म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
‘स्वच्छ सर्वेक्षण'मध्ये ‘देशात नंबर वन'साठी नवी मुंबई सज्ज
नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण'मध्ये देशातील द्वितीय क्रमांकाचे मानांकित शहर म्हणून नवी मुंबई नावाजली जात असताना ‘सर्वेक्षण'मध्ये सातत्याने लाभत असलेल्या उच्च मानांकनामुळे नवी मुंबईसह देशातील ३ शहरांचा ‘सुपर स्वच्छ लीग' असा विशेष गट यावर्षी जाहीर करण्यात आलेला आहे. ‘नवी मुंबई'चा सुपर स्वच्छ लीगमध्ये समावेश होणे सर्व नागरिकांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असली तरी स्वच्छतेच्या दृष्टीने आपली जबाबदारी अधिक वाढविणारी गोष्ट आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या दृष्टीने नागरिकांनी अधिक जागरुक होऊन कृतीशील सहभाग घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करतानाही ‘नवी मुंबई'च्या मानांकनाचे श्रेय नागरिकांना देतानाच आपल्या वाढत्या जबाबदारीचे भानही आयुक्त शिंदे यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे विभागवार नेमलेल्या पालक अधिकारी यांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नियमित क्षेत्रीय भेटी वाढवून स्वच्छतेकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार संबंधित सर्वच अधिकारी, कर्मचारी आपल्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे कचऱ्याचे निर्मितीच्या ठिकाणीच ओला, सुका आणि घरगुती घातक अशा ३ प्रकारे कचरा वर्गीकरण केले जाणे. यामध्ये नागरिकांनी अधिक सतर्क होऊन आपल्या घरातील तसेच कामाच्या, व्यवसायाच्या ठिकाणी निर्माण होणारा कचरा वेगवेगळा ठेवला जाईल आणि महापालिकेच्या कचरा गाड्यांमध्येही वेगवेगळा दिला जाईल याकडे अधिक काटेकोर व बारकाईने लक्ष द्यावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. तसेच आपल्या घराप्रमाणे आपल्या घरासमोरचा, इमारतीसमोरचा परिसरही आपल्यामुळे अस्वच्छ होणार नाही याकडेही लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकामार्फत दुर्लक्षित आणि पडीक जागांच्या स्वच्छतेसाठी सखोल स्वच्छता मोहिमा राबविल्या जात असून त्यामध्ये अधिक नागरिक सहभागी होत असतात. मात्र, अधिक व्यापक लोकसहभाग लाभल्यास सदर काम अधिक चांगल्या रितीने आणि जलद होईल, असे लक्षात घेऊन नागरिकांनी आपापल्या परिसरातील सखोल स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी होऊन परिसर स्वच्छतेकडेही लक्ष द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
नागरिकांमार्फत शहर स्वच्छतेवर लक्ष रहावे आणि त्यामध्ये सुधारणा व्हावी याकरिता नवी मुंबई महापालिकाने प्रभावी ‘तक्रार निवारण प्रणाली (Grievance Redressal System)' कार्यान्वित केली असून My NMMC ॲपही तयार केले आहे. नागरिक या दोन्ही माध्यमांचा वापर करुन स्वच्छतेविषयीच्या आपल्या तक्रारी सहजपणे नोंदवू शकतात आणि आपल्या तक्रारीचे पुढे काय झाले? याची माहितीही जाणून घेऊ शकतात.
‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४'ची प्रक्रिया सुरु झाली असून यामधील एक महत्वाचा भाग असलेल्या ‘नागरिकांचा प्रतिसाद'अर्थात ‘सिटीझन फिडबॅक' नोंदविण्यास ‘स्वच्छ भारत मिशन'मार्फत सुरुवात झाली आहे. याकरिता https://Wmurban.org/feedback या लिंकवर क्लिक करून वेबसाईटवर नागरिकांनी शहर स्वच्छतेविषयीचा आपला अभिप्राय नोंदवायचा आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाने आपल्या मोबाईलवरुन नवी मुंबई शहराच्या देशातील सर्वोत्तम मानांकनासाठी सर्वेक्षणात विचारल्या जाणाऱ्या १० प्रश्नांची सर्वोत्तम उत्तरे देऊन आपल्या नवी मुंबई शहराचे मानांकन उंचवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याकरिता ‘नमुंमपा'च्या वतीने विविध माध्यमांचा वापर करुन प्रतिसाद नोंदविण्यासाठी नागरिकांपर्यंत वेबसाईटची लिंक तसेच क्यूआर कोड पोहोचविण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक नवी मुंबई नागरिकाने एक सामाजिक जबाबदारी म्हणून स्वतः १० प्रश्नांची सर्वोत्तम उत्तरे नोंदवावीत तसेच आपले कुटुंबिय, मित्र-परिवार, कार्यालयीन सहकारी यांनाही अभिप्राय नोंदविण्यास सांगून प्रोत्साहीत करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
नवी मुंबई मधील सुजाण नागरिकांनी कचरा वर्गीकरण असा आपला प्राधान्यक्रम समजून त्यादृष्टीने अधिक सक्रिय होत कार्यवाही करावी. घराप्रमाणे आपला परिसर स्वच्छ राहील याकडे काटेकोर लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४' मध्ये प्रत्यक्ष सहभागी होत नागरिकांचा प्रतिसाद या स्वतः तर नोंदवावाच आणि आपल्या संपर्कातील इतरांनाही अभिप्राय नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच शहर स्वच्छतेत आपले योगदान देत ग्रिव्हेन्स रिड्रेसल सिस्टीमचा प्रभावी वापर करावा.
-डॉ. कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका.