कृत्रिम बुध्दिमत्ता क्षेत्रात भविष्यासाठी महाराष्ट्र सज्ज

मुंबई : देशाच्या डिजिटल आणि कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) क्षेत्रात महाराष्ट्र अग्रस्थानी असून डेटा सेंटर क्षेत्रात राज्याने भक्कम स्थान निर्माण केले आहे. पुढील ३ वर्षांत महाराष्ट्र जागतिक डेटा सेंटर उद्योगात आघाडीचे राज्य म्हणून उदयास येईल, असा विश्वास पणन-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मोठ्या प्रमाणावर होत असलेली आंतरराष्ट्रीय गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जेचा वाढता वापर आणि मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा यामुळे राज्य डेटा सेंटर आणि एआय कंपन्यांचे प्रमुख केंद्र बनत असल्याचे त्यांनी सांगितले.

पश्चिम विभागातील ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय)'तर्फे आयोजित सातव्या ‘डेटा सेंटर ब्लूप्रिंट परिषद'मध्ये पणनमंत्री रावल बोलत होते. या ‘परिषद'मध्ये धोरण निर्माते, गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ सहभागी झाले होते.

ना. जयकुमार रावल म्हणाले, कृत्रिम बुध्दिमत्ता जागतिक अर्थव्यवस्थेचे स्वरुप वेगाने बदलत असून आरोग्य, वित्त, उत्पादन आणि शेतीसह अनेक क्षेत्रांत मोठे परिवर्तन घडवत आहे. सध्या भारतातील सुमारे ५० टक्के डेटा सेंटर महाराष्ट्रात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी ८० सामंजस्य करार करण्यात आले असून त्यामुळे जागतिक गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा, गतिमान स्टार्टअप परिसंस्था आणि कौशल्यसंपन्न मनुष्यबळामुळे भारत एआय क्षेत्रातील नवोन्मेषाचे नेतृत्व करण्यास सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने तंत्रज्ञान आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित केली आहे. सध्या भारतातील कार्यरत डेटा सेंटर क्षमतेपैकी निम्म्याहून अधिक क्षमता महाराष्ट्रात असून मुंबई देशाचे डिजिटल प्रवेशद्वार म्हणून विकसित होत असल्याचे ना. रावल यांनी नमूद केले.

जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांनीही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. अमेझॉन वेब सर्व्हिसेस, मायक्रोसॉपट, गुगल आणि प्रिन्स्टन डिजिटल ग्रुप यांनी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात मोठे डेटा सेंटर प्रकल्प उभारले आहेत. याशिवाय टिलमन ग्लोबल होल्डिंग्स यांनी महाराष्ट्रात १ गिगावॅट डेटा सेंटर प्लॅटफॉर्मसाठी सुमारे ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित केली आहे. तसेच ब्रूकफिल्ड कॉर्पोरेशन आणि आरएमझेड कॉर्प यांनी मुंबई महानगर प्रदेशात डिजिटल पायाभूत सुविधा आणि इनोव्हेशन जिल्ह्यांसाठी मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.

एआय आणि हायपरस्केल डेटा सेंटरच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा आवश्यक असल्याने नवीकरणीय ऊर्जेला विशेष महत्त्व देण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्हा सौर आणि पवन ऊर्जेसाठी अनुकूल असून भविष्यातील ग्रीन डेटा सेंटर्सना ऊर्जा पुरवण्याची मोठी क्षमता या भागात आहे. भारतामध्ये सध्या १५०० हून अधिक जागतिक क्षमता केंद्रे (ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स) कार्यरत असून एआय, क्लाऊड कम्प्युटिंग आणि डिजिटल अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. मुंबई, पुणे आणि उदयोन्मुख मुंबई ३.० परिसरामुळे महाराष्ट्र जागतिक तंत्रज्ञान आणि नवोन्मेष केंद्रांना आकर्षित करण्यास सक्षम आहे.
-जयकुमार रावल, पणनमंत्री-महाराष्ट्र. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अंबरनाथच्या पाणीटंचाईचे ‘लाईव्ह' दर्शन