१४ गावांचा विकासासाठी कायम प्रयत्नशील आ. मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य शासनाने चौदा गावांचा नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण  निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत ‘१४ गाव सर्वपक्षीय विकास समिती'च्या शिष्टमंडळाने आमदार मंदाताई म्हात्रे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

या भेटीदरम्यान १४ गावातील नागरिकांनी नव्याने महापालिकेत सामाविष्ट झालेल्या गावांच्या विविध प्रश्नांबाबत आ. मंदाताई म्हात्रे यांना निवेदन सादर केले. या निवेदनात पायाभूत सुविधा विकास, रस्ते-पाणीपुरवठा व्यवस्था, आरोग्य-शिक्षण क्षेत्रातील सुधारणांची गरज तसेच कर आणि प्रशासकीय सुविधांशी संबंधित विषयांचा समावेश होता.

राज्य शासनाचा सदर निर्णय स्थानिकांच्या दीर्घकालीन मागणीचा सकारात्मक निकाल आहे. १४ गावांचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या सोयी-सुविधांच्या वृध्दीसाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही आ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी ‘१४ गाव सर्वपक्षीय विकास समिती'चे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, उपाध्यक्ष सुखदेव पाटील, सचिव गुरुनाथ पाटील, खजिनदार चेतन पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे, भरत भोईर, गणेश जेपाल, आदि पदाधिकारी उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

भाजपसोबत समझोता नाही-प्रकाश आंबेडकर