मराठी भाषा म्हणजे अमृताचे रसवंतीगृह -प्रा.प्रवीण दवणे

कल्याण : मराठी भाषा म्हणजे अमृताचे रसवंतीगृहच; पण तिचे आकलन झाले नाही तर घराघरात असलेल्या मराठी भाषारुपी अमृताच्या रसग्रहणापासून आपण दूर रहाल, असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक तथा कवी प्रा.प्रवीण दवणे यांनी कल्याण येथे केले.

अभिजात मराठी भाषा दिवस आणि ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह'चे औचित्य साधून ‘केडीएमसी'च्या आचार्य प्र. के. अत्रे रंगमंदिरात ‘मराठी भाषेतील अभिजात सौंदर्य' या विषयावर आयोजित व्याख्यानासमयी प्रा.प्रवीण दवणे यांनी बोलत होते.

यावेळी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेशे गोडसे, मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे, उपायुक्त संजय जाधव, कांचन गायकवाड, महापालिका सचिव तथा मराठी भाषा अधिकारी किशोर शेळके, माजी नगरसेविका खुशबु चौधरी, महापालिकेचे इतर अधिकारी-कर्मचारी तसेच कला रसिक आणि साहित्यप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

आपल्या व्याख्यानाची सुरवात अभिजात मराठी भाषेच्या सुरेख काव्याने करीत, प्रा.प्रवीण दवणे यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभीच उपस्थित श्रोतृवर्गाची मने जिंकली. मराठी भाषा आपली वडिलोपार्जित ठेव आहे, तिची जपणूक आपण केली पाहिजे. एखाद्या प्राचिन वाड्याची डागडुजी केली नाही तर तो ढासळतो. आपल्या पूर्वजांनी उभारलेला उत्कृष्ठ मराठी भाषारुपी वाडा वंशजांनी सांभाळला नाही, तर ‘मराठी भाषा'चे सौंदर्य देखील लोप पावेल. आपली अप्रतिम मराठी भाषा केवळ नदीचा ओहळ म्हणून शिल्लक राहू नये, असे सांगत प्रा.प्रविण दवणे यांनी संत ज्ञानेश्वरांपासून संत सावता माळी या संत परंपरेतील तत्कालीन भक्ती गीतांतील शब्द रचना सुलभ, ओघवत्या मराठी भाषेत अलवार उलगडून दाखविली.

मराठी भाषा अमृताचा घडा आहे, ती ग्रहण करताना जेव्हा कानाचा डोळा होतो, तेव्हा भाषेकडे कानाडोळा होत नाही. अभिजात मराठी भाषा दिन या कार्यक्रमाचा शुभारंभ म्हणजे आपले मराठीपण जपणे होय. पुढच्या पिढीचे प्रश्न धनाचे नसतील, तर मनाचे असतील. त्यासाठी मराठी भाषेशी जवळीक केली पाहिजे, असे मत प्रा. दवणे यांनी आपल्या व्याख्यानात मांडले.

तर आपली भाषा विकसित होण्यावर भर द्यावा. साहित्य, पुस्तक वाचन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. समाजात वाचन प्रवृत्ती वाढली पाहिजे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी केले. तसेच वाचन संस्कृती व्हावी, यासाठीच आठवड्यात एक दिवस वाचन दिवस म्हणून आपण निश्चित करुया, असेही आयुवत गोयल म्हणाले.

मराठीतील प्रख्यात कवयित्री शांता शेळके आणि इतर कवींच्या काव्य पंक्ती उध्दृत करीत, सर्वांनी वाचनाचा परीघ समृध्द करावा, असे विचार महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे यांनी आपल्या भाषणातून मांडले.

गतवर्षी मराठी भाषेला शासनाकडून अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला, ती आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे विचार महापालिका सचिव तथा मराठी भाषा अधिकारी किशोर शेळके यांनी मांडले.

सदर कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन उद्यान विभागाचे महेश देशपांडे यांनी, तर आभार प्रदर्शन माहिती-जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांनी केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

केडीएमसी कचरा कंत्राटदाराच्या कारभारामुळे नागरिक त्रस्त