‘नमुंमपा'तर्फे ५०२२७ मुदतबाह्य अभिलेख नस्ती नष्ट
नवी मुंबई : क्षेत्रीय कार्यालयांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १०० दिवसांचा कृती आराखडा जाहीर केलेला असून या अंतर्गत ७ कलमी कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. यामध्ये ‘नमुंमपा'ने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आघाडी घेतली असून महापालिकेचे संकेतस्थळ अधिक अद्ययावत आणि वापरण्यास सुलभ करण्यात आलेले आहे. स्वतंत्र ॲपही कार्यान्वित करण्यात आलेले आहे.
महापालिका मार्फत पुरविण्यात येणाऱ्या लोकसेवा ऑनलाईन करण्यावर भर देण्यात आला असून नागरिकांना विनासायास सुलभतेने सेवा उपलब्धतेसाठी पावले उचलण्यात आलेली आहेत. जनतेच्या तक्रारींचे निवारण जलदगतीने होऊन त्यांना समस्येचे निराकरण झाले असल्याचे सूचित करणारी तक्रार निवारण प्रणाली अद्ययावत करण्यात आलेली असून त्यामुळे नागरिकांशी संवाद वाढला आहे. यामध्ये कार्यालयीन स्वच्छतेवर भर देतानाच कार्यालयांमध्ये स्वच्छ प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सर्व सुविधांसह सुसज्ज प्रतिक्षा कक्ष आणि त्याठिकाणी वाचनासाठी पुस्तकांची सुविधा असे विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहेत.
कार्यालयीन स्वच्छतेवर भर देताना कागदपत्रे आणि नस्तींचे निंदणीकरण, तपासणी, नष्टीकरण तसेचनिर्लेखनाची प्रक्रिया सर्वच विभागांमध्ये आणि विभाग कार्यालयांमध्ये प्राधान्याने हाती घेण्यात आलेली असून सर्व अभिलेखांचे वर्गीकरण करुन नियमानुसार अ- वर्ग, ब-वर्ग, क-वर्ग, ड-वर्ग याप्रमाणे विहित कालावधीकरिता अभिलेख जतन करण्यासाठी अभिलेख कक्षाकडे पाठविण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे अभिलेखांच्या निंदणीकरणानंतर आवश्यक नसलेला अभिलेख नियमांचे रितसर पालन करून नष्ट करण्यात आलेला असून मुदतबाह्य अभिलेखही नष्ट करण्यात येत आहे. यामध्ये तब्बल ५०,२२७ मुदतबाह्य नस्ती (फाईल्स) नष्ट करण्यात येत असून त्यामध्ये ब वर्गातील ४६, क-१ वर्गातील ३६८०८, क-वर्गातील ४०६६ आणि ड-वर्गातील ९३०७ नस्तींचा समावेश आहे. सदर मुदतबाह्य नस्ती नष्ट करण्यात येत असल्याची माहिती अभिलेख कक्ष विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे यांनी दिली आहे.
मुदतबाह्य नस्तींमध्ये स्थानिक संस्था कर-उपकर विभागाच्या सर्वाधिक २३०७०, बेलापूर अभिलेख कक्षातील क-१ वर्गातील ९९५५ तसेच क-वर्गातील २७४९, ऐरोली अभिलेख कक्षातील ब-वर्गातील ४६, क-१ वर्गातील २६८५३ आणि क-वर्गातील १३१७ नस्तींचा समावेश आहे. यासोबतच ड-वर्गातील ९३०७ वर्गातील नस्तीही नष्ट करण्यात येत आहेत. अशाप्रकारे एकूण ५०,२२७ नस्ती नष्ट करण्यात येत आहेत.
कृती आराखड्यात जोमाने केलेली अभिलेख विषयक निंदणीकरण, नष्टीकरण, निर्लेखन व अभिलेख कक्षात जतन यावाबतची प्रक्रिया यापुढील काळात सर्व विभागांनी नियमित सुरूरु ठेवून त्याकरिता कालावधी निश्चित करावा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्वच विभागांना दिले आहेत.
दरम्यान, १०० दिवसांच्या कृती आराखड्यातील ७ कलमांतर्गत नमूद सर्वच बाबींच्या कार्यवाहीत ‘नमुंमपा'ने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीपासूनच आघाडी घेतली असून महापालिकेची आधीपासूनच स्वच्छ असणारी कार्यालये आता अधिकच सुंदर दिसू लागली असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून प्राप्त होत आहेत.