आतकोली क्षेपणभूमी परिसराचा पर्यावरणपूरक विकास
ठाणे : ठाणे महापालिकेच्या आतकोली क्षेपणभूमी आणि परिसराचा पर्यावरणपूरक विकास होणार आहे. या परिसरात बांबुचे बन आणि मध्यभागी विविध ठिकाणी हरित बेटे तयार केली जाणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
राज्य शासनाने ठाणे महापालिकेला भिवंडीतील मौजे आतकोली येथे शास्त्रोक्त पध्दतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ३४ हेक्टर क्षेत्र प्रदान केले आहे. या जागेवर ठाणे महापालिकातर्फे घनकचऱ्याचे व्यवस्थापन केले जात आहे. सदर जागेवर गौण खनिजाचे उत्खनन झालेले असून आता या जागेचा विकास महापालिकामार्फत होत आहे.
शासनाकडून ५० कोटींचा निधी...
आतकोली येथील क्षेपणभूमीतील पायाभूत सुविधांचा विकास, संरक्षक भिंत, सुरक्षा कक्ष, पोहोच रस्ता, २२ एकरचे सपाटीकरण, बांबूचे वन आदि कामांसाठी राज्य शासनाने ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. सदर काम महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. पूर्ण भूखंडाला ४ कि.मी.ची संरक्षक भिंत, त्याला लागून अडीच मीटर अंतराचे बांबुचे बन, कचरा वर्गीकरण प्रकल्पासाठी १२ एकर आणि ग्रॅस निर्मितीसाठी १० एकर अशा एकूण २२ एकर जागेचे सपाटीकरण करण्यात येणार आहे. त्याचसोबत साईट कार्यालय, सुरक्षा कक्ष, शौचालय, २५० मीटरची मलवाहिनी, १५० कि.मी.चा पोहोच रस्ता आणि त्यालगत गटार ही कामे करण्यात येणार आहेत.
या कामांच्या दृष्टीने क्षेपणभूमीची पाहणी २ एप्रिल रोजी महापालिका आयुक्त राव यांनी केली. तसेच सर्व कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे त्यांनी निर्देश दिले. या पाहणीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड आणि शुभांगी केसवानी, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे, आदि उपस्थित होते.
कामे पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा...
आतकोली क्षेपणभूमीची संरक्षण भिंत, बांबुच्या वनाची निर्मिती, सपाटीकरण आदि पायाभूत सुविधांची कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी संबंधित विभागाला दिले. तसेच क्षेपणभूमीलगतच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कचऱ्याची दुर्गंधी तसेच कचरा वाहतूक यांचा त्रास होणार नाही, याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले. सदर प्रकल्पासाठी वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक वीज वाहिनीचे कामही जलद करावे, अशा सूचनाही आयुक्त राव यांनी दिल्या.
क्षेपणभूमीच्या पूर्ण परिघावर बांबुचे बन तयार करण्यात येणार आहे. त्याच जोडीला या पावसाळ्यात क्षेपणाभूमीत ठिकठिकाणी हरित बेटे तयार करावीत. त्याचा योग्य अभ्यास करून कार्यवाही करावी. प्रवेशद्वार, स्थानिक कार्यालय या परिसरातही हरित पट्टा तयार करावा. येथील कचऱ्याचे पूर्ण गांभीर्याने व्यवस्थापन केले जात असल्याचे जाणवले पाहिजे. त्यामुळेच कचरा टाकला की त्यावर मातीचा थर द्यावा. दुर्गंधीनाशक आणि जंतूनाशक रसायनाची प्रभावीपणे फवारणी करावी. कचरा आणि मातीचा विशिष्ट थर तयार झाल्यावर तेथे वृक्षारोपण करावे. या सर्व गोष्टी कटाक्षाने कराव्यात.
-सौरभ राव, आयुवत-ठाणे महापालिका.