खोणी ग्रामपंचायतीत १ कोटींचा गैरव्यवहार; ग्रामविकास अधिकारी सेवेतून बडतर्फ
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील खोणी ग्रामपंचायतीत तब्बल १ कोटी रुपयांहून अधिक निधीचा गैरव्यवहार उघडकीस आल्याने ग्रामपंचायत वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर आर्थिक अपहार प्रकरणात गुंतलेल्या तत्कालीन ग्रामविकास अधिकारी राम जगन्नाथ म्हस्के यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ‘ठाणे जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी म्हस्के यांच्यावर फौजदारी कारवाई आणि रवकमेची वसुली करण्याचे आदेश दिले आहेत.
जानेवारी २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत खोणी ग्रामपंचायतीमध्ये म्हस्के यांनी ग्रामनिधी आणि १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचा अपहार, निविदा प्रक्रियेत अनियमितता, खोटे धनादेश काढणे, काही ठराविक ठेकेदारांना मर्जीतून कामे देणे, तसेच ठेकेदाराच्या नावाने धनादेश न देता रोखीने रक्कम काढणे, असे गंभीर गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य शाहनवाज इम्तियाज कुरेशी यांनी ‘जिल्हा परिषद'च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सविस्तर तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने ‘जिल्हा परिषद'तर्फे चौकशीचे आदेश दिले होते.
चौकशीच्या प्रक्रियेदरम्यान म्हस्के यांनी गैरहजर राहणे, दप्तर न सादर करणे, चौकशी अधिकाऱ्यांना सहकार्य न करणे असे प्रकार केले. त्यामुळे म्हस्के यांनी जाणीवपूर्वक बेजबाबदारपणा आणि गैरवर्तणूक केल्याचे सिध्द झाले. ‘कल्याण पंचायत समिती'च्या गटविकास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात म्हस्के यांचा दोष स्पष्टपणे नमूद करण्यात आला. यानंतर ठाणे विधी लेखा कार्यालय आणि कोकण विभागाचे सहाय्यक आयुक्त (चौकशी) यांनी स्वतंत्र लेखापरीक्षण करुन अहवाल सादर केला. या अहवालानुसार म्हस्के यांच्यावरील सर्व आरोप सिध्द झाल्याचे नमूद केले आहे. स्थानिक निधी लेखा परीक्षणानुसार, १४ वा वित्त आयोग निधी १६ लाख ७८ हजार ४४५ रुपये आणि ग्रामनिधी १० लाख ५५ हजार ३०२ रुपये आणि इतर अशा एकूण १ कोटी ४० लाख ३९ हजार ७३८ रुपये इतक्या निधीचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. या संपूर्ण रवकमेबाबत म्हस्के यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी या प्रकरणात कठोर निर्णय घेत ‘भिवंडी पंचायत समिती'चे गटविकास अधिकारी गोविंद खामकर यांना रक्कम वसूल करण्याचे, जप्तीची प्रक्रिया राबविण्याचे आणि फौजदारी कारवाई सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच म्हस्के यांच्या विरोधात पुढील कायदेशीर पावले उचलण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे तयार करण्याचे निर्देशही दिले गेले आहेत. या प्रकरणात झालेल्या बडतर्फीच्या निर्णयामुळे संपूर्ण भिवंडी तालुक्यातील पंचायत यंत्रणेत खळबळ उडाली आहे. अनेक ग्रामपंचायतीतील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात यामुळे जबाबदारीची जाणीव आणि दक्षतेचा इशारा निर्माण झाला आहे.
नागरिकांच्या करातून मिळणारा निधी पारदर्शकपणे वापरला जावा आणि ग्रामविकासाच्या कामांत पारदर्शकता रहावी, यासाठी सदर कारवाई आदर्श ठरणारी असल्याचे मत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. ‘जिल्हा परिषद'ने या प्रकरणातील निधी वसुली बाबतची कार्यवाही लवकर पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. म्हस्के यांच्याकडून रवकमेची वसुली न झाल्यास त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनिक सूत्रांनी सांगितले. सदर प्रकरणामुळे पंचायत प्रशासनात प्रामाणिकतेचे आणि पारदर्शकतेचे नवीन निकष निर्माण होतील, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.