बुलेट ट्रेन'चे ठाणे स्टेशन होणार पहिले मल्टीमोडल इंटीग्रेटेड स्टेशन
ठाणे : हाय स्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पामुळे आर्थिक गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. ‘बुलेट ट्रेन'च्या ठाणे स्टेशनमध्ये, बुलेट ट्रेन, रेल्वे, मेट्रो, अंतर्गत मेट्रो, बस, जेट्टी (जलमार्ग), कॅब-रिक्षा स्थानके तसेच लगतचे सर्व मोठे महामार्ग आणि विशेष रस्त्याद्वारे विमानतळही जोडण्यात येणार आहे. ठाण्यात सर्व वाहतूक सुविधांचे जंक्शन तयार होणार आहे. शहराचे आमुलाग्र परिवर्तन करण्याची क्षमता असलेल्या, राज्यातील हाय स्पीड रेल्वे स्टेशन परिसराच्या विकासात सर्व घटकांनी सक्रिय सहभाग घेण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने स्टेशन परिसर विकासाची दिशा निश्चित व्हावी यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, गुजरात सरकार, जपान सरकार, स्थानिक महापालिका, संबंधित घटकांचे प्रतिनिधी यांच्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे २६ सप्टेंबर रोजी ठाणे मध्ये आयोजन करण्यात आले.
मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पामध्ये एकूण १२ स्टेशन्स आहेत. त्यापैकी ४ स्टेशने (मुंबई, ठाणे, विरार, बोईसर) महाराष्ट्रातील आहेत. या स्टेशन परिसरांचा नियोजनपूर्वक विकास करणे प्रस्तावित आहे. यासाठी भारत सरकार, जपान सरकार आणि राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार झालेला आहे. यापैकी ठाणे आणि विरार स्टेशन परिसराचा नियोजनबध्द विकास आराखडा स्थानिक महापालिका, जपान सरकारचे प्रतिनिधी जायका आणि नगरविकास विभाग संयुक्तपणे करीत आहे. या प्रकियेत नियोजनामध्ये सर्व भागधारक घटकांचा समावेश करुन त्यांना नेमक्या कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत, ते जाणून घेण्यासाठी सदर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
केंद्रीय गृहनिर्माण-नागरी विकास मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लि. यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वात शहर विकास विभागाने या चर्चासत्राचे संयोजन केले. त्यात केंद्र सरकारची नगर नियोजन संघटना, जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जायका), नगररचना आणि मूल्यांकन विभाग, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार महापालिका यांचे प्रतिनिधी तसेच बांधकाम व्यावसायिक, आर्कटिेक्ट, विविध संघटना यांचे प्रतिनिधी या चर्चासत्रात सहभागी झाले होते.
हाय स्पीड रेल्वे स्टेशन परिसर विकासासाठी धोरण निश्चित करण्याचे काम सुरु आहे. त्यातील विषय, आव्हाने, संधी यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे. नागरिकांना सदर प्रकल्पाचा फायदा व्हावा, राज्यात या परिसराचा ट्रान्सिट ओरिएंटेड विकास व्हावा यादृष्टीने चर्चासत्र आवश्यक असल्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (नगरविकास विभाग) असीम गुप्ता यांनी स्पष्ट केले.
‘हाय स्पीड रेल्वे'च्या राज्यातील स्टेशन्सबाबत राज्याची भूमिका नगरविकास-मुल्यनिर्घारण विभागाचे संचालक जितेंद्र भोपळे यांनी मांडली. बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर या स्टेशन परिसराची नियोजनबध्द आखणी करण्यात येत आहे. त्यातून नियोजनाचा चांगला आदर्श तयार होईल, असे जितेंद्र भोपळे यांनी सांगितले.
हाय स्पीड रेल्वे स्टेशन परिसराचा नियोजनबध्द विकास झाल्याने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक येईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. या मार्गावरील ठाणेतील स्टेशन परिसर विकास करताना २५ टक्क्याहून अधिक जागेवर हरित क्षेत्र राखले जाणार आहे. ठाणे हाय स्पीड स्टेशन भारतातील पहिले मल्टीमोडल इंटीग्रेटेड स्टेशन असेल. त्यात, बुलेट ट्रेन, रेल्वे, मेट्रो, अंतर्गत मेट्रो, बस स्टेशन, जेट्टी (जलमार्ग), कॅब-रिक्षा स्थानके तसेच लगतचे सर्व मोठे महामार्ग आणि विशेष रस्ते यांच्याद्वारे विमानतळ जोडण्यात येणार आहे. सामान्य नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध होतील. या सर्व सुविधा अत्यंत नियोजनबध्द एकमेकांना पूरक पध्दतीने जोडण्यात येतील, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
‘प्रोजेक्ट स्मार्ट'बद्दल नगरविकास विभागाच्या सहसचिव सुलेखा वैजापूरकर यांनी सादरीकरण केले. तर हाय स्पीड रेल्वे प्रकल्प, आतापर्यंतची प्रगती यांचा आढावा ‘नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन'चे व्यवस्थापकीय संचालक अंजुम परवेझ आणि मुख्य आर्कटिेक्ट कामिनी शर्मा यांनी सादर केला. ‘जायका'तर्फे साईचरो अकिमुरा, मुझुकी ओसावा टोमोनी सातो, योचीही हार्दा, कोजी यामादा या प्रतिनिधींनी बुलेट ट्रेन स्टेशनमुळे जपानमध्ये कसे बदल झाले आणि भारतात कोणत्या संधी आहेत, याचे विवेचन केले. तर, वसई-विरार शहर महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त डॉ. दिपक सावंत यांनी स्थानिक विकासाबाबत सादरीकरण केले. वसई-विरार महापालिका आयुक्त सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते.
चर्चासत्रात चर्चा आणि प्रश्नोत्तरांमध्ये केंद्रीय गृह-नागरी विकास मंत्रालयातील संचालक रोहिना गुप्ता, ‘पालघर'च्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, नमुंमपा आयुक्त डॉ. कैलाश शिंदे, ‘एमएसआरडीसी'चे मुख्य नियोजक सुनील मराळे, ‘पीएमआरडीए'चे नगर नियोजन संचालक अविनाश पाटील, बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी, शैलश पुराणिक, राजन बांदेलकर, सचिन मिरानी, आदि सहभागी झाले होते. ठाणे महापालिकेचे सहाय्यक संचालक (नगररचना) संग्राम कानडे यांनी चर्चासत्राची सांगता केली.