उरण मधील गावांना, आदिवासी वाड्यांमध्ये पाणी टंचाई
उरण : उरण तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई आणि पुनाडे धरणांची पातळी कमी होत असल्याने ‘उरण नगरपरिषद'ने रहिवाशांना आठवड्यातील मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आवरे-कडापे, चिरनेर-केलाचामाळ आदिवासी वाडीवरील विहिरींनी तळ गाठल्याने आणि या ठिकाणावरील ‘जल जीवन योजना'ची कामे रेंगाळल्याने रहिवाशांना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
उरण तालुक्याच औद्योगिकीकरण आणि नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. अशा तालुक्यातील औद्योगिक आणि नागरीकरणाला पाणी पुरवठा करणाऱ्या ‘एमआयडीसी'च्या रानसई धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १० एमसीएम एवढी आहे, तर जलसंपदा विभागाच्या पुनाडे धरणाची क्षमता जेमतेम १.७५ एमसीएम एवढी आहे. या २ धरणांच्या पाणीसाठ्यावर अवलंबून राहिल्यास तालुक्याला फक्त ३ ते ४ महिनेच पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यामुळे तालुक्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी ‘सिडको'चे हेटवणे धरण आणि ‘जीवन प्राधिकरण'च्या बारवी धरणातील पाण्यावर आजही अवलंबून रहावे लागत आहे. तालुक्यात ओएनजीसी, जेएनपीटी, बीपीसीएल यासारखे मोठ मोठे प्रकल्प आणि ‘जेएनपीए'च्या अनुषंगाने निर्माण झालेले मोठमोठी गोदामे यामुळे तालुक्यातील नागरीकरण देखील झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या नागरीकरण, औद्योगिकीकरणासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी मात्र तालुक्यातील नागरिकांना दुसऱ्या तालुक्यांवर अवलंबून रहावे लागत आहे.
पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून ‘सिडको'च्या माध्यमातून उरणच्या पूर्व विभागातील चिरनेर, कळंबुसरे, भोम, मोठीजुई, कोप्रोली, खोपटे, विधणे, दिघोडे, वेश्वी, चिर्ले, जांभूळपाडा, गांवठाण तर द्रोणागिरी नोड आणि करंजा या भागाला पाणीपुरवठा केला जातो. बारवी धरणातून जेएनपीटी वसाहत आणि जेएनपीए बंदराला पाणीपुरवठा केला जातो. रानसई धरणातून २० ग्रामपंचायती, ओएनजीसी, एनएडी, जीटीपीएस, बीपीसीएल, जीटीपीएस वसाहती असे मिळून रोज ३० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. तर पुनाडे धरणातून पूर्व भागातील १० गावांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु, मागील ४० वर्षे उरण तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार न घेतल्याने आज उरण शहर, चाणजे, हनुमान कोळीवाडा, घारापुरी, सोनारी, पाणजे, नवघर, भेंडखळ, बांधपाडा, रानसई, वशेणी, पिरकोण, आवरे, सारडे, गोठवणे, विधणे, वेश्वी, चिर्ले, धुतूम, कळंबुसरे सारख्या ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. तसेच आवरे-कडापे, चिरनेर-केलाचामाल या भागातील ‘जल जीवन योजना'ची कामे रेंगाळल्याने तसेच विहिरींनी तळ गाठल्याने या ठिकाणावरील रहिवाशांना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या चांदायणी आदिवासी वाडीवर टँकरने पाणीपुरवठा केला जात असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येणाऱ्या काळात येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागेल, असे भयानक चित्र समोर येत आहे.
‘जीवन प्राधिकरण'च्या अंतर्गत पुनाडे धरणांतून पुनाडे ८ गावातील रहिवाशांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी सुमारे १० कोटींची योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदर योजनेचे काम संथगतीने सुरु आहे. त्याचा फटका या गावातील २५ हजार रहिवाशांना सहन करावा लागत असून आवरे-कडापे गावातील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे योजना पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर पुढाकार घ्यावा.
- अनामिका हितेंद्र म्हात्रे, सरपंच-वशेणी तथा अध्यक्ष-पुनाडे ८ गांव पाणी पुरवठा योजना.
उरण तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे किंवा नाही याची मला माहिती नाही. तरीही सदर माहिती घेऊन सांगतो.
-डॉ. उध्दव कदम, तहसीलदार-उरण.
उरण शहरातील रहिवाशांना ‘एमआयडीसी'कडून रानसई धरणातून पाणी पुरवठा केला जात आहे. रानसई धरणातून पाणीपुरवठा कमी होत असल्याने आठवड्यातील मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत पाणीपुरवठा कपात करण्याचा निर्णय ‘नगरपरिषद'ने घेतला आहे.
-समीर जाधव, मुख्याधिकारी-उरण नगरपरिषद.
उरण तालुक्यातील पुनाडे ८ गावातील रहिवाशांना आणि चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील गावातील रहिवाशांना सुमारे एकूण २० कोटींची योजना राबविण्याचा निर्णय शासनाने ‘जीवन प्राधिकरण'च्या अंतर्गत घेतला आहे. परंतु, ठेकेदारांच्या ‘हम करो सो' कामामुळे काम संथगतीने सुरु आहे. ते काम लवकरच मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे.
-नामदेव जगताप, उप अभियंता-जीवन प्राधिकरण, पनवेल-उरण.