ठाणे पालिकेच्या नालेसफाईस मुंब्रा येथून प्रारंभ 

ठाणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका हद्दीतील नालेसफाईच्या कामाचा शुभारंभ ११ एप्रिल रोजी मुंब्रा परिसरातून करण्यात आला. मुंर्ब्यातील अमृतनगर नाला येथे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या शुभहस्ते विरोधी पक्ष नेते अशरफ ऊ. शानू पठाण यांच्या उपस्थितीत नालेसफाईच्या कामास सुरूवात करण्यात आली.  मुंब्रा येथून नालेसफाईस सुरूवात झाली असून संपूर्ण शहरातील नाले सफाईची कामे मे  महिन्याच्या अखेरपर्यत पूर्ण होतील या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करण्याच्या सूचना महापौरांनी यावेळी दिल्या.

मुंब्रा प्रभाग क्र. ३२ मधील अमृतनगर येथील नाल्यापासून नालेसफाईला प्रारंभ करण्यात आला. यावेळी स्थानिक नगरसेविका मरझिया पठाण तसेच परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. दरवर्षी नालेसफाईला उशीरा सुरूवात होते. मात्र यावर्षी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच नालेसफाईस सुरूवात करण्यात आली आहे, लवकरच ठाणे शहरातील सर्व नाल्याच्या सफाईला देखील सुरूवात होणार आहे. नालेसफाईनंतर नाल्यातील काढलेला गाळ हा रस्त्याच्या कडेला न ठेवता तो तात्काळ उचलला जाईल याची देखील दक्षता घेण्याच्या सूचना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी संबंधित विभागाला दिल्या.

तसेच प्रत्येक प्रभागात स्वच्छता निरीक्षक, उपमुख्यस्वच्छता निरीक्षक यांनी नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवावे. तसेच उघड्या असलेल्या नाल्यांमध्ये नागरिकांनी देखील कचरा टाकू नये असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी यावेळी केले. नालेसफाईच्या कामास मुंर्ब्यामधून सुरूवात केल्याबद्दल विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनी महापौरांचे आभार व्यक्त केले. तसेच नालेसफाईस लवकर सुरुवात केल्यामुळे पावसाळ्यापूर्वी मुंब्रा परिसरातील नालेसफाई समाधानकारकरित्या पूर्ण होईल असे त्यांनी नमूद केले.

तसेच प्रभाग क्र. ३२ मधील परिसरात स्वच्छता अभयिान राबविण्यात आले. यावेळी परिसरातील कचरा साफ करुन रस्ते पाण्याने स्वच्छ करण्यात आले. यावेळी ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करणारे पथनाट्य सादर करण्यात आले.

यावेळी उपायुक्त मधुकर बोडके, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, स्वच्छता निरीक्षक शयुराज कांबळे, मयुरी वखारीया, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक गौरी तांबे, लक्ष्मण पुरी, डोंगर परदेशी, तसेच  स्वचछता निरीक्षक महेश बागराव, जयराम साठे बांधकाम विभाग, फायलेरीया विभाग, गार्डन विभाग, व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भाईंदर येथील आगीत ५०पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक