सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या कामांची महापौर, आयुक्तांकडून पाहणी
प्रक्रिया न करताच रसायनमिश्रीत पाणी, सांडपाणी नाल्यात
रसायनमिश्रीत पाणी, सांडपाणी नाल्यात; ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'तर्फे लवकरच बैठकीचे आयोजन
नवी मुंबई ः नेरुळ, शिरवणे, तुर्भे एमआयडीसी क्षेत्रातील काही रासायनिक कंपन्या रसायनमिश्रीत प्रदुषित पाणी, सामान्य सांडपाणी प्रक्रिया संयंत्रामार्फत प्रक्रिया न करताच जुईनगर येथील नाल्यात सोडत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून परिणामी साथीचे रोग पसरत आहेत. तसेच सदरचे प्रदुषित पाणी नाल्यावाटे खाडीत जात असल्यामुळे खाडीत असलेली जैविक संपत्ती धोक्यात आलेली असून खाडीतील मासे मृत पावत आहेत. त्यामुळे सदर प्रकारामुळे भविष्यात स्थानिक मच्छीमार बांधवांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य आणि खाडीतील जैविक संपत्ती धोवयात आणणाऱ्या मुजोर कंपन्यांची चौकशी करुन त्यांची परवानगी रद्द करण्यात यावी. तसेच संबंधित दोषी कंपन्यांवर गुन्हे दाखल करतानाच या कंपन्यांना पाठिशी घालणऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'चे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रेे यांनी ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'कडे केली आहे.
यासंदर्भातील निवेदन सविनय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील ‘मनसे'च्या शिष्टमंडळाने ‘एमपीसीबी'च्या उप-प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिले. नेरुळ, शिरवणे, तुर्भे एमआयडीसी क्षेत्रातील काही रासायनिक कंपन्या रसायनमिश्रीत प्रदुषित पाणी, सामान्य सांडपाणी प्रक्रिया संयंत्रामार्फत प्रक्रिया न करताच जुईनगर येथील नाल्यात सोडत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून परिणामी साथीचे रोग पसरत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी वारंवार ‘मनसे'च्या कार्यालयात केलेल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य आणि खाडीतील जैविक संपत्ती धोक्यात आणणाऱ्या कंपन्यांची चौकशी करुन त्यांची परवानगी रद्द करण्यात यावी आणि संबंधित दोषी कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच या दोषी कंपन्यांना पाठिशी घालणाऱ्या ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'च्या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि सामान्य सांडपाणी प्रक्रिया संयंत्रच्या संचालकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘मनसे'च्या शिष्टमंडळाने ‘मंडळ'च्या उप-प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे व्ोÀली आहे. तसेच संबंधितांवर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ‘मनसे'तर्फे सदर निवेदनातून ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'च्या अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. यावेळी ‘मनसे'च्या शिष्टमंडळात उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांच्यासह सहसचिव अभिजीत देसाई, विभाग अध्यक्ष अक्षय भोसले, अनिकेत भोपी, सुहास मिंडे, भूषण कोळी, रोजगार विभागाचे उपशहर अध्यक्ष अनिकेत पाटील, बाबाजी गोडसे, आदि उपस्थित होते.
चर्चेप्रसंगी ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'च्या अधिकाऱ्यांनी सीईटीपी प्लांटमध्ये जाणाऱ्या ‘एमआयडीसी'च्या मलनिःसारण वाहिन्या नादुरुस्त असल्यामुळे सदर रसायनमिश्रित प्रदुषित पाणी थेट नाल्यामधे जात असल्याचे सांगून सदर प्रकाराला एमआयडीसी आणि सीईटीपी प्लांट जबाबदार असल्याचे सांगितले. त्याअनुषंगाने पुढील आठवड्यात एमआयडीसी आणि सीईटीपी प्लांटचे अधिकारी तसेच ‘मनसे'चे पदाधिकारी यांच्यासोबत संयुक्त बैठक लावून सदरचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले. -सविनय म्हात्रे, उपशहर अध्यक्ष - मनसे, नवी मुंबई.