होत्या, सगळा भाग हिरवा गार. अजून अर्धा तास चालल्यानंतर लांबून एक घर दिसू लागलं. त्या घराकडे पहात नीलिमा म्हणाली "संध्ये, हाच मोरेवाडीचा धनगरवाडी बहुतेक”

 दोघी त्या घराच्या दिशेने चालू लागल्या. ते मातीच्या विटाचे छप्पर असलेल्या घराजवळ शेळ्या बांधलेल्या दिसत होत्या. त्या शेळ्यांचे "बे.. बे” ऐकू येत होतं. त्यांच्या पायाची जाग लागताच एक कुत्रा भुंकू लागला आणि त्या कुत्र्याच्या भुंकणे ऐकून एक ऐंशी ब्याएंेशी वयाची बाई हातात काठी घेऊन बाहेर आली.

या दोघीना पहाताच ती म्हातारी आश्चर्यचकित झाली
"कोन बे, का आलिया”
"आम्ही शहरातून आलोय. तुम्ही एकट्या राहता का इथे?”
"माजी सून हाय आनी मी.”
"सून कुठे गेली तुमची?”

"पानी आनय गेली, थिकून आनावं लागतं न्हवं. तेव्हड्यात तिची सून प्लास्टिकच्या दोन कळश्या एकावर एक घेऊन आली, या दोघीना पाहतच आश्चर्यचकित झाली.

"कुणीकधन आलाय म्हणायचं?”

नीलिमा म्हणाली "आम्ही पेपरवाले आहोत. तुम्हाला सरकारी योजना मिळतात काय, कोण सरकारी माणूस तुम्हाला भेटतात काय, हे पहाण्यासाठी आलोय.”

"हिथं कोन बी येत न्हाई, आमास्नी घासलेट बी मिलत न्हाई, रातच्याला दिवा कसा लावायचा?” नीलिमाचे पटकन वर लक्ष गेले, घरात वीज असल्याचे काही वाटेना.
तिने विचारले, "लाईट नाही तुमच्याकडे?”

"न्हाई, लाईट न्हाई आनी घासलेट बी देत न्हाईत.”  संध्या नीलिमाला म्हणाली "आश्यर्य आहे, स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी अजून भारतात लाईट पोचली नाही? आणि आपण कसले कसले दावे करत असतो. मग दिवे कसे लावता रात्री?”

सुनेने एक बाटली आणुन दिली, संध्याने वास घेतला, डिझेल? हे कुठं मिळते?

"बाजाराला जाती की मी, कोंबड्या घेऊन, तवा तांदूळ, डाळ आंनती, त्या पिशवीतुन ही बाटली दडवून आणती. काय करायचा? घासलेट बी देत न्हाई कोनी.”

"तुमच रेशनकार्ड आहे की नाही?”

"न्हाई बा, काय असतंय त्ये?”

"तुमच्याकडे ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेविका कधी येतात की नाही?”

"न्हाई बा, आज किती वरसानं तुमी हिथं आलाय.”

"तुमी मत द्यायला जाता काय?”

"न्हाई, माजा दादला व्हता, तो जायचा मत्त द्यायला. आता कोन आमास्नी सांगत बी न्हाई.”

नीलिमा आणि संध्याने सारे घर पाहिले. रानातली भाजी तोडलेली दिसत होती, एका भांड्यात तांदूळ होते, नाचणी होती. त्यांच्या लक्षात आले, भात कुटून त्याचे तांदूळ बनवत असणार. आजूबाजूला शेळ्या, मेंढया बांधलेल्या होत्या.

"मग बकरे विकता की नाही?”

"व्हय, आमचा एक पाव्हणा हाय वर घाटावरचा, त्यो बकरी घेऊन जातो, आमास्नी तांदूळ, तेल आणुन देतो.”

नीलिमाने त्यांचे आणि त्यांच्या घराचे, परिसराचे फोटो काढले, आणि त्यांना म्हणाली

"आता तुमच्यकडे लाईट येते की नाही बघ, तुमच्यासाठी रॉकेलचीपण व्यवस्था होईल.”

दोघी परत निघाल्या. नीलिमा संध्याला म्हणाली "बारा दिवस फिरून जीं बातमी मिळाली नव्हती, ती आज मिळाली बघ, या बातमीने आग लागेल, बघत राहा."

नीलिमा आणि धनगरवाडीतल्या सासू सून बोलत असताना संध्याने सर्व मोबाईलवर रेकॉर्ड केले होते. पुन्हा घाट उतरून त्या गावात आल्या आणि आपली गाडी घेऊन तालुक्याच्या गावी पोहोचल्या.

नीलिमाने मोठी बातमी तयार केली आणि फोटो आणि रेकॉर्डिंगसह ऑफिसला पाठवली. खानोलकर साहेबांनी बातमी, फोटो, रेकॉर्डिंग पाहिले. त्यानी संपादक मेहताना बातमी दाखवली. मेहताच्या लक्षात आले, ही बातमी सर्वप्रथम आपल्या पेपरला लागायला हवी, मग पाहिजे तर न् वर देऊ.

दुसऱ्या दिवशी त्या पेपरचे पहिल्या पानावर ठळक बातमी होती.

"स्वातंत्र्य मिळून पंचांहत्तर वर्षे झाली तरी जिल्ह्यात वीज नाही, सरकारी योजना पोहोचल्या नाहीत, रेशनकार्ड नाही.”
त्या दोघी सासूसुनेचे फोटो होते, त्यांच्या घराचे फोटो होते.

लोकसभा निवडणूक काही दिवसावर होती. सत्ताधारी पक्षाचा खासदार तिसऱ्यांदा निवडणूक लढवत होता. त्याच्या हातात सकाळचा पेपर पडला मात्र, तो खवळला, त्याने त्या भागातील कार्यकर्त्याना फोन लावले आणि ताबडतोब त्या वाडीत जायला सांगितले.

ऊन् वरील सर्व चॅनेलवार कालच्या रेकॉर्डिंग परत परत दाखवत होते. पालकमंत्री आमदारावर चिडले. आमदार मामलेदारावर चिडले. मामलेदार त्या गावातील तलाठ्यावर भडकले.  कलेक्टर आपला लवाजमा घेऊन निघाले, सोबत मामलेदार होते, ग्रामसेवक होते, तलाठी होते, निवडणूक लढवणारे उमेदवार होते.

गावात अजून सकाळचे पेपर आले नव्हते. लोकांना कळेना एव्हडया सरकारी गाड्या गावात कशासाठी धाऊ लागल्या? सर्व मंडळींनी आपल्या गाड्या गावात थांबवल्या आणि घाटी चढायला लागले.

त्या सासू सुना नेहेमी सारख्या निवांत होत्या. तांदूळ जात्यावर दळत होत्या. मधेच शेळ्याना हिरवे गवत घालत होत्या.

अचानक बाहेर गडबड सुरु झाली म्हणून त्या बाहेर आल्या. बाहेर इतकी माणसे का जमा झाली, त्यांना कळेना.

कलेक्टर फिरून घर पहात होता. त्यांनी सुनेला विचारले "लाईट नाही आली काय?”

"न्हाई.”

"रेशनकार्ड आहे?”

"न्हाई.”

"हे तलाठी, ग्रामसेवक कधी आले होते काय?”

"न्हाई.”

"ठीक आहे, तुमची लाईटची व्यवस्था दोन दिवसात होईल, रेशनकार्ड आठ दिवसात मिळेल, तुम्हाला पक्के घर हवे आहे काय?”

"व्हय आनी राकील बी मिलत न्हाई.”

"तुमचे पक्के घर सहा महिन्यात होईल..आणि  रॉकेल खास तुमच्यासाठी मंजूर करतो, ते सरकारचा माणूस घरपोच करेल.

दोन दिवसात सोलर सिस्टिम बसवली गेली आणि मोरेवाडीची धनगरवाडी प्रकाशाने भरून गेली.

 - प्रदीप केळूसकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

फेस, फेसबुक आणि ज्योतिष