लोकांचे प्रेम हीच माझी संपत्ती -डॉ. इंदु राणी जाखड

कल्याण : माझी सर्वात मोठी संपत्ती म्हणजे लोकांचे प्रेम. त्यामुळेच कृतज्ञता सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहिलेले नागरिक त्याचीच पोचपावती आहे, असे भावोद्‌गार कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माजी आयुक्त तथा ‘पालघर'च्या जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी काढले.

केडीएमसी आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या डॉ. इंदु राणी जाखड यांची बदली पालघर जिल्हाधिकारी पदावर झाली आहे. त्याअनुषंगोन महापालिकेच्या आचार्य प्र. के. अत्रे रंगमंदिरात डॉ. इंदु राणी जाखड यांच्यासाठी कृतज्ञता सोहळा आणि नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल यांच्यासाठी स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. जाखड यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

प्रकल्प अंमलबजावणीचे काम माझ्यासाठी नवीन होते आणि ते करताना काही कठोर निर्णय घ्यावे लागले. परंतु, राजकीय प्रतिनिधींनी देखील पूर्ण पाठिंबा दिला. महापालिका प्रशासक म्हणून काम करणे फार मोठी संधी असून ती एक मोठी जबाबदारी देखील आहे. पण, सर्वांच्या सहकार्याने मला चांगले काम करता आले, नागरिकांशी सुसंवाद साधता आला. आता या कामाची जबाबदारी महापालिका आयुक्त अभिनव गोयल पार पाडतील, असे डॉ. इंदु राणी जाखड म्हणाल्या.

याप्रसंगी माजी आमदार राजेश मोरे, विश्वनाथ भोईर, ‘राष्ट्रवादी'चे नेते प्रमोद हिंदुराव, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांचे पती मोहित गर्ग, इतर कुंटूंबीय, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त-१ हर्षल गायकवाड, अतिरिक्त आयुक्त-२ योगेश गोडसे तसेच इतर अधिकारी वर्ग व्यासपिठावर उपस्थित होते.

पालघर जिल्हाधिकारी आणि माजी महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी उभारलेले फांऊडेशन माझ्यासाठी नक्कीच पथदर्शी असेल. विचारमंथन करुन सर्वांसोबत सुसंवाद साधून जास्तीत जास्त चांगले लोकोपयोगी काम करण्याचा मी प्रयत्न करेन, अशा शब्दात नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थितांना आश्वासित केले.

डॉ. जाखड यांच्या आयुक्तपदाच्या काळात २७ गावांतील अमृत योजनेच्या कामाला चांगली गती मिळाली, असे माजी आमदार राजेश मोरे म्हणाले. तर, डॉ. इंदु राणी जाखड आपल्या परिवाराप्रमाणे कल्याण-डोंबिवलीची काळजी घेतला, असे माजी आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.

डॉ. इदु राणी जाखड यांच्या आयुक्तपदाच्या कालावधीत परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केल्याने परिवहन विभागाने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करीत त्यांचा सत्कार केला. महापालिका अधिकारी-कर्मचारी वर्गाच्या वतीने देखील त्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी परिवहन उपक्रमातील लाभार्थी कर्मचाऱ्यांना प्रतिकात्मक स्वरुपात निवृत्ती वेतन आदेश आणि धनादेश वितरीत करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्यान विभागाचे महेश देशपांडे यांनी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भिवंडी मध्ये १४४४ इमारती धोकादायक