‘नमुंमपा'ची मालमत्ता कर थकबाकींदारांसाठी अभय योजना

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका तर्फे मालमत्ताकर थकबाकीदारांना एक उत्तम संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महापालिकेने मालमत्ताकर विलंब शास्तीमध्ये ५० टक्के सूट देणारी अभय योजना १० मार्च पासून ३१ मार्च २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबत निर्णय घेतला असून मालमत्ता कर थकबाकीदारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि विलंब शुल्क वजा करुन आपली देयके भरावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, अभय योजना अंतर्गत मूळ मालमत्ताकराच्या थकीत रवकमेत कोणतीही सवलत नसून मूळ मालमत्ता कर तसेच सवलतीनंतरच्या शास्तीसह येणारी संपूर्ण देय रक्कम भरणा करणे आवश्यक आहे. अंशतः भरलेल्या रक्कमेस ‘अभय योजना'चा लाभ मिळणार नाही.

महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांनी दिलेल्या वेळेत कर भरणा करण्यासाठी वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. तरीही काही मालमत्ताधारक अद्यापही कराचा भरणा करणेस टाळाटाळ करीत आहेत. याबाबत थकबाकी असलेल्या नागरिकांवर विशेष लक्ष केंद्रीत करुन कायदेशीर अटकावणीची कार्यवाही करण्यात येत आहे.                                                                        

नमुंमपा महापालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर थकीत आहे. मालमत्ताकर चांगल्या पध्दतीने वसुली होण्यासाठी महापालिका आयुक्त यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार विलंब शास्तीमध्ये माफीचे अधिकार प्राप्त आहेत. त्यानुसार आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आदेश पारित करुन मालमत्ता कर विलंब शास्तीत सूट देणारी अभय योजना जाहीर केली आहे. यामध्ये ३१ मार्च २०२५ रोजी पर्यंत चालू वर्षापर्यंतचा मालमत्ता कर एकरकमी भरल्यास मालमत्ता कर विलंब शास्तीमध्ये ५० टक्के सूट देणारी अभय योजना जाहीर केली आहे.

असा घ्या योजनेचा लाभ...
‘अभय योजना'साठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. सदर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा  nmmc.gov.in या संकेत स्थळावर तसेच 'My NMMC-माझी नवी मुंबई या मोबाईल ॲपवर त्याचप्रमाणे महारपालिका मुख्यालय, सर्व विभाग कार्यालये आणि सर्व देयक भरणा केंद्रांवर उपलब्ध आहे. मालमत्ता कराचा भरणा महापालिका मुख्यालय, सर्व विभागीय कार्यालये आणि सर्व भरणा केंद्रावर रोख, धनादेश, धनाकर्ष याव्दारे भरता येईल. धनादेश ‘अभय योजना' कालावधीमध्ये कोणत्याही कारणास्तव न वठल्यास अर्जदारास अभय योजनेचा लाभ अनुज्ञेय होणार नाही. तसेच कराचा भरणा महानगरपालिकेच्या  nmmc.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, इंटरनेट बँकींग, एनईएफटी, आरटीजीएस, युपीआय तसेच My NMMC-माझी नवी मुंबई या मोबाईल ॲपद्वारे करता येईल. रोखीने भरणा करावयाचा असल्यास भारतीय रिझर्व्ह बँकेचे या संदर्भातील नियम लागू होतील, याची नोंद घेण्यात येईल.

अभय योजना लागू होण्यापूर्वी भरणा केलेला मालमत्ताकर तसेच शास्ती, व्याजाच्या रक्कमेच्या संदर्भात कोणतीही सूट मिळणार नाही. तसेच त्यांचा परतावा देखील मिळणार नाही. अभय योजना केवळ दिनांक १० मार्च ते ३१ मार्च २०२५ रोजी, रात्री १२ वाजेपर्यंत विहीत मुदतीत चालू वर्षापर्यंतचा मालमत्ताकर एकरकमी भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांनाच लागू असणार आहे. यामुळे नागरिकांनी मुदतीत चालू वर्षापर्यंतचा मालमत्ताकर एकरकमी भरणा करुन ‘अभय योजना'चा लाभ घ्यावा. तसेच करवसुलीसाठी येणाऱ्या वसुली पथकांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
-डॉ. कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण मधील डोंगरात आगीचा डोंब