प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
मुंब्रामध्ये बहिणीची छेड काढल्याने तिघांवर गोळीबार
ठाणे : ठाणे तसेच मुंब्रा शहरात गेल्या काही दिवसांत गोळीबाराच्या दोन घटना घडलेल्या असतानाच, त्यापाठोपाठ आता आणखी एक अशीच घटना मुंब्य्रात उघडकीस आली आहे. मुंब्रा येथील कैलासनगर परिसरात २ एप्रिल रोजी सकाळी एका व्यक्तीने तीन जणांवर गोळ्या झाडल्या. त्यात एकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाले असून मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून हा प्रकार घडला असल्याची बाब पोलिसांच्या तपासाच पुढे आली आहे. जयन शिवानंदन नायर (५१) असे गोळीबार करणाऱ्याचे नाव आहे.
मुंब्रा येथील कैलासनगर परिसरात सुमनताई चव्हाण हिंदी प्राथमिक विद्यालयाजवळील बिस्मिल्ला चाळ, रूम क्रमांक दोन येथे हा प्रकार घडला. जयन शिवानंदन नायर याच्या मानलेल्या बहिणीची छेड काढण्यात आली होती. याच कारणावरून त्याचा काही जणांशी वाद झाला. हा वाद चिघळल्यानंतर त्याने संतापाच्या भरात गोळीबार केला. या गोळीबारात अब्दुल हसन शेख, अकबर अब्दुल शेख आणि समीर अहमद शेख हे तिघे गंभीर जखमी झाले. या जयन हा तेथून फरार झाला होता. मात्र मुंब्रा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीचा शोध घेत त्याला गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह अटक केली आहे.
दरम्यान, जखमींना तात्काळ मुंब्य्रातील काळसेकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अकबर अब्दुल शेख यांचा मृत्यू झाला, तर उर्वारित दोघांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळे कैलास नगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहाणी करत घटनेचा आढावा घेतला. पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत. जयनला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल शिंदे यांनी दिली आहे.
काही दिवसांपुर्वी मुंब्रा येथील कौसा भागात नदीम खान उर्फ बाबा खान याच्या कारवर गोळीबार झाला होता. या घटनेनंतर पळून गेलेल्या आरोपींना पकडत असताना, आरोपींनी पोलिसांच्या दिशेने पाच गोळ्या झाडल्या होत्या. गोळीबारमध्ये दोन व्यक्ती जखमी झाले होते. त्यानंतर ठाण्यातील पाचपाखाडी भागात भर रस्त्यात गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यात घडला. आता मुंब्य्रात पुन्हा गोळीबाराची घटना घडली असून यामुळे गोळीबाराचे सत्र शहरात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.