‘मेट्रो'चे सर्व टप्पे २०२६ अखेरपर्यंत प्रवाशांसाठी खुले -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाणे : मेट्रो-४ आणि मेट्रो-४ अ या मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला जोडणाऱ्या मेट्रो-११ या मार्गिकेला जोडण्यात येणार असल्याने ५८ कि.मी. लांबीची देशातील सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठाणेकर आणि मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार आहे. पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत या ‘मेट्रो'चे सर्व टप्पे प्रवाशांकरिता खुले होतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मेट्रो मार्ग-४ (वडाळा-कासारवडवली) आणि ४ अ (कासारवडवली-गायमुख) च्या टप्पा-१ गायमुख जंक्शन गायमुख गाव- घोडबंदर रोड- कासारवडवली- विजय गार्डन या मार्गिकेच्या प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी आणि ट्रायल रनची सुरुवात २१ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री तथा ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण'चे (एमएमआरडीए) अध्यक्ष एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, ‘एमएमआरडीए'चे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना, कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, ‘ठाणे'चे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, आदि उपस्थित होते.
घाटकोपर-मुलुंड-गायमुख या मेट्रो मार्गिकेची एकूण लांबी ३५ किलोमीटर असून मेट्रो-४ ची ३२ कि.मी. आणि मेट्रो-४ अ ची २.८८ कि.मी. आहे. मार्गिकेत एकूण ३२ स्थानके असून या प्रकल्पासाठी १६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मेट्रो-४, मट्रो-४ अ, मट्रो-१० आणि मेट्रो-११ या सर्व ‘मेट्रो'साठी डेपो तयार करण्याकरिता भोगरपाडा येथे ४५ हेक्टर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या मेट्रो मार्गिकेचा विशेष फायदा म्हणजे पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सर्व मार्गांना जोडणारा सदर मार्ग असणार आहे. पुढे सदरी मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनसला जोडणाऱ्या मेट्रो-११ ला जाडली जाणार आहे. त्यामुळे ५८ कि.मी. लांबीची देशातील सगळ्यात मोठी मेट्रो मार्गिका निर्माण होणार आहे. या मेट्रोच्या सर्व मार्गिका सुरु झाल्यावर या माध्यमातून १३ लाखापेक्षा जास्त दैनंदीन प्रवासी प्रवास करतील. या ‘मेट्रो'मुळे रस्त्यावरची वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी होईल. पुढील वर्षाच्या शेवटापर्यंत या ‘मेट्रो'चे टप्प्याटप्प्याने सर्व टप्पे प्रवशांकरिता खुले झाले पाहिजेत असा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
‘मेट्रो'मुळे ठाणेतील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत -उपमुख्यमंत्री शिंदे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या ‘मेट्रो'च्या कामाला परवानगी मिळाली आणि आज त्यांच्याच काळात सदर प्रकल्प पूर्णत्वास येत असल्याचा विशेष आनंद होतो आहे. ५८ कि.मी. लांबीचा एलिव्हेटेड मेट्रो प्रकल्प भारतातील पहिला प्रकल्प आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदर प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यवत केला.
या प्रक्रियेत कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेपटी यांच्या आवश्यकतेनुसार सर्व तांत्रिक प्रणाली सज्ज आहेत की नाही याचे पुनरावलोकन करण्यात आले. या विभागातील मूलभूत पायाभूत सुविधा उड्डाणपूल, मार्गिका आणि ओव्हरहेड इक्विपमेंटपूर्ण झाल्या आहेत. तपासणी आणि प्रारंभिक चाचणी धाव दरम्यान लोड कॅल्क्युलेशनसाठी आणि सॉपटवेअर कॉन्फिगरेशनसाठी आवश्यक माहिती गोळा करणे, तसेच सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रणालींची (मेट्रो, ट्रेन इत्यादी) चाचणी घेऊन त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले.