केडीएमसी आगामी महापालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या २०२५ सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाच्या प्रारुप प्रभाग रचनेतील सूचना- हरकती विचाराधीन घेऊन ४ प्रभागाची व्याप्ती आणि सीमांकनात बदल करीत शासनाने हिरवा कंदील देत मान्यता दिल्याने ‘केडीएमसी'ने अंतिम प्रभाग रचना जाहीर केल्याचे घोषित केले. त्यामुळे निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर केल्याने महापालिकेतून २७ गावे वगळण्याची ‘२७ गाव संघर्ष समिती'च्या मागणीचा प्रश्न या निमित्ताने अनुत्तरीतच राहिला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी २०२५ सार्वत्रिक निवडणुकीसाठी १२२ सदस्य निवडण्यासाठी ४ सदस्यीय पॅनल पध्दतीने निवडणूक घेतली जाणार आहे. त्याअनुषंगाने ४ सदस्यीय २९ पॅनल तर ३ सदस्याचे २ पॅनल अशा ३१ पॅनलची निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना ऑगस्ट महिन्यात जाहीर करण्यात आली होती. या प्रारुप प्रभाग रचनेवर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था तसेच इच्छुक उमेदवारांच्या अशा एकूण २६४ सूचना-हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. यामध्ये विविध प्रभागातील इमारती बाजुच्या प्रभागाला जोडण्यात आल्याने अनेकांनी प्रभागाच्या सीमांकनाबाबत हरकती घेतल्या होत्या.
या हरकती-सूचनांवर ‘राज्य निवडणूक आयोग'ने प्राधिकृत अधिकारी यांनी सुनावणी घेतल्यानंतर प्रभाग रचनेचा अहवाल ‘निवडणूक आयोग'ला सादर केला होता. प्रारुप प्रभाग रचने संदर्भात एकाच प्रकरच्या प्रभागाच्या हद्दीसंदर्भात २१४ हरकती त्यामध्ये ४ हरकती प्रभागाची व्याप्ती आणि प्रभाग सीमांकनाबाबत विचाराधीन घेऊन या अंशतः बदल केला. तसेच अन्य ४६ सर्व सामान्य हरकती, आरक्षण संदर्भातील मुद्दे जे मुद्दे प्रभाग रचनेशी संदर्भीत नव्हत्या. त्यामुळे ‘निवडणूक आयोग'ने या प्रभाग रचनेला मान्यता दिल्याची माहिती महापालिकेचे ‘निवडणूक विभाग'चे उपायुक्त रमेश मिसाळ यांनी दिली.
शासनाने मंजुरी दिलेल्या अंतिम प्रभाग रचना ‘केडीएमसी'च्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येणार असून महापालिका मुख्यालयात प्रभाग रचनेचे नकाशे आणि परिशिष्ट १४,१५ संदर्भात प्रभागाची व्याप्ती पाहण्यासाठी महापालिकेच्या प्रभाग क्षेत्र कार्यालयात अंतिम वार्ड रचना नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती मिसाळ यांनी दिली. अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्याने प्रभागाच्या आरक्षण सोडतीचा मार्ग मोकळा झाला असून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी प्रभागातील पॅनल पध्दतीच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकीतून २७ गावे वगळण्याची मागणी ‘२७ गाव संघर्ष समिती'ने केली होती. मात्र, शासनाने महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेला मान्यता देत अंतिम प्रभाग रचना जाहीर केल्याने आगामी निवडणुकीमध्ये ‘केडीएमसी'तून २७ गावे वगळली जाण्याचा प्रश्न अधांतरीतच राहिला आहे.