एपीएमसी पुनर्विकासाचा प्रश्न
नवी मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून ‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीे'चा पुनर्विकास रखडला आहे. दिवसेंदिवस ‘एपीएमसी'मधील इमारती जीर्ण झाल्या असून मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे ‘एपीएमसी'चा पुनर्विकास प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच अनुषंगाने ४ एप्रिल रोजी वाशी येथील कांदा-बटाटा मार्केट येथील ‘बाजार समिती'चे सभापती प्रभू पाटील यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. यावेळी ‘एपीएमसी'चे उपसभापती हुकूमचंद आमदरे, ‘फळ मार्के'चे संचालक संजय पानसरे, ‘कांदा-बटाटा मार्के'चे संचालक अशोक वाळुंज, ‘भाजी मार्के'चे संचालक शंकर पिंगळे, अप्पर निबंधक (सह. संस्था) तथा सचिव डॉ. पी. एल. खंडागळे, शशी भानुशाली, पांडुरंग आमले, सुधीर आंग्रे, दत्तात्रेय दुबे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
‘एपीएमसी'चा पुनर्विकास करतेवेळी विकासक कोण असावा आणि कसा असावा? त्याची काम करण्याची पात्रता आहे की नाही? त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे आहे की नाही? या सर्व गोष्टींचा विचार करुनच पीएमसी नेमावी, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. त्याचबरोबर विकासक आपल्याला वेळेत काम पूर्ण करून देणारा आणि कामाची गुणवत्ता देणारा असावा. तसेच नवी मुंबईमधील वाशी विभागात इमारती तोडून ठेवलेल्या आहेत आणि अजून पर्यंत काम देखील चालू नाही, लोकांना भाडे देखील मिळत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींची माहिती घ्यावी, अशी सूचना आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थितांना केली.
सदर बैठकीत ‘एपीएमसी'मधील रस्त्यांची समस्या, अनधिकृत फेरीवाले अशा विविध प्रश्नाबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. तसेच ‘एपीएमसी'चे सभापती प्रभू पाटील यांच्या सानिध्यात ‘एपीएमसी'च्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला पाहिजे.महत्वाचे म्हणजे एपीएमसी पुनर्विकासाबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येणार असल्याचे आमदार सौ. म्हात्रे यांनी सांगितले.