म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
घोडबंदर परिसरातील समस्यांबाबत महापालिकेत बैठक
ठाणे : वन खात्याकडून आवश्यक परवानगी प्राप्त मिळायची असल्याने गायमुख घाट रस्त्याचे काँक्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी होणे शक्य नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गायमुख घाट रस्त्याची व्यवस्थित डागडुजी आणि डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने करावे, असे निर्देश ठाणे महान्पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
गायमुख घाट ते फाऊंंटन हॉटेल पर्यंतचा रस्ता मिरा-भाईंदर महापालिकाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. मात्र, त्यावरील गायमुख घाट काँक्रिटीकरणाची जबाबदारी ‘पीडब्ल्यूडी'ने त्यापूर्वीच घेतलेली असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. वन खात्याकडून परवानगी मिळाल्यानंतर या कामाचे कार्यादेश देण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त सौरभ राव यांनी गायमुख घाट रस्त्याच्या डागडुजीकरण आणि डांबरीकरणाचे निर्देश दिले आहेत.
घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी आयोजित समन्वय बैठक ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात पार पडलीं. या बैठकीस घोडबंदर रोड येथील ‘जस्टीस फॉर घोडबंदर रोड फोरम'चे प्रतिनिधी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, सहायक संचालक नगररचना संग्राम कानडे, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, सुधीर गायकवाड, शुभांगी केसवानी, उपायुक्त दिनेश तायडे, शंकर पाटोळे, मधुकर बोडके, घोडबंदर रस्ता येथे काम करणाऱ्या सर्व यंत्रणांचे समन्वयक कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह ठाणे महापालिकेचे अधिकारी, मिरा-भाईंदर आणि नवी मुंबई येथील वाहतूक पोलीस अधिकारी, मेट्रो, महा मेट्रो, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
‘जस्टीस फॉर घोडबंदर रोड'च्या प्रतिनिधींनी गायमुख घाट दुरुस्तीबद्दल सद्यस्थिती जाणून घेतली. पावसाळ्यापूर्वी काँक्रिटीकरणाचे काम सुरु होणार नसल्याने सदर रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ऐन पावसाळ्यात वाहतूक योग्य राहील, याची काळजी घ्यावी अशी सूचना केली. तसेच मेट्रो, सेवा रस्त्याचे एकत्रीकरण तसेच भाईंदरपाडा आणि कासारवडवली उड्डाणपुल यांचे बांधकाम आदि कामे सुरु असल्याने त्यात गायमुख रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची भर घालू नये, अशी सूचना प्रतिनिधींनी केली. त्याला प्रतिसाद देताना महापालिका आयुक्त राव यांनी ‘पीडब्ल्यूडी'कडून तसेच वन विभागाच्या नागपूर कार्यालयातून परवानगीची सद्यस्थिती जाणून घेतली. ‘पीडब्ल्यूडी'ने सादर केलेल्या प्रस्तावाबाबत वन विभागाने अधिकची माहिती मागवली आहे. सदर सर्व प्रक्रियेस लागणारा संभाव्य वेळ लक्षात घेऊन तुर्तास येत्या पावसाळ्यात या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा पर्याय शिल्लक असून त्याबद्दल ‘पीडब्ल्यूडी'ने तातडीने योग्य ती पावले उचलावीत, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले.
कासारवडवली उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात ‘मेट्रो'ने ३० आणि ३१ मार्च रोजी तेथील सर्व कामे पूर्ण करुन घ्यावीत. तर ५ आणि ६ एप्रिल रोजी ‘पीडब्ल्यूडी'ने रस्त्याची दुरुस्ती करावी. त्यासाठी त्यांना वाहतूक पोलिसांकडून आवश्यक ते सहकार्य देण्यात येईल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
‘वॉर्डन'ची वाढणार संख्या...
वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी नेमण्यात आलेल्या ‘वॉर्डन'च्या संख्येबद्दल बैठकीत चर्चा झाली. त्यांच्या समस्या जाणून घेऊन पगाराविषयीचे प्रश्न सोडवून जास्तीत जास्त वॉर्डन रस्त्यावर वाहतूक नियंत्रणासाठी उपयोगी येतील या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश आयुक्त यांनी मेट्रो तसेच ‘पीडब्ल्यूडी'ला दिले. त्याचबरोबर घोडबंदर रोड परिसरातील मोठ्या गृहनिर्माण सोसायटी, मॉल, शाळा, व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांच्याकडील एक वॉर्डन त्यांच्या हद्दीच्या बाहेर वाहतुकीच्या सोयीसाठी तैनात करावा, असे पत्र महापालिका शहर विकास विभागामार्फत संबंधित आस्थापनांना देणार असल्याचेही आयुक्त राव यांनी सांगितले.
रात्री ९ नंतरच अवजड वाहने...
पावसाळा कालावधीमध्ये अवजड वाहनांची वाहतूक रात्री ९ नंतरच सुरु करावी. मुंबई आणि नवी मुंबईतून येणाऱ्या अवजड वाहनांविषयी समन्वय साधून त्यांचे नियंत्रण करण्यात यावे, अशी सूचना ‘जस्टीस फॉर घोडबंदर रोड'च्या प्रतिनिधींनी केली. त्यासंदर्भात वाहतूक विभागाने अधिक चर्चा करुन निर्णय घ्यावा, असे आयुक्त राव म्हणाले.